दिवाळी म्हणजे साऱ्यांचा आनंदाचा उत्सव. हा उत्सव फटाक्यांशिवाय पार पडत नाही. कधी लहानांचा हट्ट, कधी तरुणाईची मस्ती, तर कधी वर्षातून एकदा येणारा सण म्हणून लाखोंची खरेदी होते. मात्र क्षणात कोट्यवधीची राखही होते, तर आवाजाने अनेकांची आयुष्यही उद्ध्वस्त होतात. कोरोना काळात फटाक्यामुळे होणाऱ्या प्रदूषणामुळे संसर्ग वाढण्याची शक्यता तज्ज्ञ डॉक्टरांनी व्यक्त केली आहे. क्षणाचा आनंद आयुष्यभराची सजा होऊन जाते. त्यामुळेच साऱ्यांनीच काळजी घेण्याची गरज आहे.
मोठ्या आवाजाचे फटाके बंद
सध्या बाजारपेठेत फटाके विक्रीसाठी ठेवण्यात आले आहे. गेल्या काही वर्षांपासून सुरू असणाऱ्या जनजागृतीमुळे नागरिकांकडून मोठ्या आवाजाचे फटाके खरेदी केली जात नाही. त्यामुळेच गेल्या दोन वर्षांपासून मागणीत सातत्याने घट झाल्याचे चित्र आहे. तसेच इको-फ्रेंडली फटाके खरेदीवर अधिक भर दिला जात असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले. यंदाच्या दिवाळीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आवकही घटल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.
न्यायालयाचा निकाल
पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून सर्वोच्च न्यायालयाने रात्री दहानंतर फटाके उडवायला बंदी घातली आहे. रहिवासी क्षेत्रात 70-100 डेसिबलपेक्षा अधिक आवाजाचे फटाके वाजवू नयेत, असा आदेश आहे. परंतु प्रदूषण नियंत्रण मंडळाने आजपर्यंत एकही कारवाई केली नसल्याचे दिसते आहे. केवळ प्रबोधनाचा देखावा करते.
दर दिवाळीला दहा टन कचरा
महापालिका क्षेत्रात महिन्याला 190 टन कचरा संकलित होतो. त्याची विल्हेवाट लावेपर्यंत नाकीनऊ येते. गतवर्षी दिवाळीत एका दिवशी फटक्यांचा कचरा 10 टन जमा झाला. तीन दिवसांत सरासरीने तीस टन कचरा. ही आकडेवारी महापालिका क्षेत्रातील आहे.
फटाकेमुक्त दिवाळी करा
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या काही महिन्यांत सण-उत्सव अगदी साध्या पद्धतीने साजरे करण्यात आले आहेत. दिवाळी म्हणजे साऱ्यांचा आनंदाचा उत्सव आहे. आपल्या कुटुंबासह उत्सव साजरा करावा. फटाक्यामुळे मोठ्याप्रमाणावर प्रदूषण होते. यासाठी फटाकेमुक्त दिवाळी साजरी करण्यासाठी साऱ्यांनीच पुढाकार घ्यावा. फटाक्यांमुळे होणारे अपघात, दुर्घटनांची संख्या वाढत चालली आहे. त्यामुळे साऱ्यांनी अधिक दक्षता घेण्याची गरज आहे.
- दीक्षित गेडाम, पोलिस अधीक्षक, सांगली
कोरोना पसरण्याची शक्यता
दुष्परिणाम दीर्घकालीन आहेत. कचरा तर होतोच. धुरामुळे वायुप्रदूषण आणि आवाजामुळे ध्वनिप्रदूषण होते. फटाक्यातून निघणारा धूरात सल्फरडाय ऑक्साईड, कार्बनडाय ऑक्साईड असतो. थंडीच्या काळात त्यांच्यावर सूर्याची किरण आल्यानंतर प्रकिया तयार होते. धुके आणि ओझोन निर्माण होतात. हे शरीरासाठी धोकादायक आहे. प्रदूषण अधिक असलेल्या ठिकाणी कोरोना अधिक पसरला आहे. कोरोनाचे अधिक बळी गेले आहेत. आधी मुंबई आणि आता दिल्ली अशा अनेक ठिकाणी कोरोना पुन्हा डोके वर काढत आहे. त्यामुळे फटकामुक्त दिवाळी साजरी करावी. अनेक देशात आणि आपल्या अनेक राज्यात फटाक्यांवर बंदी घालण्यात आली आहे. तशी राज्यातही हवी.
- डॉ. अनिल मडके, प्रख्यात छातीरोग विशेषतज्ज्ञ
संपादन : युवराज यादव
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.