Solapur : विश्वास नांगरे पाटील यांच्या भाषणामुळे प्रेरीत होऊन पोलीस उपअधीक्षक झालेले अमोल भारती

सलग चार वर्षे विविध पदांना गवसणी घालत सहाव्या प्रयत्नात पोलीस उपअधीक्षक झालेले अमोल भारती
अमोल रामदत्त भारती
अमोल रामदत्त भारतीsakal

उपळाई बुद्रूक (जिल्हा सोलापूर) : कोणतेही कार्य हे अडथळ्याशिवाय पार पडत नाही, शेवटपर्यंत जे प्रयत्न करतात त्यांना नक्कीच यश प्राप्त होते. बीड जिल्ह्यातील अमोल रामदत्त भारती यांच्या यशामुळे हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

मेडिकलला नंबर लागला नाही म्हणून, बी फार्मसी केली तर त्यात मंदी आल्याने, व्यवसायाकडे वळायचा निर्णय घेतला. परंतु ऐनवेळी स्पर्धा परीक्षेकडे आले व विश्वास नांगरे पाटील यांच्या भाषणामुळे खाकी वर्दीकडे आकर्षित झालेले व ते पूर्ण करण्यासाठी एमपीएससीतुन दरवर्षी नवनवीन पदाला गवसणी घालत जवळपास सहा वर्षाच्या अथक परिश्रमानंतर सहाव्या प्रयत्नात पोलीस उपअधीक्षकपदी त्यांची निवड झाली आहे. त्यांची ही प्रेरणादायी यशोगाथा.

पोलीस उपअधीक्षक अमोल भारती आपल्या यशाबद्दल सांगतात की, आमचं कुटुंब मुळच बीड जिल्ह्यातील दोन हजार लोकसंख्या असलेल्या हळम गावच. आई वडिल दोघेही नोकरीच्या निमित्ताने विविध ठिकाणी कार्यरत असल्याने, दहावीपर्यंत दरवर्षी नवीन शाळा ठरलेली असायची. परंतु याचा किंचीतही परिणाम शैक्षणिक गुणवत्तेवर कधीच झाला नाही. पहिलीपासून हुशार विद्यार्थी म्हणून असलेली ओळख दहावीपर्यंत कायमस्वरूपी होती. आई वडिल दोघांचीही नियुक्ती लातुराला झाल्याने, दहावीचे शिक्षण तिथेच झाले.

दहावीला चांगले गुण मिळाल्याने, आई वडिलांसह नातेवाईकांच्या अपेक्षा वाढल्या. गुणवत्ता पाहून सर्वांच्या इच्छेनुसार डॉक्टर होण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. त्यासाठी शाहू कॉलेजमध्ये अकरावी बारावीसाठी प्रवेश घेतला.

घरची आर्थिक परिस्थिती चांगली असल्याने, वडिलांनी दुचाकी घेऊन दिली. परंतु दुचाकी आल्यानंतर अभ्यासाकडे लक्ष देण्या ऐवजी मित्रांसोबत फिरण्यात जास्त वेळ घालवला त्यामुळे अभ्यासाकडे दुर्लक्ष झाले. परिणामी मार्क कमी आले अन् 'एमबीबीएस' ची संधी हुकली. अन् 'बी फार्मसी' ला कराड येथे नंबर लागला.

डॉक्टरकीचे स्वप्नं भंग झाले त्यामुळे फार्मसी मध्ये नशीब आजमवण्यासाठी प्रयत्न सुरू केला. आयुष्यात नेमके काय करायच हे आणखी काही निश्चितच नव्हते म्हटल तरी चालेल. बी फार्मसी करत असताना तेथील वातावरणामुळे आपण याच क्षेत्रात पदवीत्तुर शिक्षण घेऊन करिअर घडवावे अशी स्वप्न रंगवत असतानाच 2008 नंतर खासगी क्षेत्रात तसेच फार्मसी क्षेत्राला खुप मोठी मंदी आली त्यामुळे नोकरीच्या संधी नगण्य झाल्या.

जरी नोकरी मिळाली तरी तुटपुंज्या पगारावरच समाधान मानावे लागेल. हि बाब लक्षात घेऊन 'बी फार्मसी' नंतर पदवीत्तुर शिक्षणाचा घेतलेला निर्णय तिथेच बदलला. हुशार विद्यार्थी असल्याने, अनेकांच्या नजरा होत्या. वडिलांना अनेकांकडून सातत्याने माझ्या करिअरबाबत विचारणा व्हायची व माझ्याकडे ठोस असे काही ध्येयच नसल्याने, निराश होतो.

परंतु इतरांचा विचार न करता. अनेक नातेवाईक व्यवसाय क्षेत्रात असल्याने, आपणही कपड्यांचे दुकान टाकून व्यवसाय करावा या हेतूने सर्व शिक्षण वगैरे बंद करून दुकान टाकण्यासाठी तयारी करू लागलो. वडील माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ लातूर मध्ये कार्यरत होते.त्यामुळे त्यांना वाटत होते की मी सरकारी नोकरी करावी.

