कृष्णेला दिलेला कचरा, पुराने केला परत; आता तरी व्हा जागे...

कृष्णेला दिलेला कचरा, पुराने केला परत; आता तरी व्हा जागे...

कृष्णा नदी सांगली शहरात घुसली. नुसती घुसली नाही, तर आपण टाकलेला प्रचंड कचरा, प्लॅस्टिक सारं पुन्हा आपल्या घरात टाकून गेली. घराची कचराकुंडी झाली. घर गुदमरू लागलं. दुखणं जुनं आहे, त्यावर काम झालं नाही. कचरा व्यवस्थापनाचे अपयश, हे यामागच्या प्रमुख कारणांपैकी एक आहे. कृष्णा नदी काय पोटात घेऊन धावते आणि पिण्याच्या पाण्याच्या रूपाने आपण काय पितो, याच्या पुराव्यांचा ढीग रस्त्यावर लागला आहे. या आपत्तीतून शहाणपण शिकायला हवं. 

महाप्रलयंकारी महापूर हे सांगलीवरील मोठे संकट ठरले. आता महापूर ओसरला, कृष्णा नदी पात्रात परतली; मात्र संकट संपलेले नाही. ते आ वासून सांगलीकरांच्या दारात उभे आहे. हे संकट म्हणजे कचऱ्याचा महापूर आहे. त्यामुळे दुर्गंधीचे साम्राज्य पसरले आहे. यातून आरोग्याचा गंभीर प्रश्‍न राक्षस रूप धारण करू शकतो, अशी भीती आहे. महापुरासंगे आलेला कचरा नदीत गेलाच कुठून? ते आपलेच पाप नव्हते का?

महापालिकेतील सत्ताधिकारी आणि प्रशासन या दोन्ही पातळ्यांवर गेल्या वीस वर्षांत ठोस असे काही झालेच नसल्याचा हा परिणाम असल्याचे जाणकार सांगतात. तीनवेळा महापालिकेने या विषयावर लाखो रुपयांचा खर्च करून अभ्यास केला. त्याची पुस्तकेही महापुरातून वाहून गेली. काम शून्य...

गेली सहा वर्षे महापालिकेत कचरा व्यवस्थापन या विषयावर गांभिर्याने चर्चा सुरू झाली. ती गंभीर एवढ्यासाठीच होती, की या विषयातून काहीतरी मोठे घबाड हाती लागेल, अशी अपेक्षा होती. अर्थात, कचरा या विषयावरील प्रयोग महापालिकेच्या स्थापनेपासून सुरू आहेत. लाखो रुपये खर्च करून त्यावर अभ्यास झाला. ‘डीपीआर’ तयार झाला, मात्र पुढे काही झाले नाही.

घनकचरा व्यवस्थापनात ओला व सुका कचरा वेगळा करणे; ओल्या कचऱ्यापासून खतननिर्मिती, सुक्‍या कचऱ्यावर प्रक्रिया करून ज्वलनशील पदार्थ बनवणे, याला प्राधान्य हवे, असे अभ्यासांती समोर आले. अभ्यास संपला, मात्र काम झाले नाही. मनपात आता रिक्षा घंटागाड्या, औषध फवारणी साहित्य आदिंची खरेदी झाली आहे, मात्र या विषयाकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची मानसिकता दिसत नाही. सत्ताधारी, प्रशासन दोन्ही उदासीन आहेत. 

गटारीत कचरा थेट येतो कसा?
घरगुती आणि व्यापारी दोन्ही प्रकारच्या कचऱ्याचे शंभर टक्के व्यवस्थापन होत नाही, हे कुणी नाकारण्याचे कारण नाही. नाकारले तरी सांगलीच्या पेठांत घुसलेली कृष्णामाई पुरावा मागे ठेवून पात्रात गेली आहे. प्रचंड प्लॅस्टिक... आलं कुठून? बेकरी, हॉटेल, हातगाडेवाले... या लोकांचा कचरा जातो कुठे? रात्री शटरडाऊन करताना त्यांच्यावर कॅमेरे लावा. झोपडपट्ट्यांत घंटागाडी किती फिरते. त्यांचा कचरा कुठे जातो? विजयनगरच्या गटारी तपासून घ्या. रोज टनभर प्लॅस्टिक या एका भागात गटारीत पडतो, असे वास्तव आहे. 

