मळेगावची विषमुक्त द्राक्षे परदेशी ! 75 रुपये किलो मिळाला दर

Malegaon Grapes
Malegaon Grapes

मळेगाव (सोलापूर) : एका बाजूला अनेक संकटांमुळे द्राक्ष बागायतदार अडचणीत सापडत असताना, दुसऱ्या बाजूला निर्यातक्षम द्राक्ष उत्पादन करून बार्शी तालुक्‍यातील मळेगाव, हिंगणी, पिंपरी, महागाव येथील द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांनी आदर्श निर्माण केला आहे. मळेगावच्या बळवंत मुंढे यांनी विषमुक्त द्राक्षे केवळ परदेशी निर्यात केली नाहीत तर चालू बाजारभावापेक्षा दुप्पट रक्कम प्रतिकिलो पाठीमागे मिळवली आहे. त्यामुळे प्रतिकूल परीस्थितीमध्ये दिशा देण्यासाठी त्यांची शेती आदर्शवत ठरत आहे. 

हमखास उत्पन्न मिळवून देणारे म्हणून द्राक्ष पीक ओळखले जाते. मात्र निसर्गाच्या अवकृपेमुळे दरवर्षी द्राक्ष पीक संकटात सापडत आहे. याचा परिणाम द्राक्ष उत्पादकांवर होत असून, अनेक शेतकरी द्राक्ष बागांपासून दूर जात आहेत तर काही शेतकरी यावर्षी नाही तर पुढच्या वर्षी भाव चांगला मिळेल या भाबड्या आशेने तोट्यात शेती करत आहेत. दरवर्षी द्राक्ष बागांवर होणारा उत्पादन खर्च वाढत असून, द्राक्षांचे दर मात्र घटत आहेत. त्यामुळे द्राक्ष बागायतदार शेतकरी आर्थिक संकटात असल्याचे दिसून येत आहे. 

अशा विचित्र अवस्थेत सापडलेल्या द्राक्ष बागायतदारांना "अमृतम' या ब्रॅंडने आधार दिला आहे. हा ब्रॅंड विषमुक्त द्राक्ष उत्पादित करणाऱ्या शेतकऱ्यांना मोठ्या बाजारपेठा उपलब्ध करून देत आहे. यातून द्राक्ष बागायतदारांना आरोग्य आणि आर्थिक सुबत्ता दोन्हींची सांगड घालण्यास मदत होत आहे. या माध्यमातून ज्या द्राक्ष बागायतदारांना आपला माल विक्रीसाठी नेणे देखील कठीण होत होते, त्यांचा माल आता निर्यात होत आहे. त्यामुळे सोलापूर आणि उस्मानाबाद या दुष्काळी पट्ट्यातील द्राक्ष बागायतदारांना "अमृतम' अमृतासारखे वाटत आहे. विषमुक्त अर्थात रासायनिक अंशविरहित शेतीमालाच्या विक्रीसाठी सोलापूर, बार्शी आणि तुळजापूर येथील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन "अमृतम' हा ब्रॅंड तयार केला आहे. 

रसायनांच्या बेसुमार वापरातून तयार होणाऱ्या शेती मालामुळे होणारे दुष्परिणाम दिसू लागल्याने अलीकडे विषमुक्त शेती मालाला असलेली मागणी वाढू लागली आहे. या शेतीमालाची किंमत तुलनेने जास्त असली, तरीही त्याचे कोणतेही दुष्परिणाम शरीरावर आणि निसर्गावरही होत नाहीत. त्यामुळे असा शेतीमाल लोकप्रिय होऊ लागला आहे. शेतकऱ्यांनी पिकविलेला विषमुक्त शेतीमाल या ब्रॅंडद्वारे देशात तसेच देशाबाहेरील ग्राहकांना उपलब्ध करून देण्यात येत आहे. मळेगाव (ता. बार्शी) येथील शेतकरी बळवंत मुंढे यांच्या बागेतील विषमुक्त द्राक्षाला प्रतिकिलो 75 रुपये दर मिळाला. हा दर चालू बाजारभावापेक्षा दुप्पट आहे. त्यांनी 25 टन द्राक्ष युरोप, मलेशिया, चायना, थायलंड, रशिया या देशांना महिंद्रा कंपनीमार्फत निर्यात करून अधिकचे उत्पन्न मिळवले आहे. 

विषमुक्त शेती मालाच्या विक्रीसाठी आम्हा शेतकऱ्यांना देशासह परदेशी मार्केट उपलब्ध झाल्याने अपेक्षित उत्पादन मिळत आहे. कोणतीही रासायनिक खते, रासायनिक कीटकनाशके किंवा रासायनिक बुरशीनाशके न वापरता केवळ नैसर्गिक घटकांचा वापर करून केल्या जाणाऱ्या शेतीतून उत्पादित होणाऱ्या शेती मालामध्ये विषारी रसायनांचा अंश नसतो. त्यामुळे उत्पादित द्राक्ष मालास स्थानिक तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत मोठी मागणी मिळत आहे. 
- बळवंत मुंढे,
द्राक्ष बागायतदार 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com