अजितदादा जरा बळीराजाकडे लक्ष द्या ! शेतात उभी पिके जळत आहेत, तरीही बिलासाठी वीज कनेक्‍शन तोडणी सुरुच

4ajit3_1.jpg
4ajit3_1.jpg

सोलापूर : अवकाळी, महापूर, दुष्काळ अशा नैसर्गिक संकटाशी दोन हात करून राज्याच्या अर्थव्यवस्थेला सर्वाधिक हातभार दिलेला बळीराजा आता वीज नसल्याने अडचणीत सापडला आहे. शेतात उभे पीक असतानाही त्याला वीज नसल्याने पाणी देण्यास अडचणी येत आहेत. दुसरीकडे कारखान्यांना ऊस जावून दोन-अडीच महिने होऊनही एफआरपीची संपूर्ण रक्‍कम मिळालेली नाही. या पार्श्‍वभूमीवर 31 मार्च 2022 पर्यंत दिलेली मुदत वाढवून मिळावी आणि तोवर कनेक्‍शन तोडणी थांबवावी, अशी मागणी शेतकरी संघटनांसह बळीराजाने उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे.

महावितरण अधिकाऱ्यांचे म्हणणे...

  • सप्टेंबर 2020 पूर्वीच्या एकूण थकबाकीतील 50 टक्‍के रक्‍कम 31 मार्चपर्यंत भरावी
  • एकूण थकबाकीतील 50 टक्‍के रक्‍कम भरल्यास मिळणार 60 टक्‍के सवलत
  • सप्टेंबर 2020 नंतरच्या बिलाची संपूर्ण रक्‍कम भरणे शेतकऱ्यांसह सर्व ग्राहकांना बंधनकारक
  • एकाच 'डीपी'वरील सर्व शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील बिलाची रक्‍कम भरल्यास मिळणार 10 टक्‍के सवलत
  • मार्च 2022 पर्यंत वीज ग्राहकांनी सवलतीचा लाभ न घेतल्यास भरावी लागणार संपूर्ण बिलाची रक्‍कम
  • बिले न भरणाऱ्यांचे वीज कनेक्‍शन तोडणी सुरू; पिकांना पाणी देता येईना
  • कारखान्यांकडे उसाची एफआरपी थकली; बिले भरायची कशी, शेतकऱ्यांनी उपस्थित केला प्रश्‍न
  • मुदत वाढवून देण्याची मागणी; कनेक्‍शन न तोडता वीज पुरवठा सुरू करण्याची बळीराजाची मागणी
  • उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या निर्णयाकडे बळीराजाचे लक्ष

पंढरपूर विधानसभा पोटनिवडणुकीच्या निमित्ताने राष्ट्रवादी कॉंग्रेसचा उमदेवार निश्‍चित करण्यासाठी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, उपमुख्यमंत्री अजित पवार हे पंढरपूर दौऱ्यावर येणार आहेत. निवडणुकीच्या निमित्ताने येण्यासाठी वेळ मिळतो, परंतु शेतकरी प्रश्‍नांवर कधी वेळ काढाल, असाही प्रश्‍न शेतकरी विचारू लागले आहेत. तत्पूर्वी, स्वाभिमानी शेतकरी संघटना, राज्य जनहित शेतकरी संघटना, भाजपचे आमदार तथा माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख, वंचित बहूजन आघाडीचे सर्वेसर्वा ऍड. प्रकाश आंबेडकर यांनी वीज कनेक्‍शन तोडू नका, असे आवाहन केले आहे. तर वेळप्रसंगी वीज तोडणाऱ्यांना बदडून काढा, असा सल्लाही त्यांनी दिला. या पार्श्‍वभूमीवर शेतकरी आणि महावितरण कर्मचाऱ्यांमध्ये वाद होत असून काही ठिकाणी मारहाणीच्या घटनाही घडल्या असून काही शेतकऱ्यांवर गुन्हेही दाखल झाले आहेत. त्यामुळे यासंदर्भात आता उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदा मंत्री जयंत पाटील हे काय निर्णय घेणार, याकडे लक्ष लागले आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com