"बंद, बंद म्हणाया लय सोप्पं हाय, पण ज्याचं बंद पडतया त्येलाच कळतया बाबा !'

Shripur Lockdown
Shripur Lockdown

श्रीपूर (सोलापूर) : "कधी नाय ती तोंड बांधून फिरायची येळ आलीय बाबा. पण, काय करायचं. बाहीर फिरू नका म्हणत्याती. पण, पिकल्यालं इकायचं म्हणल्यावर घरात बसून जमतंय का. बंद, बंद म्हणायला लय सोप्पं हाय, पण ज्याचं बंद पडतया त्येलाच कळतया बाबा !' डोक्‍यावर पाटी घेऊन दही विक्री करणाऱ्या कमल दगडे या साधारणतः सत्तर वर्षांच्या वृद्ध आजीबाई आपली संतप्त भावना व्यक्त करीत होत्या. तेथे उपस्थित असलेल्या महिलांनी देखील आजीच्या सुरात सूर मिसळला होता. 

येथील आनंदनगर परिसरातील हा संवाद असला तरी, सार्वत्रिक जनभावनेचाच तो आवाज असल्याचे स्पष्टपणे जाणवत होते. हा आवाज प्रशासनाच्या कानापर्यंत जात नाही आणि गेला तरी संवेदनशीलता हरवलेल्या मंडळींना त्याचे काही देणे-घेणे उरत नाही, हे सामान्य माणसाचे दुर्दैव म्हणावे लागेल. 

जिल्ह्यातील कडक निर्बंध आणि संचारबंदीच्या पार्श्‍वभूमीवर दही विकणाऱ्या आजीची ही प्रतिक्रिया खूप काही सांगणारी आहे. शासन आणि प्रशासनाला सामान्य माणसाचा हा आर्त आवाज कळला असता तर किती बरे झाले असते. लॉकडाउन, अनलॉक, निर्बंध, कडक निर्बंध, जमावबंदी, संचारबंदी अशा घोषणांच्या अनुषंगाने आता सर्वसामान्य माणूस कमालीचा संताप व्यक्त करू लागला आहे. दहीवाल्या आजीने व्यक्त केलेली ही प्रतिक्रिया त्या व्यापक जनभावनेचे प्रतिनिधित्व करणारी आहे. 

करोळे (ता. पंढरपूर) येथून भल्या पहाटे श्रीपूर येथे दही विक्रीसाठी आलेल्या या आजींनी आपल्या तोंडाला मास्क बांधला होता. मास्क बांधल्यामुळे दही विकण्यासाठी आरोळी देताना त्यांची दमछाक होत होती. येथील आनंदनगर परिसरात एका ठिकाणी डोक्‍यावरील पाटी खाली ठेवत, तेथील महिलांशी त्यांनी संवाद साधला. "बंद, निर्बंध'च्या धोरणाबाबत त्यांनी आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली. शासन आणि प्रशासनाच्या निर्दयी आणि असंवेदनशील वृत्तीमुळे सामान्य माणसाचे जगणे अवघड झाले आहे. छोटे व्यावसायिक, शेतकरी, शेतमजूर, ज्यांचे हातावर पोट आहे अशा माणसांना मरणयातना भोगाव्या लागत आहेत. मात्र, प्रशासनाला ते कसे ऐकू येणार. आपल्या भोगाला आले आहे ते आपल्याला भोगावेच लागणार आहे, अशी अगतिक भावना व्यक्त करणाऱ्या आजींच्या सुरात तेथील महिलांनीही सूर मिसळला होता. एका अर्थाने सर्वसामान्य माणसांचा बंदच्या भूमिकेला असलेला विरोध त्यातून स्पष्टपणे दिसत होता. 

पोटाला काय बिबं घालायचं का? 
तोंडाला बांधून फिरावं लागतंय. एक इंजेक्‍शन (लस) घेतलंय. दोन- तीन दिस लय तरास झाला. आता दुसरं घ्यायचंय. हे रोजच बंद, बंद म्हणायला लागली तर, गोरगरिबांनी पोटाला बिबं घालायचं का? 
- कमल दगडे,
दही विक्री करणाऱ्या आजी

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com