
जैविक विघटन होणाऱ्या कचऱ्यापासून कमी खर्चात घनइंधन बनवणे, ज्यामुळे जास्त उष्णताही मिळेल व कमीत कमी कार्बन वायू आणि धुराचे उत्सर्जन होईल, असे या संशोधनाचे स्वरूप आहे.
सोलापूर : येथील तरुण संशोधक प्रणव श्रीकांत पागे (Pranav Page) आणि धातूशास्त्राचे अभ्यासक प्रा. शेखर जेऊरकर (Pro. Shekhar Jeurkar) यांनी सादर केलेल्या 'Low Cost Biowaste Fuel Briquetts and Method of its Manufacturing thereof' या संशोधन प्रकल्पास भारत सरकारच्या (Government of India) पेटंट विभागाकडून (Department of Patents) 'पेटंट' प्राप्त झाले आहे. सध्या पर्यायी ऊर्जा निर्मितीच्या प्रश्नावर हे संशोधन अत्यंत महत्त्वाचे मानले जात आहे.
जैविक विघटन होणाऱ्या कचऱ्यापासून कमी खर्चात घनइंधन बनवणे, ज्यामुळे जास्त उष्णताही मिळेल व कमीत कमी कार्बन वायू आणि धुराचे उत्सर्जन होईल, असे या संशोधनाचे स्वरूप आहे. जैविक विघटनयोग्य कचरा हा घरगुती, नैसर्गिक आणि कारखाने या तीन ठिकाणी तयार होतो. तो एकत्र गोळा करण्यासाठीचा खर्च, वाहतूक किंवा त्याची साठवणूक करणे हे वरील तीन वेगवेगळ्या ठिकाणी करावे लागते. या संशोधनात हे तीनही एकत्र करून त्याचे रूपांतर ज्वलनशील पदार्थामध्ये करता येईल, अशी प्रक्रिया आहे.
घरगुती, नैसर्गिक आणि कारखान्यात होणाऱ्या प्रक्रियेत तयार होणाऱ्या बायप्रोडक्ट्सचे रूपांतर उपयुक्त पदार्थामध्ये किंवा इंधनामध्ये करण्याच्या पद्धतीमध्ये योग्यरीतीने बदल घडवून घन स्वरूपात चकत्या बनवायची पद्धत विकसित केली आहे. हे घन इंधन कुठल्याही पारंपरिक ऊर्जा उपकरणात वापरता येईल. तीन ते चार महिने हे इंधन टिकेल व न वापरल्यास "रिसायकल" करता येईल. खेड्यातील चुलींसाठी कोळशाऐवजी हा उत्तम पर्याय होऊ शकेल. तसेच शहरातील घनकचरा व्यवस्थापन यामुळे सुलभ होईल. वेगवेगळ्या प्रयोगशाळांमध्ये विहित चाचण्या घेऊन हे संशोधन पेटंट मान्यताप्राप्त झाले आहे.
प्रणव पागे हा मुंबई आयआयटीमध्ये इंजिनिअरिंगचे शिक्षण घेत आहे. प्रणव याने आतापर्यंत डॉ. होमीभाभा यंग सायंटिस्ट परीक्षेत दोन वेळा सुवर्णपदक मिळविले आहे. पुढील काळात लोकोपयोगी संशोधन करण्याचा त्यांचा मानस आहे. प्रा. शेखर जेऊरकर हे धातू अभियंता असून सोलापूरमधील नामवंत अभियांत्रिकी महाविद्यालयात त्यांनी धातूशास्त्राचे अध्यापक म्हणून काम केले आहे. इन्स्टिट्यूशन ऑफ इंजिनिअरिंग, सोलापूर आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मेटल्स, पुणे या नामवंत संस्थांवर ते कौन्सिल मेंबर आहेत. सध्या धातूशास्त्र विषयाचे ते सल्लागार व चार्टर्ड इंजिनिअरिंग म्हणून कार्यरत आहेत.
कोळसा प्रकरणावर पर्याय
सध्या राज्यभरात कोळशाची कमतरता हा विषय गंभीर झाला आहे. त्यावर या संशोधनातून एक चांगला पर्याय निघू शकतो. कारण, सध्या कचरा गोळा करणे, वाहतूक व त्यावर प्रक्रिया करून वीजनिर्मितीची सध्याची प्रक्रिया ही जास्त खर्चाची आहे. तसेच सध्या कारखान्यातील मळी, चिपाडे, झाडांची पाने, फांद्या या प्रकारचा सर्व जैविक कचरा हाच उत्तम कच्चामाल म्हणून वापरता येणार आहे. त्यादृष्टीने त्याला मोठे महत्त्व आहे. त्यामुळे कोळशाच्या सध्याच्या टंचाईसाठी हे संशोधन महत्त्वाचे ठरू शकते, असा दावा संशोधकांनी केला आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.