पाणी नियोजनाने वाढेल समृद्धता - चंद्रकांत पाटील

कोल्हापूर - खरीप हंगामाच्या सोमवारी झालेल्या आढावा बैठकीत बोलताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील. यावेळी डावीकडुन खासदार धनंजय महाडीक, जिल्हा परीषद अध्यक्ष शौमिका महाडीक, जिल्हाधिकारी अमित सैनी, महापालिका आयुक्‍तक डॉ. अभिजीत चौधरी आदी.
कोल्हापूर - खरीप हंगामाच्या सोमवारी झालेल्या आढावा बैठकीत बोलताना पालकमंत्री चंद्रकांत पाटील. यावेळी डावीकडुन खासदार धनंजय महाडीक, जिल्हा परीषद अध्यक्ष शौमिका महाडीक, जिल्हाधिकारी अमित सैनी, महापालिका आयुक्‍तक डॉ. अभिजीत चौधरी आदी.

कोल्हापूर - पावसाळा काही महिन्यांवर असताना आता नियोजन करून धावपळ होणार आहे. लोकप्रतिनिधींनीही राजकारण फुलटाइम काम म्हणूनच करावे लागणार आहे. पाणीटंचाईचे नियोजन जानेवारीतच झाल्यास जिल्ह्यातील टंचाई कमी होण्यासह कृषी उत्पादकदा वाढून समृद्धता निर्माण होईल, असे मत महसूलमंत्री तथा पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्त केले. शासकीय विश्रामगृहात आज खरीप हंगाम आढावा बैठकीत ते बोलत होते. 

पालकमंत्री पाटील म्हणाले, ‘‘उत्पादन खर्च कमी करून उत्पन्न वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी माती परीक्षण, पाणी नियोजन, समूह ठिबक सिंचनाचा अवलंब केल्याशिवाय समृद्धता येणार नाही. २५ मे ते १० जून दरम्यान उन्नत शेती, समृद्ध शेतकरी हे अभियान राबविले जाणार आहे. याचा लाभ अधिकाधिक शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी प्रभावी प्रयत्न केले पाहिजे. खरीप हंगामासाठी लागणारी बियाणे, खते, कीटकनाशके ही पुरेशा प्रमाणात उपलब्ध आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा सरासरी ९६ टक्के पाऊस पडला आहे. त्यामुळे पीक-पाणीही चांगले राहील. सर्व सरकारी योजनांचा प्रसार करून शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळण्यासाठी उन्नत शेती, समृद्ध शेतकरी अभियान राबविली जाईल. उसाला ठिबकशिवाय पर्याय नाही. भात, सोयाबीन, नाचणी, भुईमूग पिकासाठी ठिबकसिंचन पद्धती वापरणे आवश्‍यक आहे.’’ 

सध्या शेतकऱ्यांना ठिबकसिंचनासाठी येत असलेला खर्च कमी करण्यासाठी जैन इरिगेशनसारख्या कंपन्यांबरोबर सरकार चर्चा करत आहे.

ठिबकसिंचनासाठी येणाऱ्या एकूण खर्चापैकी अर्धी रक्कम शेतकऱ्यांना सीएसआरच्या माध्यमातून दिली जाईल. १०० ते २०० गटांच्या शेतकऱ्यांनी एकत्र येऊन ठिबकसिंचन प्रणाली राबविणे फायद्याचे ठरणार आहे. याबाबत उपविभागीय अधिकारी, कृषी अधिकारी यांनी शेतकऱ्यांमध्ये जाऊन प्रबोधन करणे आवश्‍यक आहे. 

या वेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शौमिका महाडिक, खासदार धनंजय महाडिक, आमदार उल्हास पाटील, आमदार डॉ. सुजित मिणचेकर, आमदार संध्यादेवी कुपेकर, आमदार प्रकाश आबिटकर, आमदार अमल महाडिक, जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, महानगरपालिका आयुक्त डॉ. अभिजित चौधरी

प्रकल्प संचालक डॉ. हरीष जगताप, कृषी सहसंचालक डॉ. नारायण शिसोदे, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी इंद्रजित देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी बसवराज मास्तोळी यांची प्रमुख उपस्थिती होती.

जलयुक्त शिवार
जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जिल्ह्यात यंदा १८ गावांची निवड झाली आहे आणि हे अभियान जिल्ह्यातील ५६ गावांमध्ये राबविणे आवश्‍यक आहे. 

