Gram Panchayat Election : सत्तेसाठी काँग्रेस,भाजप व राष्ट्रवादीमध्येच रस्सीखेच

तालुक्यातील ४५ पैकी ४३ ग्रामपंचायतींचा पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण झाल्याने या ४३ ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमले गेले आहेत
Gram Panchayat Election
Gram Panchayat Electionsakal

कडेगाव : तालुक्यातील ४५ पैकी ४३ ग्रामपंचायतींचा पाच वर्षांचा कार्यकाल पूर्ण झाल्याने या ४३ ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमले गेले आहेत. त्यामुळे या गावात आता निवडणुकीचे वारे वाहू लागले असून, या ग्रामपंचायतीची सत्ता काबीज करण्यासाठी काँग्रेस, भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसमध्येच रस्सीखेच पाहायला मिळणार आहे. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते व आमदार डॉ. विश्वजित कदम, भाजपचे नेते संग्रामसिंह देशमुख व राष्ट्रवादीचे नेते व पदवीधर आमदार अरुण लाड यांचा तालुक्यात संपर्क वाढला असून, त्यामुळे कार्यकर्ते चांगलेच रिचार्ज झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.

तालुक्यातील ज्या ४३ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होणार आहेत. तालुक्यात काँग्रेस व भाजप हे दोन पक्ष तुल्यबळ आहेत; तर राष्ट्रवादी काँग्रेस येथे नव्याने पक्ष बांधणी करीत आहे. आपल्या पक्षाची सत्ता येईल, यासाठी माजी मंत्री व आमदार डॉ. विश्वजित कदम यांनी जोरदार ताकद लावली आहे. त्यांनी आतापासूनच तालुक्यात विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्‌घाटनांचा धडाका लावला आहे. गावोगावी कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी सुरू केल्या आहेत; तर ग्रामपंचायत निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून भाजप व राष्ट्रवादीमधील अनेक कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये पक्ष प्रवेशाचाही धडाका लावला आहे. काँग्रेस तालुक्यात नंबर वन कसा राहील यासाठी रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकार जाऊन आता भाजप-शिंदे गटाची सत्ता आली आहे. त्यामुळे भाजप आता ड्रायव्हिंग सीटवर येण्याची जोरदार तयारी करीत आहे; तर भाजपचे जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख व जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनीही ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर विविध विकासकामांचे भूमिपूजन व उद्‌घाटनांचा धडाका लावला आहे. तसेच तालुक्यात विविध कार्यक्रमांना हजेरी लावत आपला जनसंपर्क वाढवला असून, निवडणुकीचीच तयारी सुरू केली आहे. अशा रीतीने राज्यात सत्तेत असलेल्या भाजपने आता तालुक्यातील जास्तीत जास्त ग्रामपंचायतीवरही कमळ कसे फुलेल यासाठी आतापासूनच प्रयत्न चालवले आहेत.

याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेसही तालुक्यात नव्याने हातपाय पसरू पाहत आहे. राष्ट्रवादीचे नेते व आमदार अरुण लाड व जिल्हा परिषदेचे गट नेते शरद लाड यांनी तालुक्यात नव्याने राष्ट्रवादीची बांधणी सुरू केली आहे.

भाजप व काँग्रेसमधील नाराज मंडळींनी आपल्या हातात घड्याळ बांधले असून, त्यांनी आस्ते कदम का असेना; पण तालुक्यात जुळवाजुळव सुरू केलेली आहे. त्यामुळे राष्ट्रवादी तालुक्यात चांगलीच मूळ धरू लागली आहे. आता ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अरुण लाड व शरद लाड हे तालुक्यातील विविध कार्यक्रमांना हजेरी लावत आहेत.

आमदार फंडातून विविध विकासकामांनाही त्यांनी निधी देत तालुक्याच्या विकासाला हातभार लावण्याचा प्रयत्न केला आहे. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठीही जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. सध्या पक्षाची ताकद कमी असली तरी तालुक्यातील ४३ ग्रामपंचायत निवडणुकीत उतरण्याची राष्ट्रवादीची व्यूहरचना सुरू असल्याचे बोलले जात आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ही निवडणूक महत्त्वाची मानली जात आहे. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीसाठी काँग्रेस, भाजप व राष्ट्रवादी आपली ताकद पणाला लावेल; असे चित्र पाहायला मिळत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com