नीरव शांतता पसरलेल्या शाळांमध्ये पुन्हा किलबिलाट ! हळूहळू वाढतेय विद्यार्थ्यांची संख्या

kettur School
kettur School

केत्तूर (सोलापूर) : शासनाच्या मार्गदर्शक सूचनांप्रमाणे तब्बल नऊ महिन्यांच्या विश्रांतीनंतर शाळेची घंटा वाजली. कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत असला तरी, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर विशेष खबरदारी घेऊन शाळांमध्ये अध्यापनाचे काम सुरू झाले आहे. शासनाने सांगितल्याप्रमाणे सध्या इयत्ता नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू झाले असून, सुरवातीपेक्षा शाळांमध्ये विद्यार्थ्यांची उपस्थिती हळूहळू वाढत आहे. त्यामुळे नऊ महिने नीरव शांतता पसरलेल्या शाळा व परिसरात आता मुलांची किलबिलाट वाढली आहे. 

करमाळा तालुक्‍यातील केत्तूर येथील नेताजी सुभाष विद्यालयात शिक्षक - पालक सभेत झालेल्या निर्णयानुसार 27 नोव्हेंबरपासून इयत्ता नववी ते बारावीचे वर्ग सुरू करण्यात आले असून, शिक्षकांची कोरोना चाचणी घेण्यात आली आहे. यादरम्यान कोरोना संसर्गाच्या भीतीने विद्यार्थ्यांनी शाळा सुरू होऊनही शाळांकडे पाठ फिरवली होती. सुरवातीला विद्यार्थ्यांची 10 ते 15 टक्के उपस्थिती होती, नंतर मात्र महिनाभराच्या कालावधीनंतर विद्यार्थी व पालकांचा प्रतिसाद मिळत असल्याने व शाळा पूर्ण खबरदारी घेत असल्याने विद्यार्थ्यांची उपस्थिती हळूहळू वाढत असून, सध्या ती 70 टक्‍क्‍यापर्यंत गेली आहे. 

शाळांमधून प्रत्यक्षरीत्या अध्यापनास चांगली सुरवात झाली असून शाळेत सोशल डिस्टन्स व मास्कची सक्ती करण्यात आली आहे. सध्या राज्यात तसेच जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने कमी होत आहे. त्यामुळे पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत पाठविण्याबाबत सकारात्मकता दाखवली आहे. त्याचाच परिणाम म्हणून विद्यार्थी संख्या वरचेवर वाढत आहे. 

मध्यंतरी तालुक्‍यामध्ये बिबट्याचा वावर असल्याने भीतीमुळे विद्यार्थी संख्या घटली होती. परंतु ती आता सुरळीत झाली आहे, असे प्राचार्य ज्ञानेश्वर शिंदे यांनी "सकाळ'शी बोलताना सांगितले. 

कोरोना संसर्गाविषयी विद्यार्थ्यांमध्ये जनजागृती करण्यात येत असून, कोरोनाबाबत घ्यावयाची काळजी याबाबत सूचना देण्यात आली आहे. विद्यार्थीही त्याचे पालन करीत आहेत. महिनाभरात उपस्थिती चांगली वाढली आहे. 
- राजेंद्र मदने, शिक्षक 

ऑनलाइन शिक्षणापेक्षा विद्यार्थी व शिक्षकांचा थेट व प्रत्यक्ष संवाद होणे गरजेचे होते, तो आता सुरू झाला आहे. 
- लक्ष्मण महानवर, शिक्षक 

शाळेमध्ये कोरोना संसर्गाविषयी योग्य ती खबरदारी घेतली जात असून, कोरोनाची भीती व धास्तीही आता कमी झाली आहे. त्यामुळे मुलांना शाळेत पाठवत आहे. 
- दत्तात्रय कोकणे, पालक 

कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर शाळा सुरू करण्यापूर्वी पालक व शिक्षकांची बैठक होऊन शाळा सुरू करण्याविषयीचे शासनाने सांगितलेले सर्व नियम व अटी सांगण्यात आल्या. त्यानुसार त्याची काटेकोर अंमलबजावणी करण्यात येत असल्याने विद्यार्थ्यांची संख्या वरचेवर वाढत आहे, ही चांगली बाब आहे. 
- अशोक पाटील, अध्यक्ष, शाळा व्यवस्थापन समिती 

संपादन : श्रीनिवास दुध्याल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com