प्रत्येक गावात ग्रामसभा घ्या व लोकांचा कामातील सहभाग वाढावा, असे सांगून सर्व गावांचे कामांचे आराखडे तयार करा, सर्व गावे जलुयक्त केली जातील. जी गावे शासकीय निकषामध्ये बसतात त्यांना शासनाचा निधी व जी गावे बसत नाहीत, परंतु आवश्‍यक आहेत, अशा गावांना सीएसआरमधून निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे बैठकीत स्पष्ट करण्यात आले.

पीक कर्ज 
जिल्ह्यासाठी २०१७-१८ साठी २ हजार १६४ कोटी पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. जिल्हा बॅंकेकडून १ हजार ९० कोटी १० लाख कर्ज वाटपाचे उद्दिष्ट आहे. उर्वरित कर्ज पुरवठा इतर बॅंकांमार्फत करण्याचे नियोजन केले आहे. कृषी पंपांना वीज जोडण्यासाठी महावितरणकडे १३ हजार ८५१ वीज जोडणी अर्ज आले आहेत. यांपैकी ७ हजार ९९ वीज जोडण्या प्रलंबित आहेत. प्रलंबित ठिकाणी तत्काळ वीज जोडणी करावी, असे आदेश पालकमंत्री पाटील यांनी दिले.

खरीप हंगामाचा आढावा -
जिल्ह्यात २०१६-१७ मध्ये अन्नधान्य पिकासाठी १ लाख ४८ हजार २०० हेक्‍टरवर पेरणी केली होती. यातून ४ लाख १५ हजार ७२६ टनांचे उत्पादन झाले आहे. यामध्ये भात, ज्वारी, नागली पिकांचे ४ लाख ११ हजार १०० टन, तर कडधान्य पिकाचे ४ हजार ६०४ टन उत्पादन झाले आहे. गळीत धान्यामध्ये प्रामुख्याने भुईमूग व सोयाबीनचे ९४ हजार १२७ हेक्‍टर क्षेत्रातून १ लाख ७९ हजार ५०९ टन उत्पादन मिळाले आहे. जिल्ह्यातील प्रमख नगदी पीक ऊस असून, १ लाख ३३ हजार हेक्‍टर क्षेत्रातून १०१ लाख टन उत्पादन निघाले. यामध्ये साखरेचा उतारा १२ टक्के मिळाला. खरीप हंगाम २०१७-१८ मध्ये अन्नधान्य पिकामध्ये ५५ हजार २०० हेक्‍टर क्षेत्रावर ४ लाख ४७ हजार १०० टन उत्पादनाचे उद्दिष्ट निश्‍चित केले आहे. यामध्ये तृणपिके १ लाख ४३ हजार हेक्‍टरवर ४ लाख ३५ हजार ८०० टन उत्पादन, कडधान्य पिकाचे १२ हजार २०० हेक्‍टरवर ११ हजार ३०० टन उत्पादन उद्दिष्ट आहे. गळीत धान्य पिकाचे १ लाख ११ हजार ३०० हेक्‍टर क्षेत्रावर २ लाख ५१ हजार ४०० टनांचे उत्पादन उद्दिष्ट असून, जिल्ह्यात १४६१५७ हेक्‍टर क्षेत्रावर १०३ टन प्रतिहेक्‍टर असे ऊस पिकाचे उद्दिष्ट निश्‍चित केले.

टंचाई निवारणासाठी उपाययोजना करा
जिल्हातील ग्रामीण भागातील संभाव्य पाणी टंचाईकृती आराखडा तयार केला असून, जिल्ह्यात टंचाई आराखड्यात १०० गावांचा समावेश आहे. यांपैकी उपविभागीय अधिकाऱ्यांकडून ७४ गावांमध्ये टंचाई घोषित केली आहे. या गावांमध्ये टंचाई निवारणार्थ योग्य त्या उपाययोजना तत्काळ करा, पिण्याच्या पाण्याची टंचाई कुठेही असता कामा नये, असे आदेश देऊन जेथे पिण्याच्या पाण्याची टंचाई असेल तेथे तहसीलदारांना पाण्याचे टॅंकर सुरू करण्यासाठीचे अधिकार दिले आहेत, असे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आढावा बैठकीत स्पष्ट केले.

तमदलगेत पाणीटंचाई 
जलयुक्त शिवार योजना सक्षमपणे राबविली म्हणतात; पण तरीही तमदलगे येथे पाणीटंचाई होत असल्याचे आमदार उल्हास पाटील यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com