
बार्शी (सोलापूर) : तब्बल आठ महिने कोरोना संसर्गाच्या भीतीने केंद्र आणि राज्य शासनाने लॉकडाउन 22 मार्च 2020 पासून सुरू केला अन् बार्शी नगरपरिषदेची कोट्यवधी रुपयांची थकबाकी आजअखेर थकीत आहे. मागील दोन महिन्यांपासून शासनाने टप्प्या-टप्प्याने लॉकडाउन शिथिल केल्यानंतर नागरिकांकडून नगरपरिषदेच्या कर्मचाऱ्यांना सहकार्य सुरू झाले आहे. त्यामुळे अवघ्या एकाच महिन्यात 6 कोटी 21 लाख रुपये करवसुली झाली असून, यानिमित्त अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.
कोरोना काळामध्ये नगरपरिषदेस सर्व शासकीय निधी उपलब्ध होणे पूर्णपणे बंद होते. विकासकामे ठप्प झाली होती. नागरिकही आर्थिक अडचणींमध्ये सापडले होते. पालिकेची घरपट्टी - पाणीपट्टी कशी वसूल करायची, असा यक्ष प्रश्न पालिकेपुढे होता. पण अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नागरिकांशी योग्यरीतीने भावनिक साद घालत प्रतिसाद मिळवण्यात यश मिळवल्याचे स्पष्ट झाले आहे.
बार्शी नगरपरिषदेअंतर्गत शहरात 32 हजार मालमत्ताधारक आहेत. मागील तीन वर्षांपासून घरपट्टी विभागाची 45 कोटी तर पाणीपट्टी विभागाची 18 कोटी रुपये थकबाकी आहे. 13 कोटी रुपये व्याज थकीत आहे. वसुली झाली तरच विकासकामांना गती मिळेल, अन्यथा अडचणी निर्माण होतील असे प्रशासनाच्या लक्षात आले. डिसेंबर महिन्यात घरपट्टी विभागाचे अधिकारी, कर निरीक्षक, 26 कर्मचारी आळस झटकून दिवसभर कामाला लागले अन् एकाच महिन्यात घरपट्टी विभागाने 5 कोटी 71 लाख रुपये व पाणीपट्टी विभागाने 50 लाख रुपये कर वसुली केली. 31 डिसेंबर या एकाच दिवशी रात्री उशिरापर्यंत कार्यालय उघडे ठेवून 91 लाख रुपये वसूल केले होते. नागरिकांची कर भरण्यासाठी बॅंकेप्रमाणे रांग लागली होती.
कर्मचाऱ्यांनी केलेल्या कामाबद्दल त्यांच्या पाठीवर थाप देऊन शाबासकी देण्यासाठी पालिकेच्या सभागृहात शुक्रवारी सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. आमदार राजेंद्र राऊत, नगराध्यक्ष असिफ तांबोळी, उपनगराध्यक्ष कृष्णराज बारबोले, मुख्याधिकारी अमिता दगडे - पाटील यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार केला.
सन्मान झालेले अधिकारी व कर्मचारी
मयूरी शिंदे (कर अधिकारी), स्वाती चौधरी (सहाय्यक कर निरीक्षक), दत्तात्रेय कांबळे, इलियास मोमीन, आनंद कांबळे, अंकुश कांबळे, सुनील कानडे, दत्तात्रेय चव्हाण, ओंकार नष्टे, योगेश घंटे.
बार्शीतील नागरिकांनी डिसेंबर महिन्यात उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. मालमत्ता करातून मिळालेली रक्कम विकास कामांसाठी वापरली जात असते. शासनाने भुयारी गटार योजनेला मुदतवाढ दिली असून ऑक्टोबर 2021 पूर्वी हे काम पूर्ण करायचे आहे. त्यामुळे शहरातील सर्व रस्ते त्यापूर्वीच पूर्ण होतील. यापुढेही नागरिकांनी सहकार्य करून मालमत्ता कर व पाणीपट्टी भरावी.
- अमिता दगडे-पाटील,
मुख्याधिकारी, बार्शी नगरपरिषद
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.