‘त्यामुळे’ कांद्याला नाही दर...; शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी, व्यापाऱ्यांचे मत काय वाचा

As the Solapur Agricultural Produce Market Committee is closed farmers onions fall on thousands of hectares
As the Solapur Agricultural Produce Market Committee is closed farmers onions fall on thousands of hectares

सोलापूर : यावर्षी सुरुवातीला कांद्याला चांगला दर मिळाला. त्यामुळे शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड मोठ्या प्रामणात केली. काही शेतकऱ्यांनी तर ज्वारी मोडून कांदा केला. तर काही शेतकऱ्यांनी उसाची लागवड करताना सऱ्यांमध्ये कांदा लावला. मात्र, सध्या शेतात कांदा टाकून देण्याची वेळ आली आहे. 
वर्षाच्या सुरुवातीला यंदा कांद्याला चांगला दर होता. पुन्हाही चांगला दर मिळेल या आशेनी शेतकऱ्यांनी कांद्याची लागवड केली. तो कांदा एफ्रिल व मे महिन्यात विकण्यासाठी आला. मात्र कोरोना व्हायरसला रोखण्यासाठी राज्यात मार्चपासून लॉकडाऊन सुरु झाला. त्यामुळे काही ठिकाणी शेतकरी कृषी उत्पन्न बाजार समित्या बंद होत्या. आता लॉकडाऊन उठेल आणि कांदा विक्रीसाठी नेता येईल अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र, लॉकडाऊन वाढतच गेला. त्यात शेतकऱ्यांच्या कृषी मालाला विक्रीस सरकारने परवानगी दिली,  पण त्याला हवा तसा दर नसल्याने तसाच माल शेतात ठेवला. त्यानंतर कोरोनाचे रुग्ण वाढत गेल्याने शहराकडे येण्यासही शेतकऱ्यांनी पाठ केली. त्यामुळे तसाच कांदा शेतात पडून आहे. 
सोलापुरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
शेतकरी मिलींद रोकडे म्हणाले, गेल्यावर्षी पाऊस पडला नव्हता. त्यामुळे कांदा लागवड करता आला नाही. आणि त्याचवेळी काही शेतकऱ्यांनी थोडीफार लागवड केली होती. त्यांच्या कांद्याला चांगला बाजार मिळाला. त्यानंतर पावसाळ्याच्या शेवटी बरा पाऊस झाला. त्यामुळे शेतात ज्वारी केली. आणि तेव्हाच कांद्याला चांगला दर आला होता. ज्वारीही मोठ्या प्रमाणात झाल्याने काही ज्वारीत कांदा करण्याचा निर्णय घेतला. तो कांदा मार्च, एफ्रिलच्या दरम्यान विक्रीसाठी आला. तेव्हाही दर बऱ्यापैकी होता. मात्र, त्याचवेळी कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाला. आता लॉकडाऊन उठेल आणि दर चांगला मिळेल या आशेने मजुर लाऊन कांदा काढला. मात्र तेव्हापासून तसाच कांदा शेतात पडला आहे. काही व्यापाऱ्यांनी कांदा शेतात येऊन मागितला होता. पण खूप कमी दर होता त्यामुळे कांदा विकला नाही. आता शेतात तसाच कांदा पडला असून नासू लागला आहे.
