
अनंत अडचणीतून मार्गक्रमण करत राज्यसेवेतून तहसीलदार पदाला गवसणी घालत आज पदोन्नतीने उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत.
उपळाई बुद्रूक (सोलापूर) : समाजात वावरताना अनेकजण आर्थिक परिस्थितीचा कधीही बाव न करता. आलेल्या परिस्थितीचा सामना करत. ध्येयाच्या दिशेने आगेकूच करतात. असे शून्यातून विश्व निर्माण करणारे अनेकजण आपल्याला पाहायला मिळतात. त्यापैकीच एक म्हणजे सदाशिव मधुकर पडदुणे (Sadashiv Paddune). अनंत अडचणीतून मार्गक्रमण करत राज्यसेवेतून तहसीलदार पदाला गवसणी घालत आज पदोन्नतीने उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहेत. त्यांची ही यशोगाथा.
परंडा तालुक्यातील भोंजा गाव. घरची आर्थिक परिस्थिती खूपच बिकट. त्यात माझ्या आईवडिलांचे मी तिसरे आपत्य. कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी वडील कधी बटईने शेती करायचे. तर कधी पाटील, कुलकर्णी यांच्या शेतात सालांन रहायचे. गाव तालुक्यापासून जवळ असलं तरी, मुख्य रस्त्यापासून दूर होतं. प्राथमिक शिक्षण चौथी पर्यंत भोंजा व सातवीपर्यंत सोनारीच्या शाळेत झाले. वडील काबाडकष्ट करत शिक्षण देत असल्याने, शाळेत मन लावून शिक्षण घेत असायचो. तसे गुणवत्तेच्या बाबतीत चांगला विद्यार्थी म्हणून नावलौकिक होता. त्यात भर पडली ती चौथी व सातवीच्या बोर्ड परीक्षेत प्रथम क्रमांकाने आलेला विद्यार्थी असल्यामुळे. त्यामुळे शिक्षकांचा शाळेतील आवडता झालो. एकिकडे गुणवत्तेच्या बाबतीत आलेख वाढत चालला होता. परंतु आर्थिक परिस्थिती अत्यंत बिकट होत चालली होती. त्यामुळे शिक्षण घेत असतानाच. सुट्टीच्या दिवशी वडिलांसोबत गुरे राखायची. शेतात कामासाठी मदत करू लागायची. त्याचबरोबर आईबरोबर नालाबंडिंग च्या कामावर देखील मदत करण्यासाठी जात असायचो.
पुढे सातवीनंतर टेक्निकल शिक्षण व माध्यमिक शिक्षणासाठी परांडा येथील महात्मा गांधी विद्यालयात शिक्षणासाठी प्रवेश घेतला. गावापासून पहिल्यांदाच एवढ्या दुर शिक्षणासाठी जात असल्याने, वडिलांनी एक बोकड विकून सायकल घेऊन दिली. त्याच सायकलवर दहावीपर्यंत शिक्षण दररोज नऊ किलोमीटर येऊन जाऊन पूर्ण केले. वडिलांची माझ्या शिक्षणासाठी होत असलेली धडपड पाहून, मला शिक्षणासाठी आणखीन प्रेरणा मिळायची. परंतु वडीलांवर आर्थिक ताण पडू नये. यासाठी उन्हाळ्याच्या सुट्टीत अहमदनगर मध्ये ऑफिस बॉय तर कधी गवंड्याच्या हाताखाली काम करायचो. त्यातून आलेल्या पैशातून पुढील शिक्षणासाठी पुस्तके घेत असायचो. हे सर्व शिक्षणासाठीच सुरू असल्याने, अभ्यासाकडे कधीही दुर्लक्ष केले नाही. त्यामुळेच दहावीत बोर्डाच्या परीक्षेत चांगले गुण घेऊन शाळेत तिसऱ्या क्रमांकाने उत्तीर्ण झालो. त्यामुळे ओहोळ गुरुजींनी डीएड ला जायचा सल्ला दिला. पण पहिल्या वर्षी मेरीट असूनही वय 16 वर्षे पूर्ण नसल्याने, शिवाजी कॉलेज बार्शी येथे अकरावीसाठी विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. अकरावीनंतर बार्शी येथेच डीएड ला नंबर लागला. डी.एड प्रथम श्रेणीत उत्तीर्ण होत कॉलेजमध्ये पहिल्या क्रमांकाने उत्तीर्ण झालो. नोकरीची गरज असल्याने, वैराग येथील खाजगी संस्थेमध्ये प्राथमिक शिक्षक म्हणून रूजू झालो. तुटपुंज्या पगारावर भागत नसल्याने, मुलांच्या घरी जाऊन शिकवण्या घेतल्या.
