Solapur News : नद्या, कालव्यांच्या पुनरुज्जीवनाची गरज; सिंचन प्रकल्पाचे बळकटीकरण महत्त्वाचे

सोलापूर जिल्ह्यात रस्त्यांचे जाळे विणले गेले, ही चांगली बाब आहे. मात्र, त्याचा आनंद घेण्यासाठी ग्रामीण जनतेचा आर्थिक स्तर उंचवायला प्राधान्य दिले पाहिजे.
ujani dam water
ujani dam watersakal

सोलापूर - सोलापूर जिल्ह्यात रस्त्यांचे जाळे विणले गेले, ही चांगली बाब आहे. मात्र, त्याचा आनंद घेण्यासाठी ग्रामीण जनतेचा आर्थिक स्तर उंचवायला प्राधान्य दिले पाहिजे. त्यासाठी सिंचन प्रकल्पांचे बळकटीकरण गरजेचे आहे. त्यात उजनीतून गाळ काढण्यासह नद्या व कालव्यांचे पुनरुज्जीवन होण्याची आवश्यकता असल्याचे सिंचन क्षेत्रातील तज्ज्ञांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली.

उजनी धरण हे जिल्ह्याच्या पाण्याचे मुख्य स्त्रोत आहे. ४० - ४५ वर्षातील वापराने त्याचे कालवे कमकुवत झाले आहेत. त्यांचे पुनरुज्जीवन करावे. आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करुन पाईपलाईनद्वारे संगणकीकृत यंत्रणेच्या नियंत्रणाद्वारे पाणीपुरवठा केल्यास सिंचन क्षेत्र वाढेल. तर याच प्रकल्पातील शेवटच्या भागातील चार तालुके अजुनही पाण्याच्या प्रतिक्षेत आहेत.

त्यासाठी पाण्याचे समान वाटप व्हावे. नव्या प्रकल्पांसाठी तांत्रिकदृष्ट्या उचित स्थळ उपलब्ध होण्यातील मर्यादा, वाढलेल्या भूसंपादन दरामुळे येणारा अवाढव्य खर्च, त्यातून होणारा पाणीसाठा याचे गुणोत्तर आणि लाभ याचा विचार करता पावसाळ्यात पाण्याचा प्रत्येक थेंब अडवण्यावर भर द्यावा.

सोलापूर शहराबाबत विचार केल्यास ११७ टीएमसी क्षमतेचे मोठे धरण उशाला आहे, ही जमेची बाजू आहे. शहर परिसरातील एकरुख, होटगी, सोरेगाव तलावांची साठवण क्षमता वाढवून उजनीचे पाणी आणल्यास शहराच्या पाण्याचा प्रश्न सुटेल.

ठळक मुद्दे

  • कृष्णा - भीमा स्थिरीकरण योजना व्हावी. पश्चिम महाराष्ट्रातील नद्यांचे पुराचे पाणी तुटीच्या खोऱ्यात वळवले पाहिजे.

  • म्हैसुरुच्या धरण व वृंदावन उद्यानाच्या धर्तीवर एकरुख तलावाचे पुनर्निर्माण व्हावे.

  • जवळगाव, हिंगणी प्रकल्पात उजनीचे पाणी आणण्याचा विचार व्हावा. त्यासाठी सौरऊर्जेचा वापर करावा.

  • भीमा, सीना, माण नद्यांवरील कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यांचे आयुष्यमान संपत आल्याने मोठ्या क्षमतेचे बॅरेज कम बंधारे बांधावेत.

  • भीमा - सीना जोडकालवा व्हावा. त्याचा दक्षिण, उत्तर तालुक्याला लाभ होईल.

  • बुद्धेहाळ, मांगी, आष्टी आदी तलावांना भरण्यासाठी पावसाळ्याच्या योजना तयार कराव्यात.

  • कालव्यांच्या बाजुने झाडे लावावीत. त्यातून पर्यावरण रक्षणासह उत्पन्नाचे स्रोत निर्माण होईल.

  • नद्यांतील माती, झाडे काढून त्यांचे आरोग्य सुधारावे. त्यासाठी सांडपाणी प्रक्रिया करुनच त्यात सोडावे.

मानवी जीवनासह कृषी उत्पादन, औद्योगिकीकरणाच्या प्रगतीच्या अर्थकारणाचा पाणी हा मूळ गाभा आहे. पावसाळ्यात पडणाऱ्या पाण्याचे प्रत्येक थेंब अडविणे, वाहून जाणारे पुराचे पाणी वळविणे याला प्राधान्य द्यायला हवे. त्यासाठी पाझर तलाव, साठवण तलावांत पाणी सोडण्याच्या योजना राबवायला हव्यात. त्यासाठी सर्वांनीच जनहितासाठी पक्षीय मतभेद, विचारभिन्नता बाजुला ठेवून सिंचनप्रश्नी राजकीय इच्छाशक्ती दाखवायला हवी.

- प्रल्हाद कांबळे, निवृत्त अभियंता, सोलापूर

जिल्ह्याचा पाण्याबाबत उजनी धरण हे मुख्य स्त्रोत आहे. मात्र, त्याकडे सरकारचे दुर्लक्ष होत आहे. धरणात सुमारे २० ते २५ टक्के माती व वाळू असा गाळ आहे. एकीकडे कालवे वाढत आहेत. तर दुसरीकडे धरणाची साठवण क्षमता कमी होत आहे. तातडीने गाळ काढण्याचा निर्णय व्हायला हवा. त्यातून सरकारला आर्थिक उत्पन्न मिळेल. शिवाय धरणाची साठवण क्षमता वाढून सिंचन, उद्योगासाठी जादा पाणी उपलब्ध होईल. नद्यांच्या पुनरुज्जीवनाकडे लक्ष देण्याची गरज आहे.

- डॉ. पोपट माळी, जलतज्ज्ञ, सोलापूर

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com