सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी प्रतीक्षाच ! तांत्रिक चुकांमुळे 'हद्दवाढ'चा पाणीपुरवठा विस्कळीत

सुरळीत पाणी पुरवठ्यासाठी प्रतीक्षाच ! तांत्रिक चुकांमुळे 'हद्दवाढ'चा पाणीपुरवठा विस्कळीत

सोलापूर : उजनी धरण, औज, हिप्परगा तलाव पूर्ण क्षमतेने भरलेला असतानाही शहरातील विस्कळीत पाणीपुरवठ्याचे खापर महावितरण तथा जुन्या पाईपलाईनच्या गळतीवर माथी मारण्याचे काम केले जात आहे. परंतु, नागरिकांच्या पाण्याचा प्रश्‍न विशेषत: हद्दवाढ भागातील पाणीपुरवठा सुरळीत व्हावा, यासाठी आता महापौर श्रीकांचना यन्नम यांनी स्वतंत्र अधिकारी नियुक्‍त केला. मात्र, हद्दवाढ भागाचा विस्तार वाढल्याने आणि बहुतांश नगरे चढावर असल्याच्या तांत्रिक बाबींमुळे हद्दवाढ भागाला नियमित पाण्यासाठी आणखी काही दिवसांची प्रतीक्षा करावी लागणार आहे.

चढावर कमी दाबाने होतोय पाणी पुरवठा; टाक्‍या बांधाव्या लागतील
हद्दवाढ भागातील पाणीपुरवठा तीन दिवसाआड करण्याच्या दृष्टीने नियोजन सुरु आहे. त्यासाठी पाणीपुरवठ्याचा वेळ कमी करुन शहर व हद्दवाढ भागाला तीन दिवसाआड अडीच तास पाणी देण्याचे नियोजन आहे. परंतु, हद्दवाढ भागातील बहुतांश नगरांचा भाग चढावर असल्याने त्यांच्यासाठी पाण्याच्या टाक्‍या बांधाव्या लागतील. 
-सिद्धेश्‍वर उस्तुरगी, अभियंता, सार्वजनिक आरोग्य व पाणीपुरवठा, महापालिका

महापालिका निवडणुकीपूर्वी सत्ताधारी भाजपने शहरवासीयांना दोन दिवसाआड पाण्याचे आश्‍वासन दिले होते. मात्र, शहराला तीन दिवसाआड, तर हद्दवाढ भागाला चार-पाच-सहा दिवसाआड मिळत आहे. 1992 रोजी हद्दवाढ भाग महापालिकेत दाखल झाला. त्यावेळी हद्दवाढ भागातील नागरिकांना दररोज 45 मिनिटे पाणी दिले जात होते. आता हद्दवाढ भागाचा विस्तार वाढत असताना त्यावेळी मोठी पाईपलाइन टाकून त्याला लहान पाईपलाइनची जोड देणे आवश्‍यक होते. मात्र, जागोजागी नगरा-नगरांमध्ये लहान पाईपलाईनलाच सोयीने जोड देण्यात आली. त्यामुळे चढावरील नगरांना तीन-चार तास पाणीपुरवठा करुनही पुरेसे पाणी मिळत नसल्याची तांत्रिक बाब नव्या अधिकाऱ्यांनी आयुक्‍त पी. शिवशंकर यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. त्यानुसार आता महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यमातून हद्दवाढ भागाच्या पाणीपुरवठ्याचा स्वतंत्र आराखडा तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. या आरखड्यानुसार अंमलबजावणी झाल्यानंतर हद्दवाढ भागाचा पाणीपुरवठा सुरळीत होईल, असा विश्‍वास अधिकाऱ्यांनी व्यक्‍त केला आहे.


हद्दवाढ भागाला मिळेल तीन दिवसाआड पाणी
हद्दवाढ भागाला तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याचा प्रयोग शनिवारी (ता. 12) करण्यात आला. शहरातील मध्यवर्ती भागासह हद्दवाढ भागालाही तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्याच्या दृष्टीने नियोजन केले जात आहे. आणखी काही दिवस लागतील. मात्र निश्‍चितपणे नागरिकांचा पाण्याचा प्रश्‍न सुटेल. 
-श्रीकांचना यन्नम, महापौर


निवडणुकीपूर्वी सत्ताधाऱ्यांचे युद्धपातळीवर नियोजन
डिसेंबर 2021 नंतर महापालिकेच्या निवडणुकीचा बिगूल वाजणार आहे. तत्पूर्वी, चार वर्षांपूर्वी सत्ताधाऱ्यांसह अन्य राजकीय पक्षांनी शहरातील नागरिकांना नियमित तथा दोन दिवसाआड पाणी देण्याचे आश्‍वासन दिले होते. कागदोपत्री अधिकाऱ्यांनी तसे शक्‍य असल्याचेही स्पष्ट केले. मात्र, अद्याप त्याची अंमलबजावणी होऊ शकलेली नाही. 365 दिवसांची पाणीपट्टी भरुनही नागरिकांना वर्षातील 100 दिवसही पाणी मिळत नसल्याचे चित्र आहे. हद्दवाढ भागात राहणाऱ्या महापौर श्रीकांचना यन्नम यांनी आता हद्दवाढ भागातील नागरिकांच्या पाण्याचा प्रश्‍न सोडविण्याचे मनावर घेतले असून, त्यानुसार नियोजन सुरु झाले आहे. हद्दवाढ भागातील पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी अक्‍कलकोट रोड, कुंभारी रोड, तुळजापूर रोड, जुळे सोलापूर अशा महत्त्वाच्या 11 ठिकाणी टाक्‍या बांधाव्या लागणार आहेत. त्यात पाणी सोडून पाणीपुरवठा केल्यास हद्दवाढ भागाला तीन दिवसाआड पाणी मिळेल, असा विश्‍वास पाणीपुरवठा विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्‍त केला आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com