शेतकऱ्यांसाठी मोठी बातमी ! एप्रिलपासून तीन लाखांपर्यंत मिळणार बिनव्याजी पीक कर्ज

4NND19KJP01_5.jpg
4NND19KJP01_5.jpg

सोलापूर : खरीप हंगामात राज्यातील सुमारे 43 लाख शेतकऱ्यांसाठी 74 हजार कोटींचे कर्जवाटप करण्याचा आराखडा तयार झाला आहे. अर्थमंत्री अजित पवार यांच्या घोषणेनुसार आता बळीराजाला तीन लाखांपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्‍के व्याजदराने मिळणार आहे. त्याची अंमलबजावणीत 1 एप्रिलपासून केली जाणार असून त्याचा लाभ बागायती व जिरायती शेतकऱ्यांनाही दिला जाणार आहे.

कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्यांना लाभ 
पुणे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना काही वर्षांपासून तीन लाखांपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्‍के व्याजदाराने दिले जाते. राज्य सरकारच्या घोषणेनुसार सोलापूर जिल्हा बॅंकही जे शेतकरी नियमित कर्जाची परतफेड करतात, अथवा जे मुदतीत कर्जाची परतफेड करतील, त्यांना एप्रिलपासून तीन लाखांपर्यंत बिनव्याजी पीक कर्ज दिले जाईल. 
- शैलेश कोथमिरे, प्रशासक, जिल्हा मध्यवर्ती बॅंक, सोलापूर 

कोरोनामुळे राज्याच्या अर्थव्यवस्थेची घडी विस्कटल्याने दोन लाखांवरील शेतकऱ्यांसह नियमित कर्जदारांसाठी मिळणाऱ्या प्रोत्साहनपर अनुदानाचा निर्णय राखून ठेवला. तरीही नियमित कर्जदारांना सहा टक्‍के व्याजदराने मिळणारे तीन लाखांपर्यंतचे पीक कर्ज शून्य टक्‍क्‍यांनी देण्याचा निर्णय घेतला. तत्पूर्वी, तीन लाखांपर्यंतच्या पीक कर्जावर केंद्र सरकारकडून तीन टक्‍के व्याज सवलत दिली जाते. तर राज्य सरकारकडून पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेतून एक टक्‍का सवलत दिली जाणारी सवलत आता तीन टक्‍के केली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना सहा टक्‍क्‍यांऐवजी तीन लाखांपर्यंतचे कर्ज शून्य टक्‍के व्याजदराने मिळणार आहे. कर्जमाफीनंतरही शेतकऱ्यांकडून जिल्हा बॅंकांना 62 हजार कोटींच्या कर्जाची रक्‍कम येणेबाकी आहे. या पार्श्‍वभूमीवर आता जे शेतकरी त्यांच्याकडील कर्जाची थकबाकी वेळेत भरतील, ते त्यासाठी पात्र ठरणार आहेत. सोलापूर जिल्हा बॅंक 334 विकास सोसायट्यांमधून तीन लाखांचे पीक कर्जवाटप करणार आहेत. 

लातूर व साताऱ्यात संस्था पातळीवरच 'मध्यम' कर्ज 
मार्चएण्डला बॅंकांचा ताळेबंद तयार होत असल्याने बॅंकांनी कर्जवसुलीचा तगादा सुरु केला आहे. विकास सोसायट्यांना वसुलीचे टार्गेट दिले असून 50 टक्‍क्‍यांपेक्षा वसुली अधिक असलेल्या गावांमधील शेतकऱ्यांनाच तीन लाखांपर्यंत पीक कर्ज दिले जाईल, अशी भूमिका जिल्हा बॅंकांनी घेतली आहे. दुसरीकडे लातूर व सातारा जिल्हा बॅंकेची संस्था पातळीवरील वसुली 100 टक्‍के असल्याने त्याठिकाणी पीक कर्जासोबतच मध्यम मुदतीचे कर्जही संस्था पातळीवरच वितरीत केले जात आहे. उर्वरित जिल्हा बॅंकांचे मध्यम मुदतीचे कर्जवाटप बॅंकांच्या मध्यवर्ती शाखेतून होते, असे सहकार विभागातील वरिष्ठ सूत्रांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com