शिक्षणाधिकाऱ्यांचा ‘हा’ आदेश शाळांनी धुडकावला! ६९ मुख्याध्यापकांचे थांबणार वेतन

समायोजन झालेल्या सर्व अतिरिक्त शिक्षकांनी संबंधित शाळांमध्ये तत्काळ रुजू व्हावे आणि शाळांनीही त्यांना रूजू करून घ्यावे, असे आदेश प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी दिले. पण, ६९ शाळांनी अतिरिक्त शिक्षकांना रूजू करून न घेता शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश डावलले.
शाळांचा निर्णय
शाळांचा निर्णयEsakal

सोलापूर : शहर-जिल्ह्यातील जवळपास ११९ अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया पार पडली. त्यानंतर समायोजन झालेल्या सर्व अतिरिक्त शिक्षकांनी संबंधित शाळांमध्ये तत्काळ रुजू व्हावे आणि शाळांनीही त्यांना रूजू करून घ्यावे, असे आदेश प्राथमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी दिले. पण, ६९ शाळांनी अतिरिक्त शिक्षकांना रूजू करून न घेता शिक्षणाधिकाऱ्यांचे आदेश डावलले आहेत.

खासगी प्राथमिक शाळांमधील काही शिक्षक पटसंख्या कमी झाल्याने अतिरिक्त झाले. शालेय शिक्षण विभागाच्या आदेशानुसार त्यांचे समायोजन प्रक्रिया पार पडली. त्यावेळी शिक्षणाधिकाऱ्यांनी संबंधित शिक्षकांचे वेतन थांबवण्याचे आदेश दिले होते. पण, अनुदानित संस्थांनी त्यांच्या नियमाला बगल देत अतिरिक्त शिक्षकांना रूजू करून घेतलेच नाही. त्यामुळे आता त्या शिक्षकांना पूर्वीच्याच शाळेत हजर करून घेऊन त्यांचे वेतन काढावे, असे नवे आदेश देण्याची नामुष्की शिक्षणाधिकाऱ्यांवर ओढावल्याचे बोलले जात आहे. दुसरीकडे चार-पाच शिक्षकांना शाळा रुजू करून घ्यायला तयार असतानाही ते संबंधित शाळेत गेलेले नाहीत. त्यामुळे त्यांची सेवा खंडित करण्याचा इशाराही शिक्षणाधिकाऱ्यांनी दिला आहे. शासनाचे अनुदान घेऊनही शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश न पाळणाऱ्या शाळांवर खरोखरच कारवाई होणार का, असा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झाला आहे. दरम्यान, शिक्षणाधिकाऱ्यांनी त्या ६९ शाळांच्या मुख्याध्यापकांचे वेतन थांबवावे, असेही आदेश दिले आहेत. या आदेशानंतर तरी संबंधित शाळा त्या अतिरिक्त शिक्षकांना रूजू करून घेतील का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

बदली झालेले १०० शिक्षक आलेच नाहीत

शिक्षक बदल्यानंतरही मानवी हस्तक्षेप टाळण्यासाठी ग्रामविकास विभागाने यंदा प्रथमच ऑनलाइन पध्दतीने शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांची प्रक्रिया पार पाडली. २२ ऑगस्ट रोजी ही प्रक्रिया संपल्यानंतर ५ सप्टेंबरपर्यंत संबधित शिक्षकांना पूर्वीच्या शाळेतून कार्यमुक्त करून नवीन ठिकाणी रुजू व्हावे, असेही आदेश ग्रामविकास विभागाने दिले. पण, आता १५ सप्टेंबर उजाडला तरीदेखील सोलापूर जिल्ह्यात येणारे जवळपास १०० शिक्षक अजून आलेले नाहीत.

बदलून गेले ६६ अन्‌ केवळ २२ आले

सोलापूर जिल्ह्यातील ६६ शिक्षक आंतरजिल्हा बदलीतून दुसऱ्या जिल्ह्यात गेले आहेत. पण, दुसऱ्या जिल्ह्यातून सोलापूर जिल्ह्यात केवळ २२ शिक्षक आले आहेत. अगोदरच जिल्ह्यातील प्राथमिक शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त असल्याने अनेक शाळांना पुरेसे शिक्षक नाहीत. त्यामुळे आता शिक्षणाधिकाऱ्यांनी आंतरजिल्हा बदलीतील शिक्षकांनी १५ सप्टेंबरपर्यंत रुजू व्हावे, असे स्पष्ट केले आहे. पण, ज्या जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांची रिक्तपदे १० टक्के किंवा त्याहून अधिक आहे, तेथून अजून काही शिक्षकांना कार्यमुक्त केलेले नाही. त्यामुळे बदली होऊनही काही शिक्षक त्याच ठिकाणी अडकून पडल्याची स्थिती आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com