सांगली : हाती सत्ता, तरीही राष्ट्रवादीत अस्वस्थता

मिरज विधानसभेचा सात-बारा खिशात घेऊन फिरणाऱ्या आणि सांगली विधानसभेवर दावा सांगणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला या दोन्ही शहरांत अंतर्गत गटबाजीने घेरले आहे.
NCP
NCPsakal
Summary

मिरज विधानसभेचा सात-बारा खिशात घेऊन फिरणाऱ्या आणि सांगली विधानसभेवर दावा सांगणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला या दोन्ही शहरांत अंतर्गत गटबाजीने घेरले आहे.

सांगली - मिरज विधानसभेचा सात-बारा खिशात घेऊन फिरणाऱ्या आणि सांगली विधानसभेवर दावा सांगणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसला या दोन्ही शहरांत अंतर्गत गटबाजीने घेरले आहे. पालकमंत्री जयंत पाटील यांच्या जवळचा गट आणि जे जवळ आहेत, त्यांच्यापासून सुरक्षित अंतर राखण्याची ‘मजबुरी’ असलेला दुसरा गट अशी सरळ दुफळी निर्माण झाली आहे. ही वरवर राहिलेली नाही. त्यात, कार्यालयाच्या वाटणीपासून ते कार्यालयीन सचिवावर नियंत्रणापर्यंत सगळा सावळा गोंधळ उडाला आहे. त्यातूनच एका पदाधिकाऱ्याला सांगलीत मारहाण झाली; तर मिरजेत नगरसेवक योगेंद्र थोरात यांना डावलून ‘महापौर दारी’ गेले. त्यामुळे सत्ता असूनही राष्ट्रवादीत अस्वस्थता आहे.

राज्यातील सत्ता गेल्यानंतर शुकशुकाट असलेल्या राष्ट्रवादीच्या कार्यालयांत गर्दी वाढली खरी; मात्र सत्तेसोबतची दुखणी अंगाला लागली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या सांगली, मिरज आणि कुपवाड शहरातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांमधील सुंदोपसुंदी चव्हाट्यावर आली आहे. महापौर आणि नगरसेवकांतील कुरघोड्या वाढल्या आहेत. सांगलीत पदाधिकाऱ्याला मारहाण झाली, त्यापाठोपाठ ‘महापौर आपल्या दारी’ या कार्यक्रमाची खिल्ली उडवत नगरसेवक योगेंद्र थोरात यांनी बंडाचा झेंडा फडकावला आहे. त्यांना डावलून कार्यक्रम झाल्याची सल ते बोलून दाखवत आहेत.

जिल्हा परिषदेसमोर राष्ट्रवादीचे स्वमालकीचे जिल्हा कार्यालय आहे. दुसरीकडे, जयंतराव पालकमंत्री झाल्यापासून पक्षाची बहुतांश प्रमुख धोरणे वसंत कॉलनीतील जयंतरावांच्या बंगलावजा (आरआयटी) कार्यालयातून होत आहेत. वसंत कॉलनीतील या बंगल्यातील धोरणांवर जयंतरावांच्या जवळच्या गटाची छाप आहे. त्यातील एक नेता राष्ट्रवादीतील मोठ्या गटासाठी अवघड जागेचे दुखणे झाले आहे. हा वाद हळूहळू वर येतो आहे. त्यातून कार्यकर्त्यांमध्ये संभ्रमावस्था आहे. हा वाद मिटवायचा कुणी? अर्थातच जयंतरावांनी... पण ते याकडे तूर्त तरी कानाडोळा करत आहेत.

राष्ट्रवादीला वाद नवा नाही. नगरसेवकाकडे दुर्लक्ष करून त्याची अवहेलना असेल किंवा पदाधिकाऱ्याला मारहाण असेल, हे पक्षाने किती गांभीर्याने घेतले आहे, हे काळच ठरवेल. हे सगळे वाद अनेकदा प्रदेशाध्यक्ष आणि पालकमंत्री जयंत पाटील, जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील यांच्यापर्यंत जातात. त्याचे पुढे काय होते? मिरजेत तर जयंतरावांनी आधी इद्रिस नायकवडी यांना ताकद दिली होती. त्यानंतर त्यांनी मैनुद्दीन बागवान यांच्या खांद्यावर हात ठेवला. मिरज शहरात राष्ट्रवादी बळकट करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. तो फार काही यशस्वी होताना दिसत नाही. राष्ट्रवादी पक्षाला मिरज शहरात अडचणी निर्माण झाल्या आहेत. त्यातच योगेंद्र थोरात आणि नगरसेविका स्वाती पारधी यांच्यासारख्या कार्यकर्त्यांनी तर राष्ट्रवादीत राहून सवतासुभा निर्माण केला आहे. नगरसेविका संगीता हारगे, मिरज शहराध्यक्ष अभिजित हारगे यांची इतरांशी असलेली धुसफूस जगजाहीर आहे. महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी नगरसेविका हारगे यांच्या उपस्थितीत ‘महापौर आपल्या दारी’ कार्यक्रम घेऊन त्यात भर घातली. या वादांकडे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अद्याप गांभीर्याने लक्ष दिले नसल्याचे दिसते. त्याचे पडसाद आगामी निवडणुकांमध्ये उमटू शकतात.

लोकांच्या प्रश्नांकडे लक्ष कधी?

जयंत पाटील यांनी महापालिकेतील भाजपच्या सत्तेला दणका देत ‘महापौर आपल्या हाती’ कार्यक्रम घेतला खरा; मात्र त्यातून या तीन शहरांच्या प्रश्‍नांची सोडवणूक हा प्राधान्यक्रम दिसत नाही. त्याऐवजी सत्तेसोबतची दुखणी आणि अंतर्गत वादानेच डोकेवर काढले आहे. सांगलीकरांनी हा खेळ किती काळ बघत बसायचा, लोकांच्या प्रश्‍नांवर नगरसेवक कधी आक्रमक होणार, हा प्रश्‍न आहेच.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com