माणसातील देवमाणूस : आमचे ‘आबासाहेब’

आबासाहेबांनी तब्बल ११ निवडणुकीमध्ये विजय मिळवून विक्रम केला
Honor of senior leader Ganpatrao Deshmukh
Honor of senior leader Ganpatrao Deshmukh

- डॉ. भाई बाबासाहेब देशमुख, (प्रदेशाध्यक्ष पुरोगामी युवक संघटना, महाराष्ट्र)

‘‘जवळ असले की समजत नाही, दूर गेले की आठवणीशिवाय पर्याय राहत नाही’’ अशीच अवस्था आमची झाली आहे. परंतु विचारांची पक्की असणारी माणसं नेहमीच अजरामर होतात. राजकीय क्षेत्रात एक उत्तुंग व्यक्तिमत्व असलेले, राजकारणातील राजहंस, सर्वसामान्यांचे आधारवड व माणसातील देव माणूस म्हणूनच ‘आमचे आबासाहेब’ ओळखले जात होते. आबासाहेबांचे निधन होऊन एक वर्ष निघून गेले. अजूनही कळत नाही ‘आबासाहेब’ आमच्या सोबतच आहेत, असा भास सातत्याने होतो. अश्रूंचा बांध फुटतोय, अंत:करणातून दुःखाचे एकावर एक हुंदके दाटून येतात. संपूर्ण सांगोला तालुका पोरका झाल्यासारखा वाटतोय. या दुःखातून तालुका अजूनही सावरलेला नाही.

तब्बल ५५ वर्षे विधिमंडळाचे सभागृह गाजवणारे ‘आबासाहेब’ हे एक अद्भुत असे न संपणारे रसायन होते. स्व.आबासाहेबांनी राजकारण आणि समाजकारण करत असताना मूल्य जोपासले आणि राजकीय तत्त्वांना नेहमीच स्वीकारले. आबासाहेबांनी सर्वात प्रथम १९६२ साली पहिली निवडणूक लढवली. त्यानंतर तब्बल ११ निवडणुकीमध्ये विजय मिळवून विक्रम केला. महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण ते तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंतचा महाराष्ट्राचा आणि देशाचा राजकीय प्रवास जवळून पाहणारे भीष्म पितामह स्व. आबासाहेब होते.

स्व. आबासाहेबांनी शेतकरी सहकारी सूतगिरणी, महिला सूतगिरणी, जिल्हा दूध संघ, बाजार समिती, महाराष्ट्र औद्योगिक विकास, छोट्या-मोठ्या बँका, पतसंस्था, सांगोला तालुक्याचा शैक्षणिक विकास व्हावा म्हणून सांगोला तालुका शेतकरी शिक्षण मंडळाची स्थापना केली. संपूर्ण सांगोला तालुका प्रत्येक वाड्या-वस्तीवर पक्क्या रस्त्याचे जाळे विणले. राजकारण करत असताना तत्त्वाचं, निष्ठेचं आणि निस्वार्थीपणाचा नेहमीच आपल्या बोलण्यातून, चालण्यातून आणि वागण्यातून आबासाहेबांनी आदर्श घालून दिला.

स्व. आबासाहेबांनी नेहमीच पुरोगामी तत्वाचा स्वीकार केला. राजकारणातील मूल्य काय असतात हा आदर्श उभा महाराष्ट्र आज बदलत्या राजकारणात आबासाहेबांची आठवण आल्याशिवाय राहत नाही. सांगोला तालुक्यातील सर्व जाती-धर्माचे लोक गुण्यागोविंदाने राहावेत. महिलांचा आदर व सन्मान करणे, राजकीय सत्तेचा वापर तळागाळातल्या शेवटच्या माणसाला झाला पाहिजे हे ब्रीद वाक्य स्वर्गीय आबासाहेबांचे होते. बहुतांश वेळा ते विरोधी बाकावरच होते, परंतु सरकार कोणतेही असो त्या त्या सरकारच्या योजना कार्यक्षमपणे सांगोला तालुक्यात राबवणे इतकेच त्यांच्या हातात होते.

दुष्काळी भाग असल्याने रोजगार हमी योजना, रोजगार हमी योजनेतून फळबागा लागवड, जलसंधारण अशा अनेक योजना त्यांनी अत्यंत यशस्वीपणे राबवल्या. सत्ता नसली तरी सत्ताधारी पक्षातील नेत्यांचे त्यांचे जिव्हाळ्याचे संबंध होते. त्यांचा उपयोग त्यांनी सांगोल्याच्या लोक कल्याणासाठी केला. ते सतत लोकांमध्ये राहिले. त्यांच्या अडीअडचणी सोडवल्या. लोकांनी देखील त्यांच्यावर जीवापाड प्रेम केले. स्वतःच्या खिशातील पैसा निवडणुकीत खर्च करून त्यांना निवडून दिले. हे केवळ गोरगरीब लोकांच्या प्रेमातूनच घडले.

सांगली- सातारा -सोलापूरसह तेरा दुष्काळी तालुक्यांना पिण्याचे पाणी आणि शेतीचे पाणी मिळावे म्हणून क्रांतिवीर नागनाथ अण्णा नायकवडी यांच्याबरोबर त्यांनी पाणी प्रश्नासाठी मोठा लढा व संघर्ष उभा केला. अनेकदा आंदोलने, उपोषणे, मोर्चे काढले. त्याचा परिणाम म्हणून टेंभू, ताकारी, म्हैसाळ, उरमेडी सारख्या उपसा सिंचन योजनांमुळे आज शेतकऱ्यांच्या शिवारामध्ये पाणी येऊन ठेपले आहे. मात्र पाणी आले म्हणून सांगोल्याचा दुष्काळ हाटला असे होत नाही, या योजना बारमाही सुरू राहिल्या पाहिजेत. पाण्याची आवर्तने नियोजनपूर्वक सुरू राहिली पाहिजेत. लोकांना पाण्याचे योग्य वाटप झाले पाहिजे.

आबासाहेब हे महाराष्ट्राच्या राजकारणातले एक विद्यापीठ म्हणावे लागेल. कारण निस्वार्थी भावनेने केलेले राजकारण शेवटच्या माणसाच्या चेहऱ्यावरचे समाधान हे आबासाहेबांचे समाजकारण होते. साधी राहणी आणि उच्च विचारसरणी याला नेहमीच आबासाहेबांनी प्राधान्य दिले. आबासाहेब जरी आपल्या सोबत नसले तरी आबासाहेबांचे विचार निश्चितपणाने येथून पुढील काळामध्ये सर्व लोकांना एकत्रित घेऊन सर्व समाजातील लोकांना विचारात घेऊन, सांगोला तालुक्याचा बदललेला चेहरा नव्या जोमाने नव्या हिमतीने निश्चितपणाने सर्वांच्या सहकार्याने स्व.आबासाहेबांचे राहिलेले स्वंप्न पूर्ण करूया. हीच खरी स्वर्गीय आबासाहेबांना श्रद्धांजली. शेवटी एवढंच सांगावेसे वाटते -

"आदर्श आहे व्यक्तिमत्व, आदर्श सांगावे किती

अनमोल आहे रत्न, मोल सांगावे किती ..?"

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com