मोहोळ (जि. सोलापूर) : सध्या सुरू असलेल्या लॉकडाउनमुळे जगाच्या पोशिंद्याची मोठी फरफट सुरू आहे. हजारो रुपये खर्चून पिकवलेली केळी कुणी दीड रुपयाने घेता का, अशी म्हणण्याची वेळ शेतकऱ्यावर आली आहे. या सर्व घडामोडीत व्यापारी व दलाल मालामाल होऊ लागले आहेत. तर शेतकरी मात्र कंगाल होऊ लागला आहे. उन्हाची तीव्रता वाढल्याने केळीच्या घडाच्या बोजामुळे बागा पीचकू लागल्या आहेत.
मोहोळ तालुक्याचा केळी, खरबूज, कलिंगड, डाळिंब, चिकू पिकविण्यात जिल्ह्यात वरचा क्रमांक आहे. उसासारखे पारंपारिक पीक झुगारून शेतकरी द्राक्ष, केळीसारखी पिके करू लागला आहे. सध्या तालुक्यात सात हजार एकरावर केळीच्या बागा आहेत. त्यातील अनेक केळीच्या बागा उतरण्याच्या स्थितीत आहेत. मात्र व्यापारी लॉकडाऊनचा फायदा घेत शेतकऱ्यांच्या केळी प्रतिकिलो दीड रुपयाने मागत आहेत. काहीच करता येत नसल्यामुळे शेतकरीही गपगुमान आपला माल देऊन टाकतो आहे. एकरी लाख ते सव्वा लाख रूपये मिळणाऱ्या बागेचे केवळ 12 ते 13 हजार रुपये घेऊन समाधान मानावे लागते आहे. त्यात भरण्याची मजुरीही शेतकऱ्याकडून घेतली जाते. एकूण हिशोब केला तर शेतकऱ्याच्या हातात किती पैसे राहतात, हा प्रश्नच आहे. लागवडीचा खर्चही मोठा आहे. व्यापाऱ्याला देऊन परवडत नसल्याने अनेक लहान शेतकऱ्यांनी केळीचे घड उतरून ते नातेवाईक मित्रमंडळींना वाटण्याचा सपाटा लावला आहे. दरम्यान, तालुक्यात एवढ्या मोठ्या संख्येने केळी पिकली जात आहे. त्यामुळे केळीपासून उपपदार्थ निर्मिती होण्यासाठी या भागात यंत्रणा उभी राहण्याची गरज आहेत. तरच शेतकरी वाचणार आहे.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.