त्यावेळेस स्पर्धा परिक्षांबाबत जागरूकता थोडी वाढली होती त्यामुळे वडील यांनी तू थोडे दिवस MPSC चा अभ्यास करून बघ. जर यश नाही मिळाले तर आपण दुकान टाकू असा सल्ला दिला. त्यांच्या सल्ल्यानुसार ऐनवेळी या क्षेत्राकडे आलो.

स्पर्धा परीक्षेबद्दल काहिच माहिती नसल्याने, युट्युबच्या मदतीने माहिती घेण्यास सुरुवात केली. अन् पहिल्यांदाच आयपीएस विश्वास नांगरे पाटील सर यांचे त्यावेळी खाकी वर्दीत गाजलेले भाषण ऐकायला व पहायला मिळाले. त्यामुळे नकळतपणे खाकी वर्दीचे आकर्षण वाढले व त्यांनाच आदर्श मानून स्पर्धा परीक्षेची सुरूवात केली.

स्पर्धा परीक्षेसाठी पुण्यात एका हॉस्टेलवर प्रवेश घेतला. अन् तेथील एक मुलगा पोलीस उपनिरीक्षक झाला. त्याच्या यशामुळे हे क्षेत्र आपल्याला देखील जमु शकते असा आत्मविश्वास निर्माण झाला. गुणवत्ता होती परंतु मार्गदर्शक नसल्याने, प्रथमतः काही क्लासेस लावले परंतु एका महिन्याच्या वर कोणताही क्लास केला नाही.

संपूर्ण अभ्यासक्रम व्यवस्थितपणे समजून घेतला. त्यात मला लातुरच्या शाळेत असताना इंग्रजी,विज्ञान हे विषय चांगले पक्के झाले असल्याने, त्याचा फायदा मोठ्या प्रमाणावर अभ्यास करताना झाला. २०११ साली पहिल्या सहा महिन्यांतच राज्यसवेची एक परिक्षा दिली अन् पुर्व परिक्षेत अपयश आले. त्याच वर्षी पोलीस उपनिरीक्षक ची देखील परिक्षा दिली. त्यात पोलीस उपनिरीक्षक हे पद अवघ्या काही गुणांनी गेले.

हार न मानता प्रयत्न सुरू ठेवले व २०१२ साली राज्यसेवेची दुसरी परिक्षाही दिली. परंतु त्यात मुख्य परीक्षेत नापास झालो. जवळपास २ वर्ष पूर्ण झाले होते परंतु हातात काहीच नव्हते. त्यामुळे गट ब, क ची का असेना परिक्षा देण्याचा निर्णय घेतला. थोडे नैराश्य आले होते. यशाचा थांगपत्ता नव्हता अशा कठिण परिस्थिती. २०१२ साली दिलेल्या विक्रीकर निरीक्षक परिक्षेचा निकाल आला अन् पहिले यश मिळाले व मी STI झालो.

आई वडिलांचा आनंद गगनात मावेनासा झाला. हे यश म्हणजे त्यांच्यासाठी मुलाने जग जिंकले अशी त्यांची भावना होती. बेलापूर नवी मुंबई येथे विक्रीकर निरीक्षक म्हणून नियुक्त झालो व पुढील परिक्षांचा अभ्यास करू लागलो. एके काळी ग्रामसेवक पदासाठी अर्ज करता आला नाही,मुदत संपून गेली म्हणून निराश झालो होतो. त्याच खात्यात राज्यसेवेच्या दुसऱ्या प्रयत्नात सहाय्यक गटविकास अधिकारी म्हणून निवड झाली.

पुढे तिसऱ्या प्रयत्नात नायब तहसीलदारपदी निवड झाली. त्यावेळी तहसीलदार अमोल कुंभार सर व तहसीलदार सोनाली मेटकरी मॅडम यांच्या कार्यक्षेत्राअंतर्गत काम करत असताना या दोघांनीही मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य केले. त्यामुळे अभ्यासात सातत्य राहिले. दरवर्षी नवीन पद मिळायचे ते स्वीकारायचे.

त्यामुळे प्रशिक्षण व परिविक्षाधीन कालावधीत अभ्यास करण्यास वाव मिळायाचा. अखंडपणे सातत्याने सुरू असलेला अभ्यास, चुकांची पुनरावृत्ती टाळत, खाकी वर्दीसाठी असलेली धडपड व सर्व प्रयत्न अखेर राज्यसेवेच्या सहाव्या प्रयत्नात सार्थकी लागले व पोलीस उपअधीक्षक म्हणून निवड झाली. ठाणे व गडचिरोली येथे सेवा सध्या बजावली असून, सध्या सोलापूर ग्रामीणला उपविभागीय पोलिस अधिकारी म्हणून कार्यरत आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com