Sangli : कोल्हापूर-सांगली महामार्ग मृत्यूचा सापळा

कोल्हापूर-सांगली मार्गाचे कवित्व; शिरोली-उदगाव भूसंपादन रखडले
सांगली
सांगली sakal
Updated on

जयसिंगपूर : कोल्हापूर-सांगली जिल्ह्यातील वाहनधारक दरवर्षी केंद्र आणि राज्य सरकारला कररूपाने सुमारे पाच हजार कोटी रुपये देतात; पण तरीही कोल्हापूर-सांगली महामार्गाचे शुक्लकाष्ट काही केल्या संपत नाही. रस्ता मोठा करा, तो सुस्थितीत असावा, या मार्गावरील टोलवसुली बंद करा, अशा प्रत्येक टप्प्यासाठी वाहनधारकांनी संघर्षच केला आहे. तरीही या महामार्गावरील मरणवाटांचा अनुभव काही केल्या संपत नाही, ही वस्तुस्थिती आहे.

कोल्हापूर-सांगली मार्गाचा रत्नागिरी-नागपूर महामार्गात समावेश होऊनही आठ वर्षे उलटली आहेत. रत्नागिरीपासून शिये, भुयेपर्यंत; तर सांगली जिल्ह्यातील अंकलीपर्यंत भूसंपादनाची प्रक्रिया झाली आहे; पण शिरोली-उदगावपर्यंत भूसंपादनाचे भिजत घोंगडे कायम आहे. शिरोली-उदगावपर्यंतचा महामार्ग महापुराखाली जातो. पूरबाधित महामार्गावर उड्डाणपुलाची उभारणी करता येईल का, यादृष्टीने विचार सुरू आहे.

दहा वर्षांपूर्वी शिरोली-सांगली मार्गाच्या चौपदरीकरणाचा मुद्दा जिव्हाळ्याचा बनला होता. वाढते अपघात, जाणारे बळी, होणारे नुकसान यामुळे चौपदरीकरणाच्या मागणीसाठी आंदोलनांचीही मालिका सुरू होती. कालांतराने हा मार्ग रत्नागिरी-नागपूर महामार्गात समाविष्ट झाला. काही काळ रस्त्यांच्या कामांना चांगली सुरुवातही झाली. नंतरच्या काळात भूसंपादनापासून इतर कामे रेंगाळली. महामार्गासाठी सांगली जिल्ह्यात भूसंपादन झाले आहे. अंकलीपर्यंतचा रस्ताही चांगला तयार झाला. मात्र, शिरोली-उदगावपर्यंत भूसंपादन रखडले आहे.

यातच मार्गावर महापुराचे पाणी येत असल्याने कोट्यवधी रुपये खर्च करून तयार केलेला मार्गही महापुराच्या काळात ठप्प राहू शकतो, ही बाब लक्षात आल्यावर अन्य पर्यायांवर चर्चा सुरू झाला. तीन-चार वर्षांपासून यावर केवळ चर्चाच झडत आहेत. या काळात खराब रस्त्यांमुळे अपघातात अनेकांचे बळी गेले. शिरोली फाटा ते सांगली महामार्गावर बीओटी तत्त्वावर अनेक वर्षे टोल आकारणी करण्यात आली. मुदत संपल्यानंतरही टोलवसुली सुरू असल्याने काही पक्ष आणि वाहनधारकांनी उदगाव टोल नाका उद्‍ध्वस्त केला होता. तेव्हापासून आजतागायत महामार्गावर खड्ड्यांनी वाहनधारकांना अक्षरशः जेरीस आणले आहे.

पूरग्रस्त भागात उड्डाणपूल

कोट्यवधी रुपये खर्चून रत्नागिरी-नागपूर अंतर्गत सांगली-कोल्हापूर महामार्ग साकारत आहे. मात्र, पावसाळ्यात शिरोली-अंकली मार्गावर पुराचे पाणी येते. त्यामुळे बऱ्याचदा दोन-दोन आठवडे रस्ता पाण्याखाली जातो. मार्गावरील वाहतूक पूर्णपणे ठप्प होते. यावर उपाय म्हणून पूरबाधित रस्त्यांना उड्डाणपुलाने जोडण्याचाही विचार आहे.

पर्यायी मार्गाचाही विचार

खर्च, अंतर व पुराचा धोका लक्षात घेऊन बोरपाडळीमार्गे रस्ता वळविण्याच्या दुसऱ्याही पर्यायाची चाचपणी सुरू होती. या अंतर्गत उमळवाड, दानोळी, कुंभोज, वडगाव, वाठार, पारगाव, वारणानगर, कोडोली, बोरपाडळीमार्गे मार्ग वळविण्याचाही प्रयत्न सुरू होता.

निधी मुरतो कुठे?

कोल्हापूर-सांगली महामार्ग दुरुस्तीसाठी वारंवार निधी मिळतो. मात्र, कायमस्वरूपी खड्ड्यांचे शुक्लकाष्ठ काही संपत नाही. बऱ्याचदा माती टाकून खड्डे बुजविले जातात आणि लोकांचा रोष कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. त्यामुळे येणारा कोट्यवधींचा निधी मुरतो कुठे, हा प्रश्न वाहनधारकांना पडला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

MD Drugs Replace Gang Rivalries: Organized Crime Network Tightens Grip in Western Maharashtra
Anjali Vetal from Karad wins bronze medal at U-15 Asian Wrestling Championship in Thailand
Wildlife rescuer trapped by rat snake
Why are Sangli farmers opposing the Shaktipeeth Highway?
Marathi News Esakal
www.esakal.com