शिक्षक ते जिल्हा महिला बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणून विनोद लोंढे ने घेतलेली भरारी

कुटुंबाची विस्कटलेली आर्थिक घडी सुरळीत करण्यासाठी प्रयत्न
विनोद लोंढे
विनोद लोंढेsakal

सोलापूर: 'न हरता, न थकता, न थाबंता प्रयत्न करण्यांसमोर कधी कधी नशीब सुध्दा हारत' म्हणातात ते उगीच नव्हे. याचे उदाहरण म्हणजे साडे (ता. करमाळा) येथील विनोद लोंढे. घरची आर्थिक परिस्थिती, त्यात वडिलांचे आजारपण, पाच बहिणींची लग्ने, शैक्षणिक गुणवत्ता असुनही आर्थिक अडचणींमुळे उच्च दर्जाचे शिक्षण न घेता डिएड करून, कुटुंबाची विस्कटलेली आर्थिक घडी सुरळीत करण्यासाठी प्रयत्न. अशा 'एक ना अनेक संकटांना तोंड देत' शिक्षक ते जिल्हा महिला बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणून घेतलेली भरारी नक्कीच सर्वांसाठी प्रेरणादायी आहे.

त्यांच्या या यशाबद्दल विनोद लोंढे सांगतात की, करमाळा तालुक्यात छोटेसे साडे गाव. घरची आर्थिक परिस्थिती खूप बिकट. त्यात मी आई-वडिलांचे सहावे अपत्य. कुटुंबाचा उदरनिर्वाह हा संपुर्णपणे शेतीवरच अवलंबून असायचा. त्यात दुष्काळी परिस्थिती, नैसर्गिक संकटे त्यामुळे शेती करणे म्हणजे जिकारीचेच काम होते. शेतीशिवाय दुसरा कुठलाही आर्थिक स्तोत्र नसल्याने, घरात अठराविश्वे दारिद्र्य पाचवीलाच पुजलेले. कुटुंबाचा गाडा हाकण्यासाठी आईवडिल शेतमजुरी करत राब-राबत असत. अशा दयनीय परिस्थितीत आणखी एक संकट म्हणजे मी इयत्ता आठवीत असल्यापासून वडिलांच्या मागे अस्थमाचा आजार जडला. त्यामुळे कुटुंबाची आर्थिक घडी आणखी कुमकूवत आली. अशा हलाखीची परिस्थितीत देखील चुलत्यांच्या नातेवाईकांच्या मदतीने पाच बहिणींची लग्ने कशीतरी पार पाडली. वडील आजारी असल्यामुळे शेतमजुरी करणारी व मोलमजुरी करून कमावणारी आई ही एकमेव घरात होती.

परिस्थिती जरी हलाखीची असली तरी, शिक्षणासाठी आई-वडिलांचा चांगले प्रोत्साहन होते. लहानपणापासून शैक्षणिक गुणवत्तेत आलेख प्रगती पथावर होता. व तो चांगला वाढत चालला होता. परंतु घरच्या परिस्थितीमुळे शिक्षणाचा खर्च झेपत नसल्याकारणाने, आईवडिलांनी मला रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा गांधी विद्यालय कर्जत (जिल्हा अहमदनगर) येथील वसतिगृहामध्ये प्रवेश घेऊन पुढील शिक्षण चालू केले. 8 वी ते 10 वी महात्मा गांधी विद्यालय मध्ये केली. त्यानंतर काय करायचे याबाबत घरच्यांना माहीत नव्हते. माझ्या मनानेच मी विज्ञान शाखेमध्ये अकरावीसाठी प्रवेश घेतला. दहावीपर्यंत वस्तीगृहाची सोय होती. पुढील शिक्षणासाठी भाड्याने खोली करून राहणे हा यक्षप्रश्न उभा राहिला. यावर उपाय एकच होता स्वतः कमवायचे अन् शिकायचे. त्यामुळे मग सुट्टी च्या कालावधीत कामाला जाणे हा उपाय शोधला. शिक्षण घेत ऊन्हाळा, दिवाळी सुट्टी मध्ये आईबरोबर शेतात कामाला जाणे, वस्तीवरील मित्रांबरोबर विहिरीवर कामाला जात असे, कोणाची पाईपलाईन खोदायला घेणे अशा प्रकारची कामे केली. आपण शिकलो तरच कुटुंबाची आर्थिक परिस्थिती सुधारेल हे चांगलेच माहीत होते. त्यामुळे त्या दृष्टीने वाटचाल सुरू होती. संकटे अनेक येत होती परंतु हार मानायची हे पण तितकेच पक्क केल होत.

बारावीला खूप चांगले गुण घेऊन पास झालो. परंतु इंजिनिअरिंग मेडिकल तिकडे जाण्याची आपली परिस्थिती नाही. याची पूर्ण कल्पना होती. त्यामुळे नाईलाजास्तव नामदेवराव जगताप अध्यापक विद्यालय करमाळा येथे, अध्यापन पदविका डीएड करता प्रवेश घेतला. आणि 2008 साली पूर्ण केले. लगेच 2009 साले प्राथमिक शिक्षक या पदावर जिल्हा परिषद ठाणे अंतर्गत मुरबाड तालुक्यात शिक्षक या पदावर रुजू झालो. तोपर्यंत स्पर्धा परीक्षा वगैरे काहीही मनीध्यानी नव्हते. गुणवत्ता होती परंतु परिस्थितीची अडचण होती. नोकरीचा ठिकाणी आदिवासी भाग. तिथे कुठलीही सोयीसुविधा नव्हती. याकाळातच डी.एड करत असतानाचे ओळखीचे असलेले अनिल दौंडे व अनिल हेळकर या दोन्ही शिक्षकांची तहसीलदारपदी स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून निवड झाली. त्यामुळे आपणही करू शकतो याची जाणीव निर्माण झाली. 2012 पासून स्पर्धा परीक्षेच्या अभ्यासाला सुरुवात केली व 2016 च्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या माध्यमातून बालविकास प्रकल्प अधिकारी म्हणून निवड झाली. यामध्ये आई-वडील पत्नी, मित्रमंडळी यांनी प्रेरणा दिली. एकंदरीत पाहिले असता जीवनात यश हे खडतर अडचणी असतानाही ही चांगल्या प्रकारे मिळू शकते फक्त त्याच्याकडे सकारात्मकपणे पाहण्याची दृष्टी हवी. सध्या श्रीगोंदा येथे महिला व बाल विकास प्रकल्प अधिकारी म्हणून कार्यरत आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com