
सोलापूर : या वर्षीचा मॉन्सून मे अखेरपर्यंत केरळमध्ये धडकणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. तसेच यंदा सरासरी पेक्षा जास्त पाऊस असल्याचाही अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.
सध्या संपूर्ण जिल्हा दुष्काळाने होरपळत आहे. दुष्काळाने होरपळणाऱ्या जिल्ह्यात सकारात्मक वातावरण तयार झाले आहे. सोलापूर जिल्ह्याची अर्थव्यवस्था शेती व शेतीशी निगडित व्यवसायामध्ये असल्याने हवामान विभागाच्या या अंदाजाने सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
पूर्वी रब्बीचा जिल्हा म्हणून ओळख असलेला सोलापूर जिल्ह्यातील पीक पद्धत आता बदलत आहे. सोलापूर जिल्ह्यात दोन लाख ८९ हजार ५७० हेक्टर खरिपाचे क्षेत्र तर चार लाख ६० हजार९१८ हेक्टर रब्बीचे क्षेत्र आहे.
सोलापूर जिल्ह्यासाठी सुरवातीचा पाऊस व परतीचा पाऊस दोन्हीही महत्त्वाचे मानले जातात. सुरवातीच्या पावसावर खरीप तर परतीच्या पावसावर रब्बीचा हंगाम अवलंबून असतो. गेल्या वर्षी सोलापूर जिल्ह्याला जून, ऑगस्ट व सप्टेंबर या तीनही महिन्यातील पावसाने जबरदस्त दगा दिला. त्यामुळे सोलापूर जिल्ह्यातील खरीप वाया तर गेलाच परंतु जिल्ह्यावर दुष्काळाचे सावट अधिक गडद होत गेले. मार्चपासूनच जिल्ह्याला पाणी टंचाईचा सामना करावा लागला.
जिल्ह्यात जूनमध्ये सरासरी १०२.५ मिलिमीटर पाऊस होतो. गेल्या वर्षीच्या जूनमध्ये फक्त २८.८ मिलिमीटर पाऊस झाला. जुलैमध्ये ९४.८ मिलिमीटर पाऊस होतो, गेल्यावर्षी १७९.७ मिलिमीटर झाला. ऑगस्टमध्ये जिल्ह्यात १०७.५ मिलिमीटर पाऊस होतो, गेल्या वर्षी फक्त २०.३ मिलिमीटर एवढाच पाऊस झाला.
सप्टेंबरमध्ये सोलापूर जिल्ह्यात १७६.३ मिलिमीटर पाऊस होतो. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये फक्त १३९ मिलिमीटर पाऊस झाला. त्यानंतर झालेले अवकाळी पावसाने हजेरी लावली परंतु या पावसाने कधी रब्बीच्या पिकांचे तर कधी फळबागांचे नुकसान केले. या पावसामुळे उसाला मात्र जीवदान मिळाले.
गेल्या वर्षी सोलापूर जिल्ह्यात सर्वच तालुक्यात कमी पाऊस झाला होता. उत्तर सोलापूर तालुक्यात ७४.२६ टक्के, दक्षिण सोलापूर तालुक्यात ८४.५६, बार्शी तालुक्यात ८१.६१, अक्कलकोट तालुक्यात ६७.४५, मोहोळ तालुक्यात ८५.३३, माढा तालुक्यात ८१.३८, करमाळा तालुक्यात ७२.७८,
पंढरपूर तालुक्यात ६३.१५, सांगोला तालुक्यात ५८.१९, माळशिरस तालुक्यात ६८.२८ तर मंगळवेढा तालुक्यात ८२.६१ टक्के पाऊस झाला होता. सोलापूर जिल्ह्यात एकूण सरासरीच्या ७४.६४ टक्के एवढाच पाऊस झाला होता. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात आता दुष्काळाची भीषण स्थिती होऊ लागली आहे.
जिल्ह्यातील एकूण महसूल मंडळे : ११०
एक वेळा पावसाचा खंड पडलेली मंडळे : ३
दोन वेळा पावसाचा खंड पडलेली मंडळे : ३४
तीन वेळा पावसाचा खंड पडलेली मंडळे : ५०
चार वेळा पावसाचा खंड पडलेली मंडळे : २
अतिवृष्टी झालेली महसूल मंडळे : ३२
काही वर्षांपासून हवामान खाते सुरवातीला चांगला पाऊस होणार असा अंदाज व्यक्त करते. यामुळे शेतकरी बी बियाणे खते खरेदी करतो मात्र त्यानंतर पाऊस गडप होतो. यामुळे शेतकऱ्यांचे नुकसान होते. परिणामी शेतकरी परत एकदा कर्जबाजारी होतो. यामुळे हवामान खात्याने निर्दोष अंदाज व्यक्त करावेत.
- संजय मेटे, शेतकरी, डोणगाव, ता. उत्तर सोलापूर
गेल्या काही वर्षातील अंदाज पाहता हवामान खात्याची भूमिका संदिग्ध असल्याचे दिसते. यावर्षीच्या अंदाजाप्रमाणे पाऊस झाल्यास खरिपाची पेरणी करता येईल. मात्र यासाठी हवामान खात्याने पेरणीनंतरच्या कालावधीतीलही अचूक अंदाज व्यक्त करावा.
- नागेश पवार, गावडी दारफळ, ता.उत्तर सोलापूर
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.