10 फेब्रुवारीपर्यंत ठरणार 152 गावांचा कारभारी

Sarpanch of 152 villages of Sangali will be decided February 10
Sarpanch of 152 villages of Sangali will be decided February 10

सांगली : मिनी मंत्रालय म्हणून ओळख असणाऱ्या जिल्ह्यातील 152 गावांच्या गावगाडा सांभाळणाऱ्या सरपंच अर्थात कारभाऱ्याची निवड येत्या 10 फेब्रुवारीपर्यंत होणार आहे. जिल्ह्यातील 699 ग्रामपंचायतींसाठी सरपंच पदाच्या आरक्षण सोडत झाल्यामुळे सरपंचपदी कोणाची वर्णी लागणार याकडे आता गावागावात चर्चा सुरू झाली आहे.

आरक्षित राखीव जागांवर सरपंचपदाचे इच्छुक स्पर्धक कमी, तर खुल्या आणि महिलांसाठी राखीव जागांवर इच्छुकांची संख्या मोठी आहे. यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न स्थानिक पातळीवर सुरू झाले आहेत. इच्छुकांची मोर्चेबांधणी, विरोधी गटातील सदस्यांशी संपर्क, तोडफोडीच्या घटना यापुढे दहा दिवस चालू राहणार आहेत. 

राज्यात भाजप-सेना सरकार सत्तेवर आल्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यात थेट सरपंच निवडीचा नियम केला. यामुळे तीन वर्षांपूर्वी झालेल्या निवडणुकीत राज्यभर त्या पद्धतीने निवडी झाल्या. गेल्या वर्षी राज्यात महाविकास आघाडीची सत्ता आल्यानंतर आपली लोकशाही प्रातिनिधीक असल्याचे स्पष्ट करीत पुन्हा जुन्या पारंपरिक पद्धतीने सरपंच निवड सदस्यांतूनच करण्याचा निर्णय झाला. याच धर्तीवर राज्यातील साडेचौदा हजार ग्रामपंचायतींच्या निवडणुका नुकत्याच झाल्या. निवडणूक निकालानंतर सरपंच पदाचे आरक्षण काढण्यात आले. यावरूनही राज्यात काही प्रश्‍न उपस्थित झाले. सरपंच पदासाठी अखेर शनिवारी जिल्ह्यातील सर्व गावांसाठी आरक्षण काढण्यात आले. त्यानंतर सरपंच पदासाठी इच्छुकांनी आता मोर्चेबांधणी सुरू केली आहे. 

जिल्ह्यातील 699 ग्रामपंचायतींसाठी आरक्षण शनिवारी जाहीर झाले. नुकत्याच झालेल्या 152 ग्रामपंचायतींसह दुसऱ्या तसेच पुढील टप्प्यात होणाऱ्या ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. सरपंच निवडीच्या तारखांकडे लक्ष होते. जिल्हाधिकारी कार्यालयातून याबाबत लवकरच अधिकृत कार्यक्रम जाहीर केला जाणार आहे. 

जिल्ह्यातील सरपंच आरक्षण (कंसात महिलांची संख्या) 

  • एकूण ग्रामपंचायती : 699 
  • खुला प्रवर्ग : 423 (204) 
  • मागास प्रवर्ग : 189 (98) 
  • अनुसूचित जाती : 83 (44) 
  • अनुसूचित जमाती : 4 (2) 

कोणत्या पक्षाकडे किती ग्रामपंचायती 

  • भाजप : 34 
  • कॉंग्रेस : 33 
  • राष्ट्रवादी : 29 
  • शिवसेना : 17 
  • स्थानिक आघाडी : 39 

(यावरून राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडीकडे 79 ग्रामपंचायती असल्याचे स्पष्ट होते.) 

सरपंच निवड कार्यक्रम 

  • क्रार्यक्रम जाहीर होणार : 1 फेब्रुवारी 
  • एकूण ग्रामपंचायती : 152 
  • तालुकानिहाय गावांची संख्या : पलूस- 14, कडेगाव- 9, तासगाव-39, कवठेमहांकाळ-11, जत- 30, खानापूर- 13, आटपाडी-10, मिरज- 22, पलूस,-02, कडेगाव-02. 

संपादन : युवराज यादव

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com