
सांगली : तब्बल दोन वर्षांनी केळीला ‘अच्छे दिन’
नवेखेड : गेली दोन वर्षे केळीच्या दराचा सुरू असलेला वनवास संपला आहे. जिल्ह्यात जवळपास २० ते २२ रुपये प्रतिडझन इतक्या दराने केळीची विक्री सुरू आहे. श्रावण महिन्याच्या सुरवातीलाच चांगला दर मिळाल्याने वर्षभर हे दर स्थिर राहतील, असा जाणकारांचा अंदाज आहे
गेली दोन वर्षे केळीला प्रतिटन सात हजार रुपये इतका कमी दर मिळत होता. अनेकांचा उत्पादनखर्च अंगावर येत होता. कोरोनामुळे प्रामुख्याने ही स्थिती उद्भवली होती. देशाबाहेर व राज्याबाहेर केळीची विक्री प्रामुख्याने बंद झाली होती. त्यामुळे केळीचे दर पडले होते. कमी दर, महापूर, अवकाळी पाऊस यामुळे अनेक शेतकऱ्यांनी केळीची लागवड बंद केली होती. जिल्ह्यात प्रामुख्याने ‘जी-९’ या वाणाच्या केळीची लागवड केली जाते. राज्यभर केळीची लागवड मर्यादित राहिल्याने मालाला मोठ्या प्रमाणात मागणी होऊ लागली आहे. त्यामुळे केळीचे दर प्रतिटन वीस हजार ते २२ हजार रुपये इतक्या विक्रमी पातळीवर पोचले आहेत. एरव्ही माल नेण्यासाठी व्यापाऱ्यांच्या मागे लागणारे शेतकरी दृष्टीस पडायचे.
आता स्वतः व्यापारी आता शेतकऱ्यांना शोधत येऊ लागला आहे. त्याच्याकडून रोख रक्कम देऊन केळी खरेदी जात आहे. लागवडीपासून अकरा महिन्यांत उत्पादन देणारे केळी हे नगदी पीक आहे. रोपे, मशागत खते याचा खर्च जवळपास एकरी एक ते दीड लाख रुपये येतो. बऱ्याच वर्षांनी केळीला चांगला दर मिळाल्याने शेतकऱ्यांच्या समाधानाचे वातावरण आहे. वर्षभर हे दर टिकून राहतील, असा अंदाज आहे.
मागणी वाढल्याने दर चढे आहेत. मागील दोन-तीन वर्षांत शेतकऱ्यांना निर्यात बंदीचा मोठा फटका बसला होता. दर वाढल्याने शेतकऱ्यांना त्याचा चांगला फायदा होईल.
- बिभीषण पाटील,केळी शेतीचे मार्गदर्शक, बावची
आता दर वाढले आहेत. परंतु शेतकऱ्यांकडे केळी कमी आहेत.असे दर वाढण्यापेक्षा प्रतिटन किमान १३ ते १५ हजार रुपये इतका हमीभाव मिळावा, यासाठी सरकारने कायदा करणे गरजेचे.
- विश्वासराव पाटील, प्रगतशील शेतकरी, उरूण इस्लामपूर
Web Title: Sangli Bananas After Almost Two Years Achche Din
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..