सोलापूर : शेती असो वा पिण्याच्या पाण्यासाठी उजनीची मोठी मदत आजवर झाली आहे. मात्र, ढिसाळ नियोजनामुळे पूर्ण क्षमतेने भरलेले धरण पावसाळ्यापूर्वीच तळ गाठते. सोलापूर शहरासाठी दरवर्षी 20 ते 25 टीएमसी पाणी चार-पाच रोटेशनद्वारे सोडले जाते. मात्र, प्रत्यक्षात सोलापूरकरांना 0.40 टीएमसीच पाणी मिळते. दररोज पाणी मिळेल इतके पाणी सोडूनही उजनी ते सोलापूर जुन्या पाइपलाइनला लागलेली गळती अन् शहरातील जुनाट अंतर्गत पाइपलाइनमुळे उन्हाळा असो वा पावसाळ्यातही सोलापूरकरांना चार-पाच दिवसांआड पाणी भरावे लागत आहे.
महापालिकेवर यापूर्वी भाजप वगळता सातत्याने कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसचीच सत्ता राहिली आहे. आता भाजपचीच सत्ता असून महापालिकेतील सत्तांतरातील कारणांमध्ये पाण्याचा प्रश्न प्रमुख राहिला. तत्पूर्वी, महापालिकेच्या माध्यमातून राजकारणात नावलौकिक मिळविलेल्या नेत्यांनी स्वत:च्या प्रभागाच्या विकासासाकडे लक्ष दिले नाही. भविष्याचा प्लॅन करून त्याचवेळी पाइपलाइन टाकली असती, तर आता विस्कळित पाणीपुरवठ्याचा प्रश्न निर्माण झाला नसता, असे महापालिकेतील विद्यमान अधिकारी सांगू लागले आहेत.
आता सोलापूर-उजनी दुसरी समांतर जलवाहिनी टाकण्याचे काम स्मार्ट सिटीतून सुरू आहे. मात्र, हे काम पूर्ण झाल्यानंतर नागरिकांना नियमित पाणी मिळेल की नाही, यावर कोणताही वरिष्ठ अधिकारी ठामपणे उत्तर देऊ शकत नाही. त्यामुळे दरवर्षी कोट्यवधी रुपये पाण्यात घालण्यापेक्षा नागरिकांना नियमित पाणी मिळावे, म्हणून तो निधी नियोजनबद्ध पद्धतीने खर्च करण्याची गरज आहे. त्यासाठी वरिष्ठ नेतेमंडळींनी आपापल्या पक्षातील पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केल्यास निश्चितपणे सोलापूरकरांची तहान नियमित भागेल, अशी अपेक्षा आहे.
शहराच्या पाण्याची वार्षिक स्थिती...
अबब... शहरातील 25 टक्के भागात पाइपलाइनच नाही
1992 मध्ये सोलापूरशेजारील 13 गावांचा शहरात समावेश झाला आणि त्याला हद्दवाढ असे नाव पडले. हद्दवाढ होऊन आता 29 वर्षांचा काळ लोटला, परंतु 25 टक्के भागात अद्याप पिण्याच्या पाण्याची पाइपलाइनच झालेली नाही. हद्दवाढ भागाचा टप्प्याटप्प्याने विस्तार झाला, मात्र नागरिकांना त्या ठिकाणी पुरेशा पायाभूत सुविधाच देण्यात आल्या नाहीत. या पार्श्वभूमीवर तेथील नागरिकांना उन्हाळा असो वा पावसाळ्यातही टॅंकरद्वारेच पाणीपुरवठा करावा लागत आहे. मागील 30 वर्षे महापालिकेवर कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसची सत्ता असतानाही हा प्रश्न सुटलेला नाही. आता भाजप सत्ताधाऱ्यांनीही त्याकडे गांभीर्याने पाहिले नाही, अशी चर्चा आहे. कोट्यवधींची कामे करत असतानाच नगरसेवक पाण्याकडे कधी लक्ष देणार, राज्याच्या सत्ताकेंद्राचे प्रमुख म्हणून ओळखले जाणारे पवार साहेब आता तुम्हीच लक्ष द्या, अशी मागणी होऊ लागली आहे.
संपादन : श्रीनिवास दुध्याल
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.