
कृष्णा नदीच्या प्रदूषणामुळे आज मासे मेले आहेत, उद्या माणसे मरतील. जीवनवाहिनी कृष्णा नदीचे प्रदूषण थांबवा, स्वच्छ पाणी आमचा हक्क आहे.
Sangli News : 'सकाळ आहे सोबतीला'! एकच मिशन, थांबवा कृष्णा प्रदूषण; सांगलीत मानवी साखळीला उदंड प्रतिसाद
सांगली - कृष्णा नदीच्या प्रदूषणामुळे आज मासे मेले आहेत, उद्या माणसे मरतील. जीवनवाहिनी कृष्णा नदीचे प्रदूषण थांबवा, स्वच्छ पाणी आमचा हक्क आहे. एकच मिशन, थांबवा कृष्णा प्रदूषण, असा नारा देत सांगलीकरांनी आज कृष्णाकाठी मानवी साखळी केली.
सांगली, मिरज, सांगलीवाडी, हरिपूरसह कृष्णाकाठच्या गावांतून आलेल्या लोकांनी उदंड प्रतिसाद दिला. शाळकरी विद्यार्थी, युवती, महिला, पर्यावरण चळवळीतील लोकांचा सहभाग प्रदूषण प्रश्नी सांगलीकर गंभीर असल्याचे सूचित करणारा ठरला. नदी प्रदूषण मुक्तीसाठीच्या लोकलढ्याची ही सुरवात आहे, प्रदूषणाला कारणीभूत घटकांना वेळीच रोखा, अन्यथा याची व्याप्ती वाढत जाईल, असा इशारा संयोजक नागरीक विकास मंचने दिला. गेल्या एक महिन्यापासून नागरीक विकास मंचने या विषयावर जागृती केली, त्याची फलनिष्पत्ती म्हणून सांगलीकरांनी आयर्विन पूल ते महापालिका हातात हात गुंफत एकजूट दाखवली. ‘सकाळ’ने या लोकलढ्यात सक्रिय सहभाग घेत ‘सकाळ आहे सोबतीला’ असा नारा दिला.
सकाळी सातपासून कृष्णाकाठी लोक जमू लागले. हाती झेंडे घेऊन स्केटिंगपटून हरभट रोडवरून फेरी मारली. आवाहन करत जीप व रिक्षा फिरली आणि लोकांची संख्या वाढत गेली. टिळक चौकातून साखळी सुरु झाली, ती महापालिकेपर्यंत पोहचली. चौकात विविध घटकांनी एकजूट दाखवत घोषणा दिल्या. भाजीपाला खरेदीला आलेला सामान्य सांगलीकर, शाळकरी विद्यार्थी, गेली अनेक दशके निसर्ग संवर्धनासाठी राबणारे कार्यकर्ते, पत्रकार, लेखक, सामाजिक कार्यकर्ते, खेळाडू यांनी हातात हात गुंफत एकीचा नारा दिला. ‘एकच मिशन, हटवू कृष्णा प्रदूषण’, ‘नको मळी, नको नाला, आळा घाला प्रदूषणाला’, ‘पाणी आमच्या हक्काचं, नाही कुणाच्या बापाचं’, अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला.
