Sangli News : नेते-अधिकाऱ्यांविरोधात रस्त्यावर या : राजेंद्रसिंह राणा

सांगली दौऱ्यावर आले असता कृष्णा-वारणा नद्यांच्या प्रदूषणप्रश्‍नी त्यांनी आपली परखड मते मांडली.
Rajendrasingh Rana
Rajendrasingh Ranasakal

सांगली : ‘‘आज मासे मरताहेत...उद्या माणसे मरतील. नेते आणि प्रशासकीय अधिकारी बेजबाबदार वागत असतील, त्यांना ताळ्यावर आणण्यासाठी लोकआंदोलने झाली पाहिजेत,’ असे मत जागतिक कीर्तीचे जलतज्ज्ञ राजेंद्रसिंह राणा यांनी शनिवारी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केले. ते आज सांगली दौऱ्यावर आले असता कृष्णा-वारणा नद्यांच्या प्रदूषणप्रश्‍नी त्यांनी आपली परखड मते मांडली.

ते म्हणाले, ‘‘नद्यांचे प्रदूषण ही गंभीर समस्या आहे. एरवी उन्हाळ्यात मासे मरतात. यामागे अनेक कारणे आहेत. मात्र यावेळी मासे मेले आहेत. त्यामागे नक्की काही ना काही विषारी रसायन पाण्यात मिसळले गेले आहे. त्याची पडताळणी प्रयोगशाळेत सहज शक्य आहे. त्यानंतर ते रसायन कोणत्या उद्योगातून तयार होते, हेही स्पष्ट होईल.

येथे जबाबदारी प्रदूषण नियंत्रण विभागाच्या संबंधित अधिकाऱ्यांची आहे; जे ते पार पाडत नाहीत. मुळात हे अधिकारी नेहमीच त्यांच्या अहवालात शेवटी नमूद करत असलेली ‘पोल्युशन इज अंडर कंट्रोल’, अशी निष्कर्ष रेषाच घातक आहे. हे अधिकारीच प्रदूषणाला प्रोत्साहन देणारे आहेत. ते या प्रक्रियेचा भाग झाले आहेत. आज मासे मरत आहेत उद्या माणसे मरणार आहेत, त्याचे हे पूर्वलक्षण आहे. बेजबाबदार अधिकारी आणि त्यांना पाठीशी घालणारे लोकप्रतिनिधी लोकांच्या जिवाशी खेळत आहेत.’’

प्रदूषण नियंत्रणासाठी कायदे आहेत. मात्र प्रश्‍न त्यांच्या अंमलबजावणीच्या इच्छाशक्तीचा आहे. पर्यावरण, आरोग्य, शिक्षण असे विषय सामूहिक व्यापक हिताचे असतात. यासाठी जेव्हा सरकार सकारात्मक असते, तेव्हा तसे कायदे बनतात. मात्र कायदे झाले की काम झाले, असे होत नाही, तर त्याच्या अंमलबजावणीसाठी पुन्हा त्यामागे प्रशासकीय-लोकप्रतिनिधींची इच्छाशक्ती असावी लागते आणि त्यासाठी जनरेटाही आवश्‍यक असतो, अन्यथा असे कायदे अस्तित्वहीन होतात.

भ्रष्टाचाराचे स्वरूप बहुव्यापी

राजेंद्रसिंह म्हणाले ‘‘एखादा उद्योग नदीचे प्रदूषण करतो, तेव्हा ते ‘प्रायव्हेटायझेशन ऑफ प्रॉफिट’ असते आणि तिथले मासे मरतात तेव्हा ‘सोशलायझेशन ऑफ लॉस’ असते. याच्या मुळाशी सामाजिक आणि प्रशासकीय भ्रष्टाचार असतो. लोक स्वस्थ आहेत. कारण त्यांच्या जगण्या-मरण्याचे प्रश्नच इतके बिकट आहेत की, त्यांना यावर बोलायला उसंत नाही. गेल्या काही वर्षांत लोकआंदोलने मोडीत निघाली आहेत. भ्रष्टाचाराचे आजचे स्वरूप वरपासून तळापर्यंत बहुव्यापी आहे. पूर्वी ते मधल्या टप्प्यात असायचे.’’

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com