Solapur : सप्तरंगी दुनियेचे दर्शन घडविणारी ‘दृष्टी’ बनतेय दोषरहित

शाळांद्वारे नेत्रतपासणी हाच प्रभावी उपाय; दोन हजार दृष्टिहिनांना सृष्टी दाखविण्यात ‘तोष्णीवाल’चे भरीव योगदान
vision
vision sakal
Summary

शाळांद्वारे नेत्रतपासणी हाच प्रभावी उपाय; दोन हजार दृष्टिहिनांना सृष्टी दाखविण्यात ‘तोष्णीवाल’चे भरीव योगदान

सोलापूर : ऑनलाइन शिक्षण, ऑनलाइन ऑफिस, ऑनलाइन खरेदी व अन्य अनेक कारणांनी मोबाईल व संगणकाच्या स्क्रीनसमोर राहण्याचा वेळ वाढला असल्याने डोळ्यांचे विकार वाढले आहेत. दृष्टिदोषविरहित पिढी घडविणे हे एक मोठे आव्हान बनले आहे. आपल्याला सप्तरंगी दुनियेचे दर्शन घडविणारे डोळे आरोग्यपूर्ण राहावेत, यासाठी प्रत्येक शाळेमधून विद्यार्थ्यांची नेत्रतपासणी हा प्रभावी उपाय ठरणार आहे.

भारतात सफेद मोतीबिंदूमुळे दृष्टी जाण्याचे प्रमाण मोठे आहे. त्यातच आता डायबेटिस आणि बुब्बुळाच्या जखमांमुळे डोळे गमाविणाऱ्यांची भर पडली आहे. मागील दहा वर्षांत डिजिटल इंडियामुळे घरी, ऑफिसमध्ये सर्वत्र संगणकावरील कामकाज वाढले. कोरोना काळात हे प्रमाण आणखी वाढल्याने तसेच ऑनलाइन शिक्षणामुळे तर लहान मुलांच्या डोळ्यांवर विपरीत परिणाम होत आहेत.

ऑनलाइन शिक्षणाच्या नावाखाली मुले मैदानी खेळ विसरून मोबाईलवरील खेळांकडे आकर्षित झाले आहेत. पूर्वीच्या तुलनेत डोळ्यांचा वापर ३० टक्क्यांनी वाढला आहे. सततच्या ऑनलाइन कामकाजामुळे अगदी पाच वर्षांच्या बालकालाही दृष्टिदोषाला सामोरे जावे लागत आहे. दृष्टिदोषाचे प्रमाण ७५ टक्के इतकी आहे. हे दोष लवकर लक्षात आल्यास व्यायामाने आणि उशिरा समजल्यास चष्मा वापरून ठीक होणारे आहेत.

मधुमेहानेदेखील अनेकांची नजर कमजोर केली आहे. निष्काळजीपणामुळे याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. निरोगी डोळ्यांसाठी ‘व्हिटॅमिट ए’ आहाराबरोबर शाळांमधून विद्यार्थ्यांची नेत्रतपासणी व्हावी. मधुमेह व्यक्तींनी डोळ्यांची वेळोवेळी तपासणी करून घेणे आवश्यक आहे.

‘याकडे’ पाहा गंभीरतेने

डोळे दमणे, आग, जळजळ होणे, डोळ्यांतून पाणी येणे, डोळे लाल होणे, जवळचे किंवा दूरचे अस्पष्ट दिसणे, डोळे कोरडे पडणे, कमी उजेडात न दिसणे, धुरकट दिसणे, डोळ्यांना खाज सुटणे, एका वस्तूच्या जागी दोन वस्तू दिसणे, डोकं दुखणे ही डोळे बिघडल्याची लक्षणे आहेत. याकडे गंभीरतेने पाहिले पाहिजे. ही सर्व लक्षणे दृष्टिदोषाची आहेत.

३४ वर्षांत दोन हजार दृष्टिहिनांना दाखविली सृष्टी

१९७० च्या दशकात डॉ. श्याम तोष्णीवाल व डॉ. एम. व्ही. अलबाळ यांनी जीवनाबद्दल असलेल्या सकारात्मक दृष्टीमुळे नेत्रदानाची चळवळ सुरू केली. १९८८ मध्ये मिश्राबाई तोष्णीवाल नेत्रपेढी सुरू झाली. सुरवातीला कित्येक वर्षे या नेत्रपेढीला एक-दोन डोळेच उपलब्ध झाले. आता याबाबत जागरूकता निर्माण झाली आहे. गेल्या ३४ वर्षांत या नेत्रपेढीने साधारण दोन हजार दृष्टिहिनांना सृष्टी दाखविली आहे.

मुलांमध्ये शिक्षण व अन्य कारणांनी मोबाईलचा वापर वाढल्याने त्यांच्यात दृष्टिदोषाचे प्रमाण वाढू लागले. बदलती जीवनशैली, व्यायामाचा अभाव आणि खाण्याच्या चुकीच्या पद्धतींमुळे ‘मधुमेहा’ने डोके वर काढले आणि डोळ्यांचा ‘डायबेटिक रेटिनोपेथी’ आजार बळावला. शालेय जीवनापासूनच मुलांची दृष्टी निरोगी ठेवण्यासाठी शाळांमधून नेत्रतपासणी सक्तीची होणे अपेक्षित आहे. तसेच मधुमेही रुग्णांनी डोळ्यांची तपासणी व निगा राखावी.

- डॉ. नवनीत तोष्णीवाल, नेत्रतज्ज्ञ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com