ऊस टंचाईचा मोठा फटका, गूळ उत्पादन घटणार 

ऊस टंचाईचा मोठा फटका, गूळ उत्पादन घटणार 

कऱ्हाड ः तब्बल 14 वर्षांनंतर मोठ्या प्रमाणात आलेल्या महापुराने शेती पिकांना मोठा फटका बसला. त्यात मोठ्या प्रमाणात ऊस पिकाचा समावेश आहे. त्यामुळे यंदाचा साखर कारखान्यांचा हंगाम अडचणीत येण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे कोट्यवधींचा आर्थिक फटका बसणार आहे. एकीकडे साखर कारखान्यांची अशी स्थिती असताना गुऱ्हाळघरांचे तर गणितच कोलमडून पडले आहे. महापुराच्या फटक्‍याने ऊस पिकाचे उत्पादन घटणार असल्याने अनेक गुऱ्हाळघरे यंदा अजूनही सुरूच झालेली नाहीत आणि ती सुरू होतील, याचीही खात्री राहिलेली नाही. त्यामुळे गूळ उत्पादनही घटणार आहे. 
 

जिल्ह्यातून कृष्णा-कोयना या बारमाही वाहणाऱ्या नद्या लाभल्याने येथील बहुतांश शेती बागायती आहे. या तालुक्‍यातील शेतकरी कर्ज काढून, उसनेपासने करून शेती पिके घेतात. त्यातून चांगले उत्पन्नही शेतकऱ्यांना मिळते. मात्र, 2005-06 नंतर यंदा आलेला महापूर फारच मोठा होता. त्यात शेतकऱ्यांनी घेतलेली पिके जमीनदोस्त झाली. त्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत. त्यात सर्वाधिक फटका उसाला बसला. अनेक शेतकऱ्यांनी कर्ज काढून, उसनेपासने करून घेतलेली पिके त्यांच्या डोळ्यादेखत वाया गेल्याने शेतकऱ्यांपुढे मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे.

जिल्ह्यात 80 हजार 317 हेक्‍टर क्षेत्रावर ऊस उपलब्ध होता. त्यापैकी 15 ते 16 हजार हेक्‍टरवरील ऊस महापुराने वाया गेला आहे. त्यामुळे गाळपासाठी आडसाली 20 हजार 355, पूर्वहंगामी 19 हजार 440, सुरुचा 12 हजार 802, खोडव्याचा 27 हजार 781 हेक्‍टर ऊस उपलब्ध होता. मात्र, नदीकाठचा ऊस पुरात बाधित झाला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांबरोबर साखर कारखान्यांपुढेही यंदाच्या महापुरामुळे ऊस टंचाईचे संकट उभे राहिले आहे.

शेतकऱ्यांचे अर्थकारण अवलंबून असलेल्या ऊस या मुख्य पिकालाच फटका बसल्याने यंदा साखर कारखान्यांचाही हंगाम कालावधी कमी होणार आहे. त्यामुळे कारखाने आर्थिक संकटात सापडले आहेत. पर्यायाने शेतकऱ्यांवरही आर्थिक कुऱ्हाड कोसळण्याची वेळ आली आहे. अशी स्थिती साखर कारखान्यांची असल्याने गुऱ्हाळघरांनाही त्याचा फटका बसणार आहे. पूर्वी ऑगस्ट महिन्यात सुरू होणारी गुऱ्हाळघरे सप्टेंबर महिना संपला तरी अजूनही सुरूच झालेली नाहीत. त्याचबरोबर ती सुरू होतील की नाही, याबाबतही शंकाच आहे. त्यामुळे यंदाच्या महापुराच्या फटक्‍याने गुऱ्हाळघरांचेही गणित कोलमडणार आहे. त्याचा परिणाम गुळाच्या उत्पादनावर मोठ्या प्रमाणात होणार आहे. 


मजुरांचा प्रश्न, भांडवल, आर्थिक नियोजन आणि वाढत्या महागाईचा फटका गुऱ्हाळघरांना बसला आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षांपासून गुऱ्हाळघरांना उतरती कळा लागली आहे. त्यातच यंदा आलेल्या महापुराने कृष्णा-कोयना नदीकाठच्या ऊस पिकाला मोठा फटका बसला आहे. त्यामुळे यंदा गुऱ्हाळांना ऊस टंचाई भासणार असून, अनेक गुऱ्हाळघरे सुरू होतील की नाही, याबाबत शंकाच आहे. 

-प्रकाश पाटील, अध्यक्ष, गुऱ्हाळमालक संघटना. 
 

 
 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com