मानवी साखळीत ठळक
- मनपा उपायुक्त राहूल रोकडे व उपप्रादेशिक प्रदूषण नियंत्रण अधिकारी नवनाथ अवताडे, रोहित मातकर यांनी स्विकारले निवेदन
- महिला, चळवळीतील कार्यकर्ते, विद्यार्थ्याच्या हस्ते दिले निवेदन
- डॉ. रवींद्र व्होरा यांनी दिली नदी प्रदूषण मुक्तीची शपथ
- प्रदूषणरुपी यमाच्या रुपातील सायकलपटू दत्ता पाटील ठरले लक्षवेधी
- स्केटिंग खेळाडूंनी केली झेंड्यासह रॅली
- गणपतराव आरवाडे हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, जिनिअस पब्लिक स्कूल, कोंडिबाई कुंडलिक साळुंखे हायस्कूल हरीपूर, डॉ. देशपांडे बाल विद्या मंदिर, नूतन मराठी विद्यामंदीर, राणी सरस्वतीदेवी कन्या शाळेचे विद्यार्थी सहभागी
- चला नदीला जाणूया उपक्रमाची जनजागृती
- गोपाळ मर्दा यांच्याकडून नागरिकांना चहा; के. डी. देसाई कंपनीच्या दीपेन देसाईंकडून मुलांना बिस्किट
- भाजीपाला विक्रेत्यांनी जागेवरून फलक दाखवत घेतला सहभाग
सहभागी संस्था
आभाळमाया फौंडेशन, डॉल्फिन नेचर ग्रुप, रोटरी क्लब, स्पंदन ग्रुप, शेतकरी संघटना, जायंट्स ग्रुप ऑफ सांगली पर्ल, स्वाभिमानी शेतकरी संघटना, संवाद ग्रुप, रेड स्वस्तिक ग्रुप, इन्साफ फौंडेशन, विसावा मंडळ, कृष्णामाई जलतरण संस्था, मराठा क्रांती मोर्चा, क्रेडाई, डब्ल्यूआरसी टीम, लाईफ केअर, मेक ऑन्स सोसायटी, लाईफ लाईन रेस्क्यू टीम, सांगली स्पोर्टस फौंडेशन, वृत्तपत्र विक्रेता संघटना, आरोग्य ग्रुप, ओम योगा ग्रुप, वुमेन्स एज्युकेशन सोसायटी, महापालिका अग्निशमन दल.
मोठा लोकसहभाग
माजी आमदार दिनकर पाटील, माजी आमदार नितीन शिंदे, नीता केळकर, नगरसेवक संतोष पाटील, उत्तम साखळकर, लक्ष्मण नवलाई, सुब्राव मद्रासी, भारती दिगडे, उर्मिला बेलवलकर, श्रीकांत तारळेकर, नारायण उंटवाले, प्रमोद चौगुले, महेश खराडे, अर्चना मुळे, मुस्तफा मुजावर, प्रा. आर. बी. शिंदे, डॉ. राजेंद्र भागवत, डॉ. मनोज पाटील, अजित उर्फ पापा पाटील, अजितकुमार पाटील, राजेंद्र मेढेकर, विजय पवार, आशिष कोरी, प्रसन्न कुलकर्णी, विशाल कुलकर्णी, दीपेन देसाई, रेखा पाटील, प्रणिता पवार, वैशाली कुलकर्णी, संजय पाटील, संजय चव्हाण, प्रा. एम. एस. राजपूत, रवींद्र खिलारे, वि. द. बर्वे, रवींद्र वळीवडे, विलास चौथाई, उत्तम आरगे, धर्मेंद्र खिलारे, विलास सुतार, डॉ. शिरीष काळे, डॉ. संजय पाटील, संजय शितोळे, प्रा. राणी यादव, राजा देसाई, धनेश शेटे, अमोल कणसे, विकास सूर्यवंशी, अमर चित्रे, चंद्रकांत सूर्यवंशी, रेखा पाटील, शलाका पवार, महादेव शेडगे, रामचंद्र देशपांडे, वाहिद बीडीवाले, नाथगोंड पाटील, भरत साजणे, दिपक चौगुले, विशाल पवार, राजू भावी, सतीश पवार, निलेश जगदाळे, अमोल पाटील, रितेश मोहिते, अभिमन्यु भोसले, हेगडे, शुभम चव्हाण, चेतन चौगुले, विलास शिंदे, राजकुमार बिरनाळे, निलेश हिंगमीरे, सतीश नीळकंठ, रविंद्र वादवणे, महावीर चव्हाण, दादा तामगावे, अशोक गोसावी, अस्मिता इनामदार, जया जोशी, विजय कडणे, किरण कांबळे, प्रसन्न कुलकर्णी, निगम शहा, राजू आवटी, सर्जेराव पाटील, प्रभाकर केंगार, प्रदीप वायचळ, शशिकांत ऐनापुरे, धनंजय वाघ, ॲड. अमोल बोळाज आदी सहभागी झाले.
