सांगली : अंतर्गत वादातील काँग्रेस लढणार कशी ?

नेत्यांमध्ये एकवाक्यता नाही : कणखर नेतृत्व नसल्याने पक्ष दुर्बल
congress logo
congress logosakal
Updated on

सांगली : सांगली जिल्हा हा काँग्रेसचा पारंपरिक बालेकिल्ला असला तरी गेल्या पाच वर्षांत कणखर नेतृत्वाअभावी काँग्रेस दुर्बल झाली आहे. मंत्री विश्वजित कदम, विशाल पाटील, जयश्री पाटील यांच्याकडे नेतृत्व असले तरी त्यांच्यातच एकवाक्यता नसल्याने पक्षात एकी दिसत नाही. त्याचे परिणाम जिल्हा परिषद निवडणुकीत दिसतील, असे सध्याचे चित्र आहे. जिल्हा परिषदेत वर्षानुवर्षे काँग्रेसची सत्ता राहिली आहे. काँग्रेसच्या फुटीनंतरही काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्यातच जिल्हा परिषदेचे राजकारण फिरायचे. मात्र, २०१४ पासून राष्ट्रवादीच्या फुटीनंतर भाजपची जिल्ह्यात ताकद वाढली आहे. संजय पाटील, पृथ्वीराज देशमुख, विलासराव जगताप, शिवाजीराव नाईक, अजितराव घोरपडे हे दिग्गज नेते भाजपमध्ये गेल्याने पाच वर्षांपूर्वी या मिनी मंत्रालयाची सत्ता भाजपने बळकावली.

मदन पाटील, आर. आर. यांच्या निधनाचा धक्का

एकीकडे जिल्ह्यात भाजपची ताकद वाढत असताना काँग्रेस आणि राष्ट्रवादीला दोन मोठे धक्के बसले. सन २०१५ मध्ये राष्ट्रवादीचे राज्याचे प्रभावशाली नेते आर. आर. पाटील आणि काँग्रेसचे नेते मदन पाटील यांचे निधन झाले. त्यामुळे पाच वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत या दोन्ही नेत्यांची उणीव काँग्रेस आणि राष्ट्रवादीला जाणवली. या दोन्ही पक्षांचे ताकद कमी होण्यास हे एक मोठे कारण ठरले.

काँग्रेसला अवघ्या दहा जागा

काँग्रेसचे तत्कालीन नेते डॉ. पतंगराव कदम यांनी पक्षाची धुरा सांभाळली, मात्र भाजपच्या ताकदीपुढे काँग्रेस दुबळी ठरली. जयंत पाटील आणि पतंगराव कदम या दोन दिग्गजांनी भाजपला रोखण्याचा प्रयत्न केला. दोन्ही पक्षांच्या मिळून साठपैकी अवघ्या २४ जागा आल्या. यात काँग्रेसचा वाटा केवळ दहा जागांचा होता.

मिरज, जतमध्ये काँग्रेसची ताकद

जिल्हा परिषदेला काँग्रेसची ताकद ही विशेष करून मिरज, जत आणि भिलवडी वांगी मतदारसंघातच जास्त दिसून येत होती. त्याखालोखाल वाळवा आणि शिराळा या मतदारसंघात काँग्रेसचे अस्तित्व जाणवते; मात्र गेल्या पाच वर्षांतील काँग्रेस नेतृत्वाची पोकळी लक्षात घेता ही ताकद यंदा दिसेल, याची खात्री देता येत नाही.

नेतृत्वाचा अभाव

मदन पाटील आणि डॉ. पतंगराव कदम यांच्या निधनानंतर काँग्रेसला जिल्ह्यात ताकदीचे नेतृत्व लाभले नाही ही वस्तुस्थिती आहे. विश्वजित कदम हे राज्यमंत्री आहेत. विशाल पाटील राज्याचे उपाध्यक्ष आहेत, तर जतचे आमदार विक्रम सावंत हे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आहेत. याशिवाय मदन पाटील गटाचे नेतृत्व जयश्री पाटील करत आहेत; पण या नेत्यांमध्येच एकवाक्यता दिसत नाही, त्यामुळे पक्षाचे गटागटात तुकडे झाल्यासारखी स्थिती आहे.

पाच वर्षांत तीन सदस्य घटले

गेला सभागृहात पक्षाचे दहा सदस्य होते, मात्र सभागृहाची मुदत संपताना ही संख्या सात झाली. जतचे सदस्य विक्रम सावंत विधानसभेत गेल्याने त्यांची जागा रिकामीच राहिली तर शिराळ्याचे सत्यजित देशमुख आणि शारदा पाटील हे दोघे भाजपमध्ये गेल्याने काँग्रेसचे संख्याबळ आणखी घटले. एकूणच जिल्ह्यातील काँग्रेसची स्थिती पाहता जिल्हा परिषद निवडणुकीतही काँग्रेस फार मोठी झेप घेईल, असे दिसत नाही, परंतु भाजपमधील अंतर्गत वादाचा फायदा मिळून काँग्रेसच्या जागा वाढण्याची शक्यता आहे. काँग्रेसचे जिल्हा नेतृत्व कोण करणार हेच अनिश्चित असल्यामुळे ही निवडणूक कोणाच्या नेतृत्वाखाली पक्ष लढणार तेही स्पष्ट नाही. त्यामुळे नेत्यांमधील सुंदोपसुंदी पक्षाला अडचणीत आणणारी ठरण्याची शक्यता आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

Sangli wall collapse
mistaken identity police case
Usha Pawar’s Inspirational Journey: Success in SSC Exam at the Age of Sixty
Monsoon rain Weather imd Alert
Marathi News Esakal
www.esakal.com