अनेक संघर्षानंतर खाजगी संस्थेत नोकरी मिळाली होती. नोकरी करतच शिवाजी विद्यापीठातून इंग्रजी बीए (बहिस्थ) प्रवेश घेतला. दरम्यान 1995 मध्ये स्पर्धा परीक्षेतुन शिक्षक म्हणून पुणे जिल्ह्यामध्ये दुसऱ्या क्रमांकाने तर उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये पहिल्या क्रमांकाने निवड झाली. स्पर्धा परीक्षेत जिल्ह्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाल्याने, आत्मविश्वास चांगलाच दुणावलेला. तर दुसरीकडे बीए इंग्रजी प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालो. पदवी शिक्षण पूर्ण होताच होकेशनल बी. एड बॅच साठी शिवाजी विद्यापीठात नंबर लागला. बी. एड ही प्रथम श्रेणीत उत्तीर्ण झालो आणि इथुनच खऱ्या अर्थाने स्पर्धा परीक्षेची गोडी निर्माण झाली. या परीक्षेबाबत आकर्षण वाढल्याने परीक्षा देण्याचा निर्णय घेतला. अभ्यासाच्या व जिद्दीच्या जोरावरच प्रथम प्रयत्नातच पीएसआय, एसटीआय च्या परीक्षेत मुलाखतीसाठी पात्र झालो. परंतु मुलाखतीत अपयश आले. दुसरीकडे वय वाढत चालल्याने, याकाळात घरात विवाहाच्या चर्चा सुरू होत्या. एक-दोन मुली पाहायला गेलो. पण माझी परिस्थिती हलाखीची असल्याने, मुलींनीच मला नाकारले. तेंव्हा देखील परिस्थिती पुर्वीप्रमाणेच असल्याने, थोडे खच्चीकरण झाले. परंतु मनाशी खूणगाठ बांधली की, भविष्यात माझे सामाजिक स्टेट्स कष्टाच्या जोरावर नक्कीच बदलेल. त्याच वर्षी माझे लग्न झाले. पत्नी सरिता डीएड झालेली त्यामुळे तिला 2001ला नोकरी मिळाली.
लग्न झाले तरी स्पर्धा परीक्षेचा नाद मात्र सुटला नव्हता. पहिल्या प्रयत्नात अपयश आले होते. परंतु हार मानायची नाही प्रयत्न करत राहायचे एवढच पक्क ठरवलं होतं. दुसरे प्रयत्नातही मुलाखती पर्यंत मजल मारली. त्यावेळी मात्र नायब तहसीलदार पद चार मार्कांनी हुकले. एकिकडे अपयशावर अपयश होते. दुसरीकडे संसाराचा गाडा सुरू होता. प्रपंचात 2 मुलांची भर पडली. परंतु हार मानायची नाही एवढ नक्की होते. अभ्यासात सातत्य तर होतेच. त्यामुळे नंतर 2004 मध्ये दिलेल्या परीक्षेचा अंतिम निकाल 2009 ला आला. त्यामध्ये तहसीलदारपदी निवड झाली व आज पदोन्नतीने उपजिल्हाधिकारी म्हणून कार्यरत आहे. या यशात आई वडील, पत्नी, मुले, मित्र परिवारांसह शिक्षकांचा मोठा वाटा आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.