ती वेश्‍या म्हणाली, लाख रुपये दिलात तरी..!

prostitute
prostitute
Updated on

सांगली ः एक बडी पार्टी गोकुळनगर वेश्‍या वस्तीत आली. नेहमी जिच्याकडे जायची तिकडे गेली. तिला "हवे तेवढे पैसे देतो', असे म्हणाली. तिने स्पष्ट शब्दांत त्याला नकार दिला. ती म्हणाली, ""तू लाख रुपये देतो म्हणालास तरी माझ्या घराचा उंबरा तुला ओलांडता येणार नाही. मला माझा जीव प्यारा आहेच आणि हो, तुझा जीवही... तू केवळ आमचं ग्राहक नाहीस, आमच्या जगण्याचा आधार आहेस. तू जग, आम्ही जगतो.''

गोकूळनगर, मिरज आणि परिसरात वेश्‍या व्यवसाय करणाऱ्या महिलांची लॉकडाऊनच्या काळात काय अवस्था आहे, हे जाणून घेण्यासाठी "सकाळ'ने त्यांच्याशी संवाद साधला. संग्राम संस्थेचे शशिकांत माने यांनी मोबाईल कॉन्फरन्सव्दारे किरण देशमुख, संगीता मनोजी, मिनाश्री कांबळे यांच्याशी हा संवाद घडवून आणला. लॉकडाऊन संपले, व्यवहार सुरु झाले तरी आम्ही वस्तीचे दरवाजे लवकर उघडणार नाही. कारण, आमचा व्यवहार थेट शरिराशी, असे सांगायला त्या विसरल्या नाहीत.


किरण देशमुख या महिलेने सांगितलेला अनुभव थक्क करायला लावणारा होता. सांगली, सातारा, कोल्हापूर या तीन जिल्ह्यातील चार हजारावर वेश्‍या महिलांवर सध्या संकट कोसळले आहे. कोरोनाचे संकट कधी संपणार, व्यवहार कधी सुरु होणार माहिती नाही. लोकांचे व्यवहार सुरु झाले तरी थेट शरीराचा संपर्क येणारा वेश्‍या व्यवसाय कसा सुरु करायचा? या प्रश्‍नाचे उत्तर कुणाकडेच नाही. या संकटातून वाट काढण्यासाठी संग्रामसह या महिलांसाठी काम करणाऱ्या संस्था प्रयत्न करताहेत. शिवाय, सरकारने थोडा हातभार लावावा, अशी त्यांची अपेक्षा आहे.


किरण देशमुख म्हणाल्या, ""आमच्या गल्लीत आम्ही कोरोना येऊ दिला नाही. आम्ही जबाबदारीने वागतोय. मिळकत थांबलीय, काही दिवसांनी पोटाचे वांदे होतील. औषधांसाठी पैसे उरणार नाहीत. तरी आम्ही लढू, पण संकटात सरकारला साथ देऊ, असा आमचा निर्धार आहे. तिने त्या ग्राहकाची हव्या तेवढ्या पैशांची ऑफर नाकारली, हेच आमचे धोरण आहे. भविष्यात सुरक्षित अंतर ठेवून लोक व्यवहार सुरु करतील, आमचा व्यवसाय तसा नाही. त्या संकटातून कसा मार्ग काढायचा, हे कोडे आहेच. तोवर साऱ्यांना थोडी साथ द्यावी.''


संगीता मनोजी म्हणाल्या, ""सुमारे 50 टक्के महिलांकडे रेशन कार्ड नाही. त्यांना धान्य मिळत नाही. ज्यांना मिळते त्यांनी केवळ गहू, तांदूळ घेऊन कसे दिवस काढायचे. तेल, चटणी, मीठ, साखर या साऱ्याचे काय? काही दिवस पुरतील एवढे पैसे आहेत. संस्थाही मदत करते आहे. पण, पुढे किती काळ असे चालेल माहिती नाही. अनेकींचे कुटुंब आहे. गावाकडे आई-बाप आहेत. त्यांना पैसे पाठवायचे कसे?''


मिनाक्षी कांबळे म्हणाल्या, ""संग्राम, वेश्‍या अन्याय मुक्ती परिषद, मित्रा, मुस्कान अशा संस्थांनी आम्हाला मदतीचा हात दिला आहे. पहिल्या महिन्यात 689 महिलांना गहू, तांदूळ पोहोच केले. सुमारे 12 टन धान्य वाटले. अजूनही संस्थांची तयारी आहे, मात्र जोवर आमचा उंबरा बंद आहे, तोवर संकट संपणार नाही.''

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com