पावसाने चार बागा कोसळल्या; तासगाव तालुक्‍यात 30 लाखांचे नुकसान

The rains destroyed four orchards; 30 lakh loss in Tasgaon taluka
The rains destroyed four orchards; 30 lakh loss in Tasgaon taluka

तासगाव (जि. सांगली) : तासगाव तालुक्‍यात काल रात्री झालेल्या अवकाळी पावसाने द्राक्ष बागायतदार अक्षरशः हादरले आहेत. हातातोंडाशी आलेल्या बागा धोक्‍यात आल्याने शेतकऱ्यांच्या तोंडचे पाणी पळाले आहे. तासगाव पूर्व भागात अवकाळी पावसाचा जोरदार तडाखा बसला असून सावळज, डोंगरसोनी गावात चार द्राक्षबागा कोसळून शेतकऱ्यांचे 30 लाखांचे नुकसान झाले आहे. दर कोसळल्याने होणारे नुकसान तर कोट्यवधीच्या घरात आहे. 

काल रात्री दोन वाजण्याच्या सुमारास या तालुक्‍याच्या बहुतांशी भागात वादळी वारे, विजांचा कडकडाटासह पावसाला सुरवात झाली. या वादळी वारे आणि अवकाळी पावसामुळे सावळज (ता. तासगाव) येथील शेतकरी नितीन शिवाजी तारळेकर यांची एसएसएन जातीची सुमारे पाऊण एकर द्राक्षबाग कोसळून अदांजे 8 ते 9 लाख रुपयांचे नुकसान झाले.

डोंगरसोनी (ता. तासगाव) गावातील शेतकरी रमेश ज्ञानोबा झांबरे यांची सुपरसोनाका जातीची एक एकर द्राक्षबाग कोसळून अंदाजे आठ ते 10 लाखांचे नुकसान झाले आहे. याच गावातील दुसरे शेतकरी प्रकाश हंबीरराव पवार यांची माणिक चमन जातीची दीड एकर द्राक्ष बाग कोसळून जवळपास 10 लाखांचे नुकसान झाले आहे.

तिसरे शेतकरी कोंडिराम तुळशीराम हंकारे यांची 1 एकर माणिक चमन जातीची द्राक्षबाग कोसळून 7 लाखांचे नुकसान झाले आहे. हा प्रकार घडल्यानंतर आजूबाजूच्या शेतकऱ्यांनी धाव घेतली. अचानक हाता तोंडाशी आलेला घास हिरावला गेल्याने शेतकरी व्याकुळ झाले होते. बाग पुन्हा उभी करण्याचे प्रयत्न सुरू होते, मात्र यावर्षीची उत्पन्न गेले ते गेलेच ! 

हे वादळी हवामान पुढील तीन दिवस रहाणार असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. सध्या एकाच वेळी मोठ्या प्रमाणावर बागा पक्व होत असून ऐन काढणीला आलेल्या पावसाने द्राक्ष मणी क्रकिंग होण्याची शक्‍यता आहे. शिवाय पावसामुळे दर कोसळून शेतकऱ्यांचे अपरिमित नुकसान होणार असल्याने अडचणी आणखीन वाढल्या आहेत. 

तिसंगीतील शेतकऱ्याला फटका 
तिसंगी (ता. कवठेमहांकाळ) येथे अवकाळी पावसाने द्राक्ष बाग कोसळल्याने भारत आप्पा कदम या शेतकऱ्याचे सुमारे 9 लाखांपर्यंत नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. तिसगी येथे भारत कदम यांची डोंगरसोनी हद्दीत द्राक्षबाग आहे. अतिशय कष्टाने व पावणे दोन लाख रुपयांचे पीक कर्ज घेऊन भारत कदम यांनी द्राक्ष पीक घेतले आहे.

सध्या द्राक्षे विक्रीस योग्य माल तयार झाला होता.152 रु. प्रति चार किलो दराने सुमारे 200ते 300 पेटी माल विकला होता. दरम्यान, बुधवारी रात्री सुमारे दोन वाजण्याच्या सुमारास कवठेमहांकाळ तालुक्‍याच्या घाटमाथ्यावर अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस पडला. या पावसामुळे भारत कदम यांची दीड एकर द्राक्ष बाग कोसळली.

संपादन : युवराज यादव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com