या शहरात ३१ मे पर्यंत जनता कर्फ्यू, सर्व व्यवहार राहणार बंद

या शहरात ३१ मे पर्यंत जनता कर्फ्यू, सर्व व्यवहार राहणार बंद

वाई ः तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील जांभळी व जोर खोऱ्यातील आठ, तर पूर्व भागातील तीन गावांत कोरोना विषाणूचा संसर्ग पोचला असून, मागील दोन दिवसांत ग्रामीण भागातील कोरोना बाधितांची संख्या 25 वर पोचली आहे. सिद्धनाथवाडी येथील एका 24 वर्षीय रिक्षाचालकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरात कोरोनाने शिरकाव केल्याचे स्पष्ट झाले आहे. तालुक्‍याच्या पश्‍चिम भागातील मालतपूर प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्ण वाहिकेवरील 24 वर्षांच्या चालकाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने शहरासह ग्रामीण भागातील चिंता वाढली आहे. 

सिद्धनाथवाडीतील रिक्षाचालक एका महिलेला गावी सोडण्यासाठी गेला होता. या महिलेचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने रिक्षाचालकाला क्वारंटाइन करण्यात आले होते. दरम्यान, तालुक्‍यातील कोरोनाच्या वाढत्या रुग्ण संख्येच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविध व्यापारी संघटनांनी आजपासून 31 मेपर्यंत जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेतला आहे. 

गेल्या गुरुवारी (ता. 21) तालुक्‍यात पश्‍चिम भागात आसरे गावात पहिला कोरोना पॉझिटिव्ह आढळला. त्याच्या दुसऱ्या दिवशी वासोळे येथे, तिसऱ्या दिवशी दह्याट व पूर्व भागातील देगाव गावात कोरोना शिरला. चौथ्या दिवशी आसले, आसरे, वासोळे या तीन गावांत पाच रुग्ण आढळले. सोमवारी (ता. 25) त्यामध्ये परतवडी येथील एकाच कुटुंबातील तीन, दह्याट गावात चार, धावडी गावात दोन आणि आकोशीत एक, जांभळीत एका रुग्णाची भर पडली आहे. पैकी आसले येथील 67 वर्षांची महिला व जांभळी येथील 52 वर्षांच्या पुरुषाची भर पडली. यापैकी आसले येथील महिलेचा, आसरे येथील 67 वर्षांच्या व जांभळी येथील एका पुरुष अशा तिघांचा मृत्यू झाला आहे. 

मंगळवारी (ता. 26) आकोशी, आसले, देगाव, दह्याट येथे आणखी एकेक रुग्णाची भर पडली. मालतपूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्णवाहिकेवरील चालकाचा आणि शहरात सिद्धनाथवाडी येथील रिक्षाचालकाचा अहवाल कोरोनाबाधित आला असून, या दोन्ही ठिकाणी नवीन रुग्ण आढळल्याने प्रशासन यंत्रणा खडबडून जागी झाली आहे. दरम्यान, सिद्धनाथवाडी व मालतपूर गावाचा संपूर्ण परिसर प्रतिबंधित केला असून, त्याठिकाणी औषध फवारणी करण्यात आली आहे. घरोघरी जाऊन सर्व्हे करण्यात येत असल्याची माहिती सूत्रांनी दिली. तहसीलदार रणजित भोसले, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. संदीप यादव, गटविकास अधिकारी उदयकुमार कुसुरकर, पोलिस निरीक्षक आनंदराव खोबरे, मुख्याधिकारी विद्यादेवी पोळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेट देऊन प्रतिबंधात्मक उपाय हाती घेतले.
 
कोरोनाचा शहरात शिरकाव झाल्याने आणि तालुक्‍यातील प्रादुर्भाव वाढत असल्याने शहरातील किराणा, कापड, रेडिमेड, भांडी, वाईनशॉप व बिअरबार व अन्य व्यावसायिक संघटनांनी ता. 28 पासून 31 मेपर्यंत सर्व दुकाने बंद ठेऊन जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेतला आहे. या बंदमधून औषध दुकाने व इतर अत्यावश्‍यक सेवा वगळण्यात आल्या असून, त्या सुरू राहणार आहेत. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com