पंढरपूर (सोलापूर) : अनलॉकनंतर राज्यातील एसटीची प्रवाशी वाहतूक सुरु झाली आहे. राज्यातील प्रमुख असलेल्या पंढरपूर येथील बस स्थानकातूनही प्रवाशी वाहतूक सुरु आहे. दरम्यान, पाच दिवसामध्ये येथील बस स्थानकाला प्रवाशी वाहतुकीतून अवघे चार लाखाचे उत्पन्न मिळाले आहे. तर यासाठी दहा लाख रुपयांचा खर्च झाला आहे. आर्थिक तुटीमुळे आधीच डबघाईला आलेल्या एसटीचे आर्थिक गणित गुंतागुतीचे झाले आहे.
पंढरपूर हे देशातील प्रमुख धार्मिक तीर्थक्षेत्र आहे. येथे विठ्ठल दर्शनासाठी देशाच्या विविध राज्यातून भाविक येतात. यामध्ये एसटीने येणाऱ्या भाविकांची संख्या अधिक आहे. येथील बस स्थानकातून किमान तीन हजार एसटीच्या फेऱ्या होतात. एसटीला आर्थिक हातभार लावणाऱ्या काही प्रमुख आगारापैकी पंढरपूर येथील आगाराचा समावेश आहे. परंतु, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर गेल्या सहा महिन्यांपासून एसटीची प्रवाशी वाहतूक बंद आहे. त्यामुळे एसटीच्या तोट्यात अधिकच वाढ झाली आहे. यामध्ये येथील आगाराचाही समावेश आहे. येथील आगारात शंभर बस गाड्या आहेत. सहा महिन्यांपासून सर्व गाड्या जागीच उभ्या आहेत.
राज्य सरकारने अनलॉक जाहीर केल्यानंतर 20 ऑगस्टपासून पुन्हा एसटीची प्रवाशी वाहतूक सुरु केली आहे. येथील आगारातूनही 22 बस गाड्यांद्वारे प्रवाशी वाहतूक सुरु केली आहे. पुणे, औरंगाबाद, लातूर, सोलापूर, टेंभूर्णी या मार्गावर प्रवाशी वाहतूक सुरु आहे. गेल्या पाच दिवसात 22 बस गाड्यांनी 48 हजार किलोमीटरचा प्रवास केला आहे. या दरम्यान तीन तीन हजार 35 प्रवाशांची ने आण केली आहे. प्रवाशी वाहतूकीतून आगाराला पाच दिवसात केवळ 4 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले. यासाठी तब्बल 10 लाख रुपयांचा खर्च आला आहे. जवळपास पाच ते सहा लाख रुपयांचा तोटा झाला आहे. कोरोनाच्या भितीमुळे केवळ 25 टक्केच प्रवाशी वाहतूक झाली आहे.
प्रवाशी वाहतूक सुरु झाल्यानंतर येथील आगारातील एकूण कर्मचाऱ्यांपैकी 80 कर्मचाऱ्यांना कामावर बोलवण्यात आले आहे. प्रवाशी वाहतूक सुरु करण्यापूर्वी येथील आगारातून मालवाहतूकीसाठी तीन ट्रक तयार केले आहेत. मालवाहतुकीतून आतापर्यंत तीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. यामध्ये तोटा आला आहे. तोटा होत असला तरी प्रवाशी वाहतूक सुरुच ठेवली जाणार आहे. एसटीत प्रवेश देण्यापूर्वी सर्व प्रवासांचे थर्मल स्क्रिनिंग केले जाते. सोशल डिस्टन्साठी एकूण आसन क्षमतेपैकी फक्त 22 प्रवाशांना परवानगी दिली आहे.
याबाबत आगार प्रमुख सुधीर सुतार म्हणाले, की वरिष्ठांच्या सूचनांनुसार 20 आगस्टपासून प्रवाशी वाहतूक सुरु करण्यात आली आहे. पाच दिवसामध्ये येथील आगाराला 22 बस गाड्यांच्या माध्यमातून चार लाखांचे उत्पन्न मिळाले आहे. तर 10 लाखांचा खर्च झाला आहे. सरासरी दिवसाला एक लाखाचा तोटा होत आहे. प्रवाशांनी एसटीने प्रवास सुरु करावा.
संपादन : वैभव गाढवे
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.