
तासगाव (सांगली) - सध्या महिलांची सुरक्षितता हा विषय टोकदार बनला आहे. मुलींचे पालक मुलगी शाळा-कॉलेजमधून घरी परत येईपर्यंत काळजीत असतात. अशा पार्श्वभूमीवर तासगाव पोलिसांनी बसची वाट पाहत बसस्थानकामध्ये बसलेल्या २३ विद्यार्थिनींना त्यांच्या घरी सुखरूप पोहोचविले. सलग दोन दिवस पोलिस या मुलींना घरी पोहोचवून येत होते.
हैदराबाद प्रकरणानंतर देशातील मुली, महिला सुरक्षित नसल्याची भावना प्रत्येकाच्या मनात निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत अडचणीत सापडलेल्या मुलींना मदत केल्याने तासगाव पोलिसांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
तासगाव तालुक्यातील शिरगाव, बोरगाव आणि निंबळकर या गावच्या २३ मुली संध्याकाळी एसटी बसला उशीर झाल्याने गाडीच्या प्रतीक्षेत तासगाव बसस्थानकात बसल्या होत्या. त्याच वेळी बसस्थानकात पेट्रोलिंग करत पोलिस निरीक्षक राजेंद्र साविंत्रे आले. त्यांनी अजून या मुली बसस्थानकात कशा याची चौकशी केली असता साडेपाचची गाडी गेली, आता साडेसातला बस आहे. त्या बसची वाट पाहत असल्याचे त्या मुलींनी सांगितले. इतक्या उशिरा घरी कशा जाणार? असे म्हणत श्री. साविंत्रे यांनी महिला पोलिस कर्मचाऱ्यासह पोलिस व्हॅन बोलवून त्या मुलींना चक्क त्यांच्या घरापर्यंत पोहोचवून पोलिस ‘सद्रक्षणाय’ असल्याची प्रचिती आणून दिली. पोलिस कर्मचारी मोहन वंडे, जितेंद्र चव्हाण, महादेव हसबे यांनी त्या मुलींना घरापर्यंत पोहोचविले. विशेष म्हणजे सलग दोन दिवस पोलिस आपले पालकाचे ‘कर्तव्य’ चोखपणे पार पाडत होते. तोपर्यंत बसची वेळही सुधारली आणि पुन्हा या मुली एसटी बसने
जाऊ लागल्या.
गेले दोन दिवस पोलिस निरीक्षक राजेंद्र साविंत्रे यांनी बजावलेली ‘ड्युटी’ चर्चेचा विषय बनली आहे. ऐन आणीबाणीच्या क्षणी आपली काळजी घेणारे कोणीतरी आहे हा भाव क्षणभर त्या मुलींच्या चेहऱ्यावर उमटला. तर पोलिसांनी आपल्या मुलींची घेतलेली काळजी पाहून त्या मुलींचे पालकही सद्गदित झाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.