चार दिवसांत उचलला २ हजार टन कचरा
मागील चार दिवसांत महापालिकेच्या यंत्रणेने सुमारे दोन हजार २ टन कचरा उचलला असून, आणखी २ हजार टन कचरा उचलण्याचे आव्हान आहे. पावसाने दिलेल्या उघडिपीमुळे थोडा दिलासा मिळाला असला; तरी पुन्हा पाऊस सुरू होण्याआधी हा कचरा उचलावा लागणार आहे. महापालिका यंत्रणेशी नित्य समन्वय ठेवून नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्त नितीन कापडणीस यांनी केले आहे.

संकटकाळात कचऱ्याचे ढिग जमले आहेत. मनपाने नालेसफाई, घनकचरा व्यवस्थापनाचे काम सुरू केले आहे. कचरा व्यवस्थापनात मोठी सुधारणा हवी, हे आम्ही नाकारत नाही. शहराचे आरोग्य चांगले ठेवले पाहिजे. त्यासाठी आराखडा बनवला जातोय. मनपाचे ४५ कोटी आणि राज्य शासनाचा निधी मिळून मोठे काम उभे करू. हा विषय महापालिका प्राधान्याने हाती घेईल.
- संगीता खोत,
महापौर, सांगली

मी मागील एक वर्षाहून अधिक काळ सांगलीत स्वच्छता मोहीम राबवतोय. मला सर्वाधिक आढळला तो प्लास्टिक कचरा. नाले का तुंबतात, याचे स्पष्ट कारण हे प्लास्टिक आहे. बाटल्या, पिशव्या, कॅरिबॅग...  यादी प्रचंड आहे. घनकचरा ड्रेनेजमधे आला, तर ते वाहते राहीलच कसे?
- राकेश दड्डणावर, 

निर्धार संघटना, सांगली

स्वच्छता यंत्रणेशी समन्वय साधा
नागरिकांनी टॉलीभर कचरा एकत्रित झाल्यानंतर महापालिकेच्या यंत्रणेशी संपर्क साधून तो थेट टॉलीत टाकण्यासाठी सहकार्य करावे. स्वच्छता मोहीम झाल्यानंतर कचरा पुन्हा रस्त्यावर आणून टाकला जात असल्याने तो उचलला जात नाही. त्याऐवजी नागरिकांनी स्वच्छता यंत्रणेशी समन्वय साधावा. त्यासाठी खालील क्रमांक देण्यात आले आहेत.
 गणेश शिंदे- मुख्याधिकारी (९८८१०२५४६४, ९५१८७६०५२८) 
 अतुल पाटील - मुख्याधिकारी (७८४१०९०३४०, ७०३८८२३०३०) 
 डॉ. सुनील आबोळे, आरोग्य अधिकारी (९६५७७०९१६४)

स्वच्छतेसाठी योगदान द्या
महापालिका क्षेत्रातील स्वच्छता कार्यासाठी मोठ्या संख्येने स्वयंसेवी कार्यकर्त्यांची गरज आहे. त्यांना महापालिकेच्यावतीने स्वच्छता साहित्य दिले जाईल. इच्छुकांनी जनसंपर्क कार्यालयाशी संपर्क साधावा.
संपर्क क्रमांक ः श्री हर्षद-९९२२४१६०१४
आपत्ती व्यवस्थापनाशी संपर्क साधा
आपत्ती व्यवस्थापन विभाग सांगलीतील काळ्या खणीजवळील आर. सी. एच. कार्यालयात सुरू केला आहे. हे कार्यालय २४ तास कार्यरत असून मदतीसाठी संपर्क साधा. संपर्क क्रमांक - ८०८००८३४२६, ८०८००७६६२५,  ८०८००७२६२५,  ८०८००७६५९८

सफाई कर्मचाऱ्यांची फौज
महापालिकेचे ६८७ तर अन्य विविध महापालिका व नगरपालिकांकडून आलेलीही कर्मचारी सध्या स्वच्छता कार्यात व्यस्त आहेत. बृहन्मुंबई महापालिकेचे ४२० कर्मचारी शहरात दाखल झाले असून, त्याशिवाय आष्टा, पाचगणी, पिंपरी चिंचवड, उस्मानाबाद, ठाणे, बिव्हीजी ग्रुप, पंढरपूर, महाबळेश्‍वर, फलटण, लोणावळा, तासगाव, विटा, इस्लामपूर, पुणे, कवठेमहांकाळ, शिराळा, सातारा पालिकांचे असे एकूण ७८३ कर्मचारी कार्यरत आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com