पंढरपूरच्या पोटनिवडणुकीमुळे मिळाला अक्कलकोटच्या आठवणींना उजाळा !

पंढरपूरच्या पोटनिवडणुकीमुळे मिळाला अक्कलकोटच्या आठवणींना उजाळा
Awtade_Mhetre
Awtade_MhetreCanva

सोलापूर : पंढरपूरच्या पोटनिवडणुकीच्या निकालामुळे (Pandharpur by-elecction resut) अक्कलकोटच्या (Akkalkot) 1998मध्ये झालेल्या पोटनिवडणुकीच्या आठवणींना पुन्हा एकदा उजाळा मिळाला आहे. त्याचे कारणही तसेच आहे. तेव्हाच्या सत्तारूढ सरकारमधील घटक पक्ष भारतीय जनता पक्षाच्या (BJP) उमेदवाराचा विरोधी कॉंग्रेस पक्षाच्या (Congress) उमेदवाराने केलेला पराभव. तेव्हाही भाजप- सेना युतीच्या मंत्रिमंडळातील डझनभर मंत्र्यांनी लावलेली हजेरी, यांसारख्या काही घटनांमध्ये साम्य आढळल्याने आठवणी जाग्या झाल्या. (The Pandharpur by-election brought back memories of Akkalkot)

1995 च्या अत्यंत चुरशीच्या झालेल्या विधानसभा निवडणुकीत अक्कलकोट मतदारसंघात झालेल्या (कै.) म. शफी टिनवाला (कॉंग्रेस), चंद्रकांत इंगळे (बहुजन समाज पार्टी) आणि सिद्रामप्पा पाटील (अपक्ष) व (कै.) बाबासाहेब तानवडे (भारतीय जनता पक्ष) अशा चौरंगी लढतीत (कै.) तानवडे यांनी विजयश्री खेचून आणली होती. भारतीय जनता पक्षाचा बालेकिल्ला म्हणून अक्कलकोटची तेव्हापासूनची ओळख. 1998 मध्ये सोलापूरहून पुण्याकडे निघालेल्या (कै.) तानवडे यांचा अपघाती मृत्यू झाला. अक्कलकोट मतदारसंघात प्रचंड हळहळ व्यक्त झाली. जनभावना तीव्र होत्या. (कै.) बाबासाहेब म्हणजे तालुक्‍यातील कार्यकर्त्यांचे श्रद्धास्थानच. त्यांची छायाचित्रे आजही अनेकांनी आपल्या घरात, आस्थापनात लावलेली आहेत. अशा बाबासाहेबांच्या अचानक जाण्याने तालुक्‍याची मोठी हानी झाली. कारण, भारतीय जनता पक्ष व शिवसेनेचे युती सरकार त्या वेळी सत्तेवर होते.

Awtade_Mhetre
"पूर्वग्रह बाळगून मराठा समाजाला सापत्न वागणूक ! सरकारला परिणाम भोगावे लागतील'

(कै.) तानवडे यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेवर पोटनिवडणूक लागली. पक्षातून अन्‌ सर्वच पातळीवरून (कै.) बाबासाहेबांची पत्नी महानंदा की मुलगा प्रसन्न? अशी द्विधा मन:स्थिती होती. त्यातच (कै.) बाबासाहेबांचे भाऊ दत्तात्रय तानवडे यांचे नावही चर्चेत होते. त्यांचाही जनसंपर्क दांडगा होता. कार्यकर्त्याला हाताळण्याची वेगळी पद्धत होती. शेवटी पक्षाने सहानुभूती मिळवण्यासाठी महानंदा तानवडे यांना उमेदवारी दिली. पंचायत समितीचे तत्कालीन सभापती सिद्धाराम म्हेत्रे यांना कॉंग्रेसकडून उमेदवारी मिळाली. पंढरपूरच्या पोटनिवडणुकीत जयश्री भारत भालके यांना उमेदवारी देऊन सहानुभूती मिळवण्याची योजना होती. परंतु, नंतर भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आली. आता निवडणूक निकालानंतर जयश्रीताईंना उमेदवारी दिली असती तर..? अशा चर्चेला पुन्हा उधाण आले आहे.

पंढरपूरच्या पोटनिवडणुकीप्रमाणेच अक्कलकोटच्या पोटनिवडणुकीत सेना- भाजप युतीच्या डझनभर मंत्र्यांनी प्रचारसभा, गावोगाव भेटीगाठी, संपर्क सारे काही केले होते. तत्कालीन उपमुख्यमंत्री (कै.) गोपीनाथ मुंडे यांचे (कै.) तानवडे यांच्यावर विशेष प्रेम होते. त्यांनी तर अक्कलकोटला ठाण मांडून महानंदाताईंना विजयी करण्याचा चंगच बांधला होता. परंतु श्री. म्हेत्रे यांनी दोन हजार 828 मतांनी विजय मिळवला. त्या वेळी एकत्र कॉंग्रेसमध्ये असलेले शरद पवार यांचा श्री. म्हेत्रे यांच्या पाठीवर "हात' होता. विद्यमान आमदाराच्या निधनानंतर आजपर्यंत झालेल्या निवडणुकीत सहानुभूतीच्या लाटेवर संबंधितांची पत्नीच निवडून येत होती, असा इतिहास (अपवाद असू शकेल) होता. परंतु अक्कलकोटमध्ये मात्र चित्र वेगळे दिसले. आज पंढरपुरातही तीच स्थिती आहे. (कै.) भालके यांच्या निधनानंतरच्या पोटनिवडणुकीत सहानुभूतीचा लाभ मिळालेला नाही. या निमित्ताने अक्कलकोटच्या पोटनिवडणुकीवेळच्या आठवणी मात्र ताज्या झाल्या.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com