
मंगळवेढा (सोलापूर) : गेल्या चार दिवसांपासून दामाजी कारखान्याच्या प्रवेशद्वारावर सुरू असलेले स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे धरणे आंदोलन थांबवण्यासाठी कारखाना व्यवस्थापनाने शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांशी तडजोडीची चर्चा केली. मात्र त्यांच्यातील बोलणी फिस्कटल्यामुळे स्वाभिमानीचे आंदोलन सुरूच आहे. दरम्यान, आज याबाबत जिल्हाधिकारी यांची भेट घेऊन लक्ष घालण्यास सांगितले जाणार आहे.
एकरकमी एफआरपी अधिक 14 टक्के वाढ व थकीत 74 रुपयांचे बिल शेतकऱ्यांना मिळावे म्हणून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे हे आंदोलन सुरू आहे. याबाबत योग्य निर्णय न झाल्यामुळे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी कारखान्याच्या गव्हाणीत उड्या घेतल्या. त्यानंतर कारखाना व्यवस्थापन व संघटना यांच्यात काल (रविवारी) बैठक घेण्यात आली. या बैठकीमध्ये कारखान्याचे अध्यक्ष परगावी गेल्यामुळे कार्यकारी संचालक झुंजार आसबे हे शेतकरी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी चर्चेत सहभागी झाले.
संपूर्ण एफआरपी येत्या आठ दिवसांत तर राहिलेले 74 रुपयांचे बिल एक महिन्यानंतर देण्यात येईल, असे लेखी आश्वासन दिले असता, संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी तो निर्णय अमान्य केला व संपूर्ण एफआरपी व राहिलेले 74 रुपयांचे बिल जमा करेपर्यंत आम्ही इथून उठणार नाही, अशी ठाम भूमिका घेतल्याने चर्चा फिस्कटली. त्यामुळे पुढील दिशा ठरवून जिल्हाधिकाऱ्यांना जिल्ह्यातील पदाधिकारी घेराव घालणार आहेत.
तर दामाजी हा सहकारी तत्त्वावरील साखर कारखाना असून इतर कोणत्याही उपपदार्थाचे उत्पादन नसल्यामुळे इतरांप्रमाणे दर देताना संघर्ष करावा लागत आहे. अतिवृष्टीमुळे ऊस पिकाचे नुकसान झाले आहे, त्यामुळे चांगली रिकव्हरी मिळत नाही. तरी देखील गाळप उसाला चांगला दर देण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. कारखाना आणि शेतकरी यांच्यामध्ये योग्य समन्वय आहे. आंदोलनकर्त्या शेतकरी संघटनेने अडचणीच्या काळात वेठीस धरू नये, अशी भूमिका कारखान्याच्या वतीने मांडली जात आहे.
तर एफआरपीची पूर्ण रक्कम व थकीत 74 रुपयांचे बिल शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाल्याशिवाय आंदोलन थांबणार नाही, अशी भूमिका स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे पश्चिम महाराष्ट्र युवक आघाडी अध्यक्ष ऍड. राहुल घुले यांनी घेतली आहे.
संपादन : श्रीनिवास दुध्याल
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.