पहिलीपासूनच्या शाळा ११ नोव्हेंबरपासून उघडणार

प्राथमिक शिक्षणाधिकाऱ्यांची माहिती; १०० टक्‍के उपस्थितीची अट नाहीच
student
studentsakal media

सोलापूर : राज्यातील कोरोनाची दुसरी लाट ओसरली असून सोलापूरसह राज्यातील १७ जिल्ह्यांमधील ॲक्‍टिव्ह रुग्णसंख्या खूपच कमी झाली आहे. या पार्श्‍वभूमीवर दिवाळी सुट्टी संपल्यानंतर ११ नोव्हेंबरपासून पहिलीपासूनच्या शाळा उघडणार आहेत. परंतु, विद्यार्थ्यांची १०० टक्‍के उपस्थिती व गणेश सक्‍ती असे निर्बंध नसतील, अशी माहिती शालेय शिक्षण विभागातील विश्‍वसनीय सूत्रांनी दिली.

राज्यातील नंदूरबार, धुळे, जालना, हिंगोली, परभणी, नांदेड, अमरावती, अकोला, वाशिम, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली हे जिल्हे कोरोनामुक्‍तीच्या उंबरठ्यावर आहेत. कोरोनामुळे राज्यातील पहिली ते चौथीचे वर्ग मार्च २०१९ पासून पूर्णपणे बंद आहेत. त्यामुळे ज्यांच्याकडे ॲन्ड्राइड मोबाईल नाहीत, ते विद्यार्थी मागील दीड वर्षांपासून शिक्षणापासून दूर आहेत. शाळाबाह्य विद्यार्थ्यांची संख्या वाढू नये, बालविवाहाला चाप बसावा, विद्यार्थ्यांचा शैक्षणिक पाया मजबूत व्हावा, शिक्षणाची गोडी कायम राहावी, या हेतूने आता राष्ट्रीय शिक्षण दिनाचे (११ नोव्हेंबर) औचित्य साधून पहिलीच्या पुढील सर्वच वर्ग सुरु केले जाणार आहेत.

दरम्यान, सध्या शहरातील आठवीच्या पुढील वर्ग सुरु आहेत. आता शहरामधील पाचवीपासूनचे पुढील वर्ग सुरु करण्याच्या दृष्टीनेही तयारी सुरु आहे. दुसरीकडे ग्रामीण भागातील पहिलीच्या पुढील वर्ग सुरु केले जाणार आहेत. पालकांनी तशी मागणीदेखील केली असून शाळा सुरु करण्याच्या दृष्टीने सकारात्मक वातावरण तयार झाल्याचेही शिक्षणाधिकाऱ्यांनी सांगितले. तरीही, राज्यातील कोरोना स्थितीचा आढावा पहिलीपासूनचे वर्ग करण्यासंदर्भात राज्यस्तरावरून काही दिवसांत अंतिम निर्णय जाहीर होणार आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी काही दिवसांपूर्वी सर्व जिल्ह्यांमधील जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, मुख्याध्यापकांशी संवाद साधून त्यांची मते जाणून घेतली आहेत.

निकषांसंदर्भात ठळक बाबी...

  • शाळांमध्ये विद्यार्थ्यांना १०० टक्‍के उपस्थितीचे बंधन नाही

  • कोणत्याही शाळांनी विद्यार्थ्यांना गणवेश सक्‍ती करू नये

  • प्रत्येक शाळेत थर्मल गन, सॅनिटायझरची सोय असावी

  • दोन विद्यार्थ्यांमध्ये किमान सहा फुटांचे अंतर (सोशल डिस्टन्सिंग) बंधनकारक

  • प्रत्येक विद्यार्थ्यांकडे मास्क असायलाच हवा; पालकांच्या संमतीपत्राचे बंधन नाही

"दिवाळी सुट्टी संपल्यानंतर सकाळी दहा ते सायंकाळी सव्वापाच या वेळेत प्राथमिक शाळा भरतील. पहिलीपासूनचे वर्ग ११ नोव्हेंबरपासून सुरु केले जाणार आहेत. सर्वांनी मिळून विद्यार्थ्यांच्या आरोग्यालाच पहिले प्राधान्य द्यावे, असे नियोजन केले आहे."

- किरण लोहार, प्राथमिक शिक्षणाधिकारी, सोलापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com