Solapur - रविवार ता 4 जून रोजी मोहोळ तालुक्यातील काही भागात वादळी वाऱ्यामुळे केळी पिकांचे व आंब्याचे मोठे नुकसान झाले आहे. पापरी, खंडाळी, चिखली, येवती यासह अन्य गावातील केळी बागा भुईसपाट झाल्याने पिकांचे सुमारे एक कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज असून, प्रत्यक्षात पंचनामे झाल्यावरच खऱ्या नुकसानीचा आकडा समोर येणार आहे. दरम्यान तहसीलदार प्रशांत बेडसे यांनी संबंधित तलाठ्याना पंचनाम्याचे आदेश दिले आहेत.
रविवारी सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास अचानक मोठ्या वादळी वाऱ्याला सुरुवात झाली. आकाशात काळे ढग जमा होऊ लागले होते. वाऱ्याच्या वेग इतका प्रचंड होता की उतरावयास आलेल्या केळी बागा भुईसपाट झाल्या.एका तासात होत्याचे नव्हते झाले. ऊसा खालोखाल शेतकऱ्यांनी केळी लागवडीला प्राधान्य दिले आहे.
ऊसा एवढेच पैसे कमी खर्चात केळीचे होतात. पापरी येथील राजेंद्र शेळके यांची केळी बाग उतरावयास आली आहे. शुक्रवारी धार्मिक विधी करून व्यापाऱ्या बरोबर व्यवहारही झाला होता. मात्र रविवारी निसर्गाने अचानक तोंडचा घास हिरावून घेतला,
त्यामुळे त्यांच्या डोळ्यात अश्रू आले. पापरी येथील राजाभाऊ शेळके यांच्यासह सज्जन टेकळे, पवन घागरे, शत्रुघ्न टेकळे, संजय भोसले, पांडुरंग भोसले, नामदेव मोरे, शंकर पाटील, गोरख गायकवाड, शंकर गायकवाड, यांच्यासह अन्य शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
व्यापाऱ्यांना फोना फोनी दरम्यान मागील तीन ते चार दिवसापूर्वी अनेक शेतकऱ्यांनी केळीचे दर ठरवून विक्रीचा करार केला आहे. त्यांनी आमचा माल अगोदर उतरववा अशा स्वरूपाचे व्यापाऱ्यांना फोन केले आहेत.
मात्र गेल्या तीन-चार दिवसांपूर्वी 12 ते 14 रुपये प्रति किलो दर असलेली केळी रविवारी व्यापारी सहा ते आठ रुपये किलो दरानेच मागू लागले आहेत.
निसर्गाने तर नुकसान केले आहेच, परंतु कमी दर मागून व्यापारी आपले उखळ पांढरे करून घेत आहेत. अनेक आंब्यांना पाड लागला आहे. ते उतरणीच्या अवस्थेत आहेत. वादळी वाऱ्याने खाली पडून त्यांचेही मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या पाठीमागची संकटाची मालिका संपता संपेना.
सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास झालेल्या वादळी वाऱ्याने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. त्या त्या गावातील तलाठ्यांना प्रत्यक्ष भेट देऊन नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
प्रशांत बेडसे, तहसीलदार मोहोळ
लाखो रुपये खर्च करून मी केळीची बाग जोपासली आहे. उच्च दर्जाची केळी उत्पादित केली आहे. मात्र निसर्गाने तोंडचा घास हिरावून घेतला, त्यामुळे शेतकऱ्यांनी नेमकी कशी शेती करावी व कोणती पिके करावीत हे काय समजेना
राजेंद्र शेळके,शेतकरी पापरी ता मोहोळ मोहोळ
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.