शेतमाल वाहतुकीला ब्रेक नको! 

शेतमाल वाहतुकीला ब्रेक नको! 

सोलापूर ः राज्याच्या ग्रामीण भागातून मुंबई, पुण्याकडे प्रवाशांबरोबर काही प्रमाणात मालवाहतूक घेऊन धावणाऱ्या खासगी ट्रॅव्हल बसच्या वाहतुकीला राज्याच्या परिवहन विभागाने ब्रेक लावला आहे. रविवारपासून (ता. 15) त्यासाठी विशेष कारवाईची मोहीम तीव्र करण्याच्या सूचना परिवहन आयुक्त कार्यालयाकडून देण्यात आल्या आहेत. संबंधित वाहनचालकाचा परवाना निलंबित करण्यासह 15 हजारांचा दंड वसूल करण्याचा आदेशही या कारवाईत देण्यात आले आहेत. पण त्याचा सर्वाधिक फटका मुंबई, पुण्याकडे शेतमाल पाठवणाऱ्या छोट्या शेतकऱ्यांना बसणार आहे. पार्सलच्या नावाखाली अन्य प्रकारच्या मालवाहतुकीवर परिवहनने कारवाई करावी, पण शेतमालाला यातून सूट द्यावी, अशी मागणी आता पुढे येते आहे. 
ज्यांच्याकडे कमी म्हणजे 10-20 बॉक्‍स किंवा पोती असा शेतमाल निघतो, त्यांना या गाड्या किंवा त्यांचे भाडे परवडत नाही, ते त्यांच्या आवाक्‍याबाहेर असते. त्यामुळे हे छोटे शेतकरी प्रामुख्याने प्रवासी वाहतूक करणाऱ्या या खासगी ट्रॅव्हल बसचा आधार घेतात. या बसच्या पाठीमागे किंवा डाव्या बाजूला असणाऱ्या लगेजच्या (सामानकक्ष) जागेत हे बॉक्‍स भरून ते मुंबई, पुण्याकडे पाठवतात. पण परिवहन विभागाच्या या एका निर्णयाने आता या वाहतुकीला बंदी घालण्यात आली आहे. अर्थात, केवळ शेतमालच नव्हे, तर पार्सलच्या नावाखाली अन्य सर्व प्रकारच्या मालवाहतुकीला आरटीओंकडून बंदी घालण्यात आली आहे. विशेषतः नाशिक, नगर, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, सातारा, उस्मानाबाद, बीड, नाशिक, औरंगाबाद या भागातील शेकडो बस प्रामुख्याने या मार्गावर धावतात. तसेच काही गाड्या शेजारच्या राज्यातील तेलंगणातील हैदराबाद, कर्नाटकातील विजयपूरकडेही धावतात. शेतमालाला सूट द्यावी, अशी मागणी होत आहे. 

न्यायालय म्हणते...फक्त टपावरून वाहतूक नको 
खासगी ट्रॅव्हल बसमधून होणाऱ्या मालवाहतुकीबाबत 2011 मध्ये उच्च न्यायालयामध्ये यासंबंधी एक याचिका दाखल झाली होती. त्या वेळी न्यायालयाने पार्सल वा अन्य मालवाहतूक केवळ सामानकक्षातून करण्यास हरकत नाही, परंतु गाड्याच्या टपावरच्या वाहतुकीमुळे बसमधील प्रवासी तसेच रस्त्यावरील अन्य प्रवाशांच्या जिवाला धोका होऊ शकतो, त्यामुळे टपावरून कोणत्याही प्रकारची वाहतूक करू नये, असे न्यायालयाने सुनावले होते. आता आरटीओकडून मात्र सरसकट मालवाहतुकीलाच बंदी घालण्यात येत आहे. 

माझ्याकडे सध्या रंगीत ढोबळी मिरचीचे उत्पादन सुरू आहे. दिवसाआड 20 ते 30 बॉक्‍स निघतात. पण बॉक्‍स कमी असल्याने तरकारी गाड्यामध्ये पाठवणे परवडत नाही, ते बसमधून पाठवतो. आता बसवाल्यांनी रविवारपासून माल नेणार नाही, असं सांगितलं आहे. 
- धनंजय हजारे, शेतकरी, मंगळवेढा 

वाशी मार्केटमध्ये आरटीओंनी दोनच दिवसांपूर्वी आमच्या गाड्या तपासल्या. यापुढे शेतमाल वाहतूक करायचा नाही, अशी ताकीद दिली आहे. रविवारपासून कारवाई केली जाणार आहे. आमच्यासमोर दुसरा पर्याय नाही. 
- सतीश नागणे, मालक, खासगी ट्रॅव्हल बस, मंगळवेढा 

खासगी ट्रॅव्हल बसमधील मालवाहतुकीवर कारवाईची मोहीम कायमच सुरू असते, 15 डिसेंबरपासून विशेष मोहीम घेणार आहोत. केवळ शेतमालच नव्हे, तर सर्वप्रकारच्या मालवाहतुकीचा त्यात समावेश आहे. नियमानुसार आम्हाला ही कारवाई करावी लागणार आहे. 
- संजय ससाणे, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, कल्याण (मुंबई) 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com