खाल्ले तर सारेजण खाऊ...नाहीतर सगळेच उपाशी मरु

खाल्ले तर सारेजण खाऊ...नाहीतर सगळेच उपाशी मरु

कास (जि.सातारा) : सर्वत्र रेशनींग धान्य दुकानाविषयी व मिळणारे धान्य या विषयी तक्रारी चालू असताना दुर्गम भागात राहणार्या धावली - भांबवलीने मात्र शासनाकडून मिळालेले धान्य सर्वांनी वाटून घेऊन अडचणीच्या काळात समूह जीवनाचा आदर्श सर्वांसमोर ठेवला आहे. 

मार्चमध्ये कोरोनाची भीती वाढली तशी धावली, भांबवली गावांतील मुंबई स्थित गावकरी मिळेल त्या वाहनाने गावाकडे पोहोचले. मुंबईत छोटी-मोठी नोकरी करून पोट भरणारे हे गावकरी प्रति व्यक्ती दाेन हजार भाडे देऊन जीव वाचवायला गावात आले. होते ते सर्व पैसे गाडी भाडयात व घरातील साहित्य घेण्यातच खर्च झाले होते. मार्च महिना संपला नसल्याने कोणाचेही पगार झाले नव्हते. गावात आश्रयाला घर आहे, पण वन्यप्राण्यांच्या भीतीने शेती बुडाली आहे. राने ओस पडली आहेत. मुंबईवरून आणलेले रेशन संपत आले आहे. खिशात पैसा नाही. दळणवळण बंद आहे. लाॅकडाऊन वाढत गेले तर खायचे काय, लेकरांना जगवायचे कसे हे प्रश्न पडले आहेत. अशा परिस्थितीत पंतप्रधान गरीब कल्याण योजने अंतर्गत शासनाचा रेशनिंगचा ट्रक तांदुळ घेऊन गावात येतो.

हे तांदुळ गावातील ऑनलाईन रजिस्टर्ड शिधापत्रिका धारकांनाच दिले जाईल असे लक्ष्मण कोकरे या रेशनिंग दुकानदाराने सांगितले. यावर धावली व भांबवली ग्रामस्थांनी एकत्र बसुन चर्चा केली. रेशनिंग हे फक्त ऑनलाईन रजिस्टर्ड शिधापत्रिका धारकांनाच मिळणार असेल तर ते आम्हाला नको. सर्वांना रेशनिंग मिळाले पाहिजे, सर्वांची पोट भरली पाहिजे अशी सर्वसामान्य धावली- भांबवली ग्रामस्थांची भावना होती. खायच तर सर्वांनी नाहीतर सर्वांनी उपाशी राहायचे. सर्व संमतीने निर्णय झाला की शिधापत्रिका धारकांना आलेले तांदुळ सर्वांनी सारखेच वाटुन घ्यायचे. मात्र रेशनिंग दुकानदार सर्व तांदुळ समान दयायला तयार नव्हता. शिधापत्रिका धारकांनी आपल्या हिश्यातील तांदुळ ऑनलाईन शिधापत्रिका नसलेल्यांना दयायचे मान्य केले होते, पण रेशन दुकानदार असे करायला तयार नव्हता.

ऑनलाईन शिधापत्रिका धारकांनी त्यांच्या वाटयाचे तांदुळ घेतले व सर्वांचे तांदुळ गावच्या मंदिरात एकत्र केले व गावातील सर्वांना समान वाटण्यात आले. ऑनलाईन शिधापत्रिका धारकांची चुल पेटली पाहिजे तशी ऑनलाईन शिधापत्रिका नसलेल्या गावक-यांची देखील चुल पेटली पाहिजे हि सर्वसामान्य भावना होती. अडी-अडचणीच्या काळात एकमेकांना कशाप्रकारे सहकार्य केले पाहिजे, माणुसकी दाखविली पाहिजे हे आपल्या वर्तणुकीने धावली व भांबवली ग्रामस्थांनी सर्वांना दाखवुन दिले आहे.

रेशनिंग आणायला जाता ? मग आधी हे वाचा...

Lockdown : सातारा जिल्ह्यासाठी स्वतंत्र मार्गदर्शक तत्त्वे : शेखर सिंह

Video : आई तुझ लेकरु...मन हेलावणारी ही बातमी वाचाच 

Video : देवा सारखी माणसे मला भेटली





ग्रामीण भागातील लोक हे भावुक असुन नीतीमुल्यांची जपणुक करतात. वाटुन खाण्याची पध्दत हे ग्रामीण भागाचे वैशिष्ट आहे. हि इतर गावांसाठी एक प्रेरणा ठरेल. जिल्हाधिकारी शेखरसिंह व तहसिलदार आशा होळकर यांनी या कठीण काळात सहानुभूतीपुर्वक विचार करावा व सर्वांना रेशनिंग मिळवुन दयावे अशी विनंती आहे. 

रविंद्र बळीराम मोरे, समाजसेवक- भांबवली 

बरेच शिधापत्रिका ऑनलाईन नसल्याने, रेशनिंग मिळत नाही. लाॅक डाऊनमुळे दळणवळण बंद आहे. त्यामुळे सातारला जाऊन शिधापत्रिका ऑनलाईन करता येत नाहीत. तरी ऑनलाईन नसलेल्या शिधापत्रिकांवर रेशनिंग मिळावे. लोकांकडे पैसे नाहीत व धान्यसुध्दा संपत आले आहे. शासनाने शिधापत्रिका धारकांसोबत इतरांना देखिल रेशनिंग दयावे. कार्ड नसलेली सुध्दा माणसेच आहेत, त्यांना पण जगविले पाहिजे.
दिनकर जाधव, सरपंच- धावली  
 

 
 

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com