सोलापूर जिल्ह्यात १० वर्षांनी सुरु होणार टॅंकर! उजनी मायनस ०.७० टक्के; सोलापूरसाठी १० मेपासून पाणी

वर्षाला ४०० टँकर लागणाऱ्या सोलापुरात टँकरची संख्या ३०-४० वर आली. महाराष्ट्र शासनाकडून तुकाराम मुंढे यांना 'सवोत्कृष्ट जिल्हाधिकारी' या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. टॅंकरमुक्त जिल्ह्यात आता यंदा माळशिरस तालुक्यातील काही गावांना टॅंकर लागणार आहेत.
Tukaram Munde News
Tukaram Munde NewsEsakal

सोलापूर : सोलापूर, पुणे, नगर या जिल्ह्यांतील दुष्काळाच्या झळा कमी करण्यासाठी उजनी धरण वरदान ठरले आहे. उजनी एकाच दिवसात ०.७० टक्के मायनसमध्ये गेले आहे. आता धरणातील पाणी केवळ पिण्यासाठीच राखीव ठेवले जाणार आहे. सोलापूर शहरासाठी १० जूनपासून धरणातून पाणी सोडले जाणार आहे. भीमा नदीतून सोडलेले पाणी आठ दिवसांत औज बंधाऱ्यात पोचणार आहे. सध्या आठ दिवस पुरेल इतकेच पाणी बंधाऱ्यात शिल्लक आहे.

उजनी धरणावर सोलापूर जिल्ह्यातील शेती, अर्थकारण अवलंबून आहे. सोलापूरसह पुणे व नगर जिल्ह्यासाठी धरण वरदायिनी ठरले आहे. धाराशिव शहराला उजनीतूनच पाणी पुरवठा होतो. सोलापूर शहरवासियांची तहान उजनीमुळेच भागते. औज बंधाऱ्याने देखील आता तळ गाठल्याने कडक उन्हाळ्यात सोलापूरचा पाणी पुरवठा विस्कळीत होऊ नये म्हणून भीमा नदीद्वारे १० मे रोजी पाणी सोडले जाणार आहे. पण, अलनिनो वादळामुळे व अवकाळीमुळे यंदा पावसाळा काही दिवस लांबेल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे. बाष्पीभवन व सोलापूर शहरासह इतर ठिकाणी पाणी वापरले जात असल्याने १५ जूनपर्यंत धरण ३० ते ३५ टक्क्यांपर्यंत मायनसमध्ये जाईल, असाही अंदाज आहे. त्यामुळे सर्वांनाच पाणी जपून वापरावे लागणार आहे.

आता कॅनॉलमधून पाणी नाहीच

उजनी धरण शनिवारी (ता. ६) मायनसमध्ये गेले आहे. गतवर्षी १२ जूनपर्यंत धरण प्लसमध्येच होते. पाऊस पडेपर्यंत आता उजनीतून कॅनॉलमधून पाणी सोडता येणार नाही, अशी सद्य:स्थिती आहे. कॅनॉलला सोडलेले पाणी १५ मेपर्यंत चालणार आहे. बार्शी, सीना-माढा व दहिगाव उपसा सिंचन योजनेचे पाणी आता बंद झाले आहे. बोगद्यातून सुटलेले पाणी देखील धरण मायनसमध्ये गेल्याने बंद झाले आहे.

दहा वर्षांनी यंदा टॅंकरची गरज भासणार

वर्षाला ४०० टँकर लागणाऱ्या सोलापुरात टँकरची संख्या ३०-४० वर आली. तत्कालीन जिल्हाधिकारी तुकाराम मुंढे यांच्या या कामगिरीसाठी त्यांना महाराष्ट्र शासनाकडून ‘सवोत्कृष्ट जिल्हाधिकारी’ म्हणून सन्मानित करण्यात आले. त्यानंतर साधारणत: २०१२-१३ पासून सोलापूर जिल्हा टॅंकरमुक्त म्हणून ओळखला जातो. त्यांच्या कार्यकाळात टॅंकरमुक्त झालेल्या जिल्ह्यात आता यंदा माळशिरस तालुक्यातील काही गावांना पाणी पुरवठा करायला टॅंकर लागतील, अशी स्थिती आहे. तेथील तहसीलदारांनी टंचाई शाखेला तसे कळवले आहे. पावसाळ्यात त्या गावात समाधानकारक पाऊस झालेला नाही. दरम्यान, पाऊस लांबल्यास काही दिवसांसाठी सांगोला, मंगळवेढ्यासह इतर काही तालुक्यात देखील काही टॅंकर लागतील, असा अंदाज वर्तवला जात आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com