शासन, प्रशासनावर हल्लाबोल
पीठाची चक्की बसवायची झाली तर प्रदूषण नियंत्रण मंडळाची परवानगी घ्यावी लागते. एवढी नदी प्रदूषित केली जातेय, त्यात वीष सोडले जातेय, तरी यंत्रणा गप्प कशी? आरोग्यासाठी कोट्यावधी रुपयांच्या योजना राबवतानाच रोग होऊच नये म्हणून पाणी शुद्ध देणे ही सरकारची जबाबदारी नाही का? पूर्वी नदीत उतरून ओंजळीने पाणी पिले जात होते. आज धाडस होईल? कॅन्सरचे रुग्ण वाढत आहेत, त्याचे कारण हे प्रदूषणच आहे. कुठल्याही औद्योगिक प्रकल्पाने एक थेंब पाणी बाहेर सोडायचे नाही, हा कायदाच आहे. त्यांचे कान वेळीच धरले पाहिजेत.
- राजू शेट्टी, माजी खासदार
‘कृष्णा नदीचे प्रदूषण हे कारखानदारीमुळे आहे. त्यामुळे शेतीचे नुकसान होते आहे. जनावरे, माणसांचे जीवन धोक्यात आहे. उद्योजकांचे नको तितके लाड झाल्याने ही अवस्था झाली आहे. पाणी शुद्ध झालेच पाहिजे. कृष्णा नदीच्या प्रदूषणाने माणूस, पशू सगळेच धोक्यात आहेत. मूठभरांचे लाड करताना ढीगभरांच्या आयुष्याशी तुम्ही का खेळताय?’
- रघुनाथदादा पाटील, शेतकरी नेते
‘कृष्णाकाठी जमलेली गर्दी ही प्रदूषण करणाऱ्यांना, त्यांना पाठीशी घालणाऱ्यांना खणखणीत इशारा आहे. राज्य शासनाने बैठका, प्रस्ताव, आराखड्यांत वेळ घालवू नये. तात्काळ उपाय योजना कराव्यात. पुढील आठ दिवसांत साखर कारखाने, डिस्टिरलीचे पाणी नदीत सोडणे बंद करावे. अन्यथा प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देऊ.’
- पृथ्वीराज पवार, संयोजक
‘सांगलीकरांचा मानवी साखळीतील सहभाग पाहून या विषयाची दाहकता सरकार लक्षात घेईल, अशी आशा आहे. जीवन मरणाच्या प्रश्नावर सांगलीकरांनी आज रस्त्यावर उतरून साद घातली आहे. आम्ही मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पर्यावरणमंत्री यांची लवकरच भेट घेऊ. शुक्रवारी मंत्रालयात झालेली बैठक ही या जनरेट्याचीच फलनिष्पत्ती आहे. ती केवळ कागदावर राहू नये.’
- सतीश साखळकर, संयोजक, नागरीक विकास मंच
दैनिक सकाळने केला पाठपुरावा..
या प्रश्नाचे गांभीर्य विधानसभेपर्यंत पोहोचवण्याचं काम दैनिक सकाळने केले आहे. हा विषय आता विधानसभेच्या पटलावर गेला आहे. कृष्णा नदीत मोठ्या प्रमाणावर मासे मृत्युमुखी पडले. याला जवाबदार असलेल्या संस्थेवर कारवाई झाली. सरकारी यंत्रणेवर जनतेचा रेटा निर्माण होण्यासाठी सकाळची भूमिका महत्त्वाची ठरली.