इथे मिळतो शेतमालाला हमखास हमीभाव 

sale of organic vegetables in kolhapur kaneri math
sale of organic vegetables in kolhapur kaneri math

कोल्हापूर : शेतमालाला हमी भाव मिळावा म्हणून दोन वर्षापासून राज्यातच नव्हे तर देशातील शेतकरीही रस्त्यावर उतरत आहेत. आंदोलन झाले की हमीभाव, प्रत्यक्ष उत्पादन खर्चावर 50 टक्‍के नफा देण्याची घोषणा करुन शेतकऱ्याच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम होते. मात्र कणेरी येथील सिध्दगिरी मठाने शेतकऱ्याला आणि ग्राहकालाही हमीभाव कसा देता येतो, हे प्रयोगातून दाखवून दिले आहे. या मठाचे अदृश्‍य काडसिध्देश्‍वर स्वामींच्या संकल्पनेतून दोन वर्षापासून सिध्दगिरी नॅचरल्सच्या माध्यमातून दररोज सेंद्रिय भाजीपाल्याची विक्री होत आहे. 5 ते 6 हजार ग्राहक आणि 500 शेतकऱ्यांच्या माध्यमातून सुरु असलेला हा प्रकल्प, राज्य शासनासाठी पथदर्शी ठरणार आहे. 

कणेरी मठाच्या प्रयोगांनी केंव्हाच जिल्हा, राज्य आणि देशाच्या सिमा ओलांडल्या आहेत. सिध्दगिरी वस्तुसंग्रहालय, ग्रामीण जीवनशैली, बारा राशींची बारा शिल्पे, सिध्दगिरी रुग्णालय आणि आता सिध्दगिरी नॅचरल्सच्या माध्यमातून सुरु असलेली सेंद्रिय भाजीपाला निर्मिती आणि विक्री एक रोल मॉडेल म्हणून पुढे येत आहे. विविध रसायनांचा वापर करुन, विषयुक्‍त तयार होत असलेल्या भाजीचे दुष्परिणाम दिसत आहेत. बाजारातून भाजी करत असताना ग्राहकांकडून दहावेळा विचार करावा लागतो. याचा विचार करुनच कणेरी मठाने सेंद्रिय भाजीपाला निर्मितीचा निर्णय घेतला. 

सेंद्रिय भाजीपाला घेतल्यास भरघोस उत्पादन मिळत नाही, मात्र जर उत्पादनाला चांगला दर मिळाला तर शेतकरी त्याचे उत्पादन करतात, हे सिध्द झाले आहे. हीच बाब ग्राहकांबाबतही आहे. त्यामुळेच भाजीपाला उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांची सुरुवातीची संख्या 5 वरुन आज 500 वर गेली आहे. तर ग्राहकांची संख्या 100 वरुन 5 ते 6 हजारपर्यंत गेली आहे. 

असे होते वितरण 
दररोज सकाळी शेतकरी सेंद्रीय भाजीपाला सिध्दीगिरी नॅचरल्समध्ये आणून देतात. आलेला भाजीपाला वर्गवारीनुसार वेगळा केला जातो. ग्राहकांनी फोन व सोशल मिडीयातून केलेली मागणी, माहितीच्या आधारे वजन करुन पॅकिंग केले जाते. हे पॅकिंग केल्यानंतर शहरातील विविध भागातील मागणी पाहून या भाज्यांचे वितरण केले जाते. एका ग्राहकाला भाजीचा पुरवठा केल्यास संबंधित पुरवठादाराला 15 रुपये देण्यात येतात. भाजी संकलन करणे, वेगळ्या करणे, पॅकिंग करणे व भाज्यांसाठी ऑर्डर घेणे व त्याचे वितरण करणे, या कामात जवळपास 21 लोक काम करतात. व्यवस्थापनासाठी प्रतीकिलो 20 रुपये खर्च येतो. ना नफा, ना तोटा तत्वावर उपक्रम राबवत आहे. 

सेंद्रिय भाजीपाला 
क्‍लस्टर नियोजन 
ग्राहकांना विषमुक्‍त अन्न पुरवठा करण्याचा संकल्प अदृश्‍य काडसिध्देश्‍वर स्वामी यांनी केला आहे. त्यातूनच सेंद्रिय भाजीपाला उत्पादन सुरु आहे. सुरुवातीला शेतकऱ्यांना शेडनेट देवून त्यांच्याकडून सेंद्रिय भाजीपाला तयार करुन घेतला. यानंतर शेतकऱ्यांची संख्या वाढत गेली. वर्षभर हमीभाव मिळत असल्याने शेतकरीही या उत्पादनाकडे वळले आहेत. उत्पादनाचे प्रशिक्षण या शेतकऱ्यांना दिले आहे. आता भाजीपाला क्‍लस्टर तयार करण्याचे नियोजन मठाकडून केले आहे. 

दृष्टिक्षेपात 
शेतकरी---- 500 
ग्राहकांची संख्या------- 5 ते 6 हजार 
शेतकऱ्याला मिळणारा भाव-- 40 रुपये (प्रतिकिलो) 
ग्राहकाला मिळणारा भाव --- 60 रुपये 
व्यवस्थापक, वाहतूक खर्च 20 रुपये 

शेतकरी आणि ग्राहक एकत्र आले तर काय घडते, हे सिध्दगिरी नॅचरल्सव्दारे पाहत आहेत. शेतकऱ्यांना वर्षभर हक्‍काचा भाव मिळत असल्याने ते समाधानी आहेत. तर ग्राहकही सेंद्रिय भाजीपाला घरपोच व वर्षभर एकाच दराने मिळत असल्याने समाधानी आहेत. मध्यंतरी भाज्यांचे दर 80 ते 200 रुपये पर्यंत पोहाचले तरीही ग्राहकाला 60 रुपये किलोनेच भाजी मिळाली. हा खऱ्या अर्थाने हमीभावाचा फायदा आहे. 
- अदृश्‍य काडसिध्देश्‍वर महाराज. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com