सामान्यांच्या बळींची जबाबदारी कोणाची? यंत्रणांच्या सजगतेची गरज

सामान्यांच्या बळींची जबाबदारी कोणाची? यंत्रणांच्या सजगतेची गरज
सामान्यांच्या बळींची जबाबदारी कोणाची? यंत्रणांच्या सजगतेची गरज
सामान्यांच्या बळींची जबाबदारी कोणाची? यंत्रणांच्या सजगतेची गरजSakal
Summary

कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर) गावाजवळ झालेल्या अपघातात सहा प्रवासी ठार झाल्याच्या घटनेने पुन्हा एकदा अवैध प्रवासी वाहतुकीबाबतच्या चर्चेला तोंड फुटले आहे.

सोलापूर : कुंभारी (ता. दक्षिण सोलापूर) गावाजवळ झालेल्या अपघातात (Accident) सहा प्रवासी ठार झाल्याच्या घटनेने पुन्हा एकदा अवैध प्रवासी वाहतुकीबाबतच्या चर्चेला तोंड फुटले आहे. आता ही वाहतूक अवैध म्हणावी की वैध, असा प्रश्‍न पडला आहे. एसटी स्टॅंडवरील फलाटावरूनच अशा गाड्या सोडल्या जात असल्याने ही वाहतूक वैध म्हणूनच ग्राह्य धरावी लागेल. परंतु, या अशा विचित्र अपघातात मरण पावलेल्या सामान्यांच्या बळींची जबाबदारी कोणाची? हा प्रश्‍न मात्र सध्यातरी अनुत्तरीतच आहे.

गेल्या साडेदहा महिन्यात पाचशेच्या घरात अपघाती मृत्यू झाल्याची माहिती हाती आली असतानाच रस्ता सुरक्षा समिती, शासकीय यंत्रणांच्या एकूणच कामकाजावर प्रश्‍नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहे. सर्वसामान्यांच्या प्रवासासाठी अत्यंत महत्त्वाचे साधन असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे तर या सामान्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. गेल्या दहा दिवसात एसटीच्या सोलापूर विभागाचे तब्बल साडेसहा कोटींवर उत्पन्न बुडाले आहे. ऐन दिवाळी सण संपल्यानंतर आपापल्या ठिकाणी मार्गस्थ होणाऱ्यांचे मोठे हाल झाले. त्यांनी मार्ग शोधला तरी त्यांना खासगी ट्रॅव्हल्सचा वापर करावा लागला, त्यासाठी विनाकारण भुर्दंड सोसावा लागला. एसटीचा प्रवास सुरक्षित प्रवास म्हटला जातो, त्याचा या प्रवाशांना लाभ घेता आला नाही, याचा खेद वाटतो. खासगी वाहनांच्या तुलनेत एसटीचे अपघात नगण्य आहेत.

कुंभारीजवळ झालेल्या अपघातातील वाहनचालक मोबाईलवर संभाषण करीत होता, या माहितीची पोलिस खातरजमा करीत आहेत. अवैध प्रवासी वाहतुकीवर नियंत्रण करणारी यंत्रणा म्हणजे वाहतूक पोलिस, राज्य महामार्ग पोलिस, प्रादेशिक परिवहन विभाग (आरटीओ), रस्ते सुरक्षितता विभाग, राष्ट्रीय महामार्गाची यंत्रणा असतानाही अशा वाहनांतून अक्षरशः खचाखच कोंबून भरभरून होणारी वाहतूक थोपविण्याची खरी गरज असते. मात्र ते होताना दिसत नाही. काहीवेळा माणुसकीतून पोलिस याकडे काणाडोळा करीत असावेत असे वाटते. परंतु केवळ हप्तेबाजीतून अशा वाहनांकडे नेहमीच डोळेझाक केल्याचे जाणवते. कित्येक वाहनांची मालकी नाहीतर भागीदारीतच पोलिस असल्याचे सत्य उजेडात आले आहे. एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे अवैध प्रवासी वाहतुकीवर सध्या कारवाई होत नाही. त्यामुळे खासगी वाहनचालकांचे चांगलेच फावले आहे.

आध्यात्मिक पर्यटनाची राजधानी असलेल्या सोलापूरकडे लाखो भाविकांचा ओढा असतो. त्यामुळे खासगी वाहनातून प्रवास करणाऱ्यांची संख्या अन्य जिल्ह्यांच्या तुलनेने येथे जादा आहे. दिवस-रात्र प्रवास करण्याच्या नादात चालकाच्या विश्रांतीकडे झालेले दुर्लक्षही अपघातास कारणीभूत ठरल्याचे अनेकवेळा सिद्ध झाले आहे. सोलापूर जिल्ह्यातील सर्वच महामार्गांची चांगली बांधणी झाली आहे. परंतु, अनेक ठिकाणी सर्व्हिस रोड, अतिक्रमणे, साईडपट्ट्यांची सोय. काही ठिकाणी लावलेली ठिगळे, चुकीच्या ठिकाणचे दुभाजक या कारणांमुळेही अपघातात भरच पडत आहे. महामार्गावरील दिशादर्शक फलक, प्रबोधनपर फलकांच्या त्रुटीही दूर करण्याची गरज आहे.

एकीकडे अवैध प्रवासी वाहतुकीबाबत नेहमीच चर्चा होत असताना आता तर एसटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ही वाहतूक वैध ठरविण्यात येऊ लागली आहे. थेट एसटी स्टॅंडवरील फलाटावरून प्रवाशांच्या सोयीसाठी बसप्रमाणेच या खासगी वाहनांना सोडण्यात येऊ लागले आहे. 'वाट पाहीन पण एसटीनेच जाईन' असे स्लोगन पूर्वी दिसून येत होते. परंतु आता एसटीच नसल्याने वाट पाहण्याचा प्रश्‍नच राहिलेला नाही. अक्षरशः मालवाहतुकीच्या वाहनांमधूनही प्रवासी वाहतूक होत असल्याचे चित्र समोर येऊ लागले आहे. आता प्रतीक्षा आहे एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटण्याची अन्‌ यंत्रणांनी योग्य धोरणानुसार, कायद्यानुसार काम करण्याची!

बदनामीची झालर

देशभर आध्यात्मिक पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, अक्कलकोट तसेच शेजारचे गाणगापूर अन्‌ तुळजापूर ही भक्ती व शक्तीपिठे भाविकांचे श्रद्धास्थान आहेत. याठिकाणी दर्शनासाठी भाविकांचा मोठा ओढा असतो. पर्यटकांची संख्याही लाखोंच्या घरात आहे. परंतु एमएच 13 वगळता अन्य जिल्ह्यांचे पासिंग असलेले वाहन अथवा परराज्यातील वाहन दिसले की त्याला तपासणीच्या नावाखाली सोलापुरात अडविण्यात येतेच. चिरीमिरी दिल्याशिवाय पर्यटकांसमोर पर्याय नसतो. त्यामुळे सोलापूरचे नाव महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतातच बदनाम होत आहे.

सोलापूर विभाग

  • आगार : नऊ

  • एसटीची संख्या : 690

  • दररोजचा एकूण प्रवास किमी :- एक लाख 80 हजार

  • एसटीचे दररोजचे उत्पन्न : 65 लाख

  • एसटीच्या दररोजच्या फेऱ्या : 17 हजार

  • वाहनांचे अपघात : 875

  • अपघाती मृत्यू : 455

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com