बापू मुरुमकर म्हणाले, आम्ही उसात कांदा केला होता. एफ्रिलमध्ये मजूर लाऊन कांदा काढला. मात्र, तेव्हापासून दर न मिळाल्याने कांदा तसाच ठेवला.  मे महिना तसाच गेला. मे मध्ये दोनवेळा पाऊस पडला, तेव्हा झाकून ठेवला. तेव्हापासून रोज सायंकाळी कांदा झाकणे आणि सकाळी उघडा करुन ठेवणे हे काम सुरु आहे. काल झालेल्या पावसामुळे कांदा पुन्हा झाकून ठेवला आहे. निमा कांदा तसाच उसात सोडून दिला आहे. कांदा काढायला लावलेल्या मजूरांची मजूरी सुद्धा दिलेली नाही. कांदा विकल्यावर मजुरी द्यायची असं सांगितले होते. मजुरांनाही काही काम नसल्याने पैसे, आजचे उद्या मिळतील या आशेने आले. पण अद्याप कांदा विकला नाही. आता कांदा नासू लागला आहे. कसं हे नुसकान भरुन काढायचे हा प्रश्‍न पडला आहे. 
१५ दिवसानंतर निर्णय...
सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील कांदा व्यापारी केदारी उंबरजे म्हणाले, सोलापूरमध्ये कांदा मार्केट सुरु झाला तर १०- २० गाड्या नाही तर २०० ते ३०० गाड्या लगेच येथील. पण येथून पुढे जाणाऱ्या गाड्या या मद्रास, अंध्रप्रदेश, केरळ आदी ठिकाणी कांदा घेऊन जातात. तेवढा कांदा आता तिथेही जात नाही. कारण लॉकडाऊन हा सगळीकडे आहे. त्यात हॉटेल बंद आहेत. हॉटेलला कांदा मोठ्याप्रमाणात लागतो. याशिवाय लग्न समारंभातही स्वयंपाकासाठी कांदा मोठ्याप्रमाणात लागतो. मात्र, सध्या लग्नसुद्धा मोठी होत नाहीत. सोलापूर मार्केट ३ एप्रिलला बंद झाले होते. त्यानंतर एक दिवस प्रायोगीकतत्वावर मार्केट सुरु केले होते. पण तेव्हा एकदम ७०० गाड्या कांदा आल्या. त्यातून सरकारच्या नियमांचे पालन होत नसल्याचे समोर आले. कारण मार्केटमध्ये शेतकरी, व्यापारी यांच्यासह हमाल, तोलार, आडत्या, मुनिम यांची संख्या जास्त असते. येथे सोशल डिस्टन्सींग पाळली जात नाही. व्यापारी सरकारच्या सर्व नियमाप्रमाणे सुविधा देतील पण बाहेर गावातून येणाऱ्यांची संख्या यामध्ये जास्त आहे. आणि घेतलेला कांदा विक्रीसाठीही गेला पाहिजे. सोलापूरातून सध्या केरळ किंवा आंध्रला कांदा पाठवायचा म्हटलं तर तिथे तेवढी त्याला मागणी आवशक आहे. गाड्याही पहिल्यापेक्षा जास्त भाडे घेतात. आंध्रमध्ये लोकल कांदाही घेतला जात आहे. तरी मार्केट सुरु करण्यासाठी नुकतीच व्यापारी आणि आडत्या यासह संबंधितांची बैठक घेण्यात आली होती. यामध्ये १०० च्या दरम्यान व्यापारी उपस्थित होते. त्यातून १० ते १५ दिवस थांबून मार्केट सुरु करण्याबाबत पुन्हा एक बैठक घेऊन निर्णय घेण्याचे ठरले आहे.  सध्या सोलापुरात रुग्णांची संख्याही जास्त वाढत आहे. त्यामुळे सर्वांच्या विचारानेच निर्णय घेतला जाणार आहे.
कांदा व्यापारी वैजिनाथ कदम म्हणाले, सोलापुरातील कांदा मार्केट दोन महिन्यापसून बंद आहे. शेतात जाऊन काही व्यापारी कांदा घेत आहेत. परंतु त्याला योग्य दर नाही. त्यातून खर्च सु्द्धा निघत नाही. काही ठिकाणी १ नंबर कांद्याला ६०० रुपये दर दिला जात आहे. त्यातून कोणाला परवडत नाही.

कोठे किती आवक क्विंटलमध्ये व दर (कंसातील आकडे सर्वसाधारण दराचे) महाराष्ट्र राज्य कृषि पणन मंडळ यांच्या संकेतस्थळावरुन
औरंगाबाद ४९५ (३२५), सातारा ३७ (६५०), पुणे ६०६ (८००), लालसगाव १८००० (७५०), मनमाड ५८०० (६५०), देवळा ३९७५ (८००), रत्नागिरी ६० (१७००), मालेगाव ९००० (५१०)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com