Solapur : नववर्षात कमी होतील रस्ते अपघात

उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांची ग्वाही
अधिकारी अर्चना गायकवाड
अधिकारी अर्चना गायकवाड sakal

सोलापूर : दरवर्षी सोलापूर शहर-ग्रामीणमध्ये जवळपास ४७० ते ५१० व्यक्तींचा रस्ते अपघातात मृत्यू होतो. राज्याच्या टॉपटेनमध्ये असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील रस्ते अपघात कमी करण्यावर नववर्षात सर्वाधिक भर असणार आहे. बेशिस्त वाहनचालकांवर कारवाई आणि दुसरीकडे शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे प्रबोधन, आरटीओ कार्यालयातील ‘सुरक्षा कवच’मधून जनजागृती केली जाईल, अशी माहिती उपप्रादेशिक परिवहन अधिकारी अर्चना गायकवाड यांनी दिली.

सोलापूर जिल्ह्याची कनेक्टिव्हिटी आता महामार्गांच्या माध्यमातून वाढल्यने वाहनांचा वेग प्रचंड वाढला आहे. कारवाई करून देखील चालक नियमांचे पालन करीत नाहीत. लेन कटिंग, क्षमतेपेक्षा अधिक प्रवासी, माल वाहतूक करणारी वाहने, सीटबेल्ट न घालता चारचाकी तर हेल्मेट न घालता दुचाकीस्वार वाहन चालवतात. मागील दोन वर्षांत ज्या ठिकाणी सर्वाधिक अपघात व अपघाती मृत्यू झाले आहेत, त्याठिकाणी रस्ता सुरक्षा समितीने उपाययोजना केल्या आहेत. खासदार डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी व जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्या अध्यक्षतेखाली दोन वेगवेगळ्या समित्या आहेत. आगामी काळात निश्चितपणे रस्ते अपघात कमी होतील, असा विश्वास उपप्रादेशिक परिवहन अधिकारी गायकवाड यांनी यावेळी व्यक्त केला.

‘सीटबेल्ट’च्या कारवाईवर भर

दरवर्षी शहर-ग्रामीणमधून प्रवास करणारे दहा ते १२ लाख वाहनचालक वाहतूक नियम मोडतात. त्यांना सरासरी आठ ते दहा कोटींचा दंड होतो. तरीसुद्धा अनेकजण वाहतूक नियम पाळत नाहीत, ही वस्तुस्थिती आहे. पण, आता शालेय जीवनापासूनच विद्यार्थ्यांना रस्ता सुरक्षेचे महत्त्व पटवून दिले जात आहे.

त्यासाठी आरटीओ कार्यालयात ‘सुरक्षा कवच’ कक्ष सुरू करण्यात आला आहे. दरम्यान, आगामी काळात बेशिस्त वाहनांवर कारवाई करताना सीटबेल्ट न घालता चारचाकी चालविणाऱ्यांवर मोठ्या प्रमाणावर कारवाई केली जाणार आहे. नवीन नियमानुसार आता मागील सीटवर बसलेल्यांनाही सीटबेल्ट बंधनकारक आहे. दंड वसूल करणे हा कारवाईचा हेतू नसून अपघात रोखणे हा प्रमुख उद्देश असल्याचेही गायकवाड यांनी यावेळी स्पष्ट केले.

प्रत्येक वाहनचालकांनी स्वयंशिस्तीचे पालन केल्यास कोणीच कारवाई करणार नाही. प्रत्येकांनी वाहन चालवताना आपल्यासोबत असलेल्या मुलांचा, व्यक्तींचा विचार प्रामुख्याने करायला हवा.

- अर्चना गायकवाड, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, सोलापूर

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com