सोलापूर : सांगा शेतकऱ्यांने जगायचं कसं

चाळीस गोणी कांद्याची पट्टी आली वजा सात रूपये
Payment slip
Payment slipsakal

उपळाई बुद्रूक (जि. सोलापूर) - सतत गृहिणींच्या डोळ्यात पाणी आणणारा कांदा सध्या शेतकऱ्यांच्या डोळ्यांत पाणी आणत आहे. सध्या कांद्याची आवक वाढल्याने, दर मोठ्या प्रमाणावर घसरले आहेत. कांद्याला प्रतिकिलो अवघा 1 रुपये भाव मिळत असुन, अंजनगाव खेलोबा (ता. माढा) येथील शेतकऱ्यांने 40 पोती कांदा विक्रीसाठी नेला असता, हमाल, आडत खर्च, गाडी भाडे वजा करता अक्षरशा: आडतवाल्यालाच वरून 7 रूपये देण्याची नामुष्की शेतकऱ्यावर ओढवली असुन, कांद्याला मिळत असलेल्या अल्प दरामुळे शेतकऱ्यांचा उत्पादन खर्चही निघत नसल्याने, कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.

गेल्या काही दिवसांपासून कांद्याला भाव नसल्याने शेतकरी शेतातील कांद्याची काढणी करण्याचे टाळत आहे. पाच ते सहा रुपये किलो दराने कांद्याची विक्री होत आहे. यामुळे लागवडीचा खर्चही हाती पडत नसून शेतकरी हतबल झाले आहे. अंजनगाव खेलोबा (ता.माढा) येथील युवा शेतकरी ओंकार पाटेकर याने दोन एकर कांद्याची लागवड केली होती. त्यासाठी आतापर्यंत जवळपास लाखभर रुपये केला होता. कांदा काढणीला आला असताना, अचानक कांद्याचे भाव कोसळले. तरीदेखील या युवा शेतकऱ्यांने खर्च तरी निघेल या अपेक्षेने सोलापूर आडतीवर 85 पोती कांदा विभागुन नेला होता. त्यापैकी 45 पोती असलेल्या कांद्याचा गाडी खर्च निघाला परंतु, 40 पोती असलेल्या कांदा प्रतिकिलो 1रूपये दराने विकला गेल्याने त्याचे 1883 रूपये झाले, पण गाडी खर्च, हमाल खर्च, तोलाई खर्च 1954 इतका झाल्याने, आडतवाल्यालाच 7 रूपये देण्याची वेळ या शेतकऱ्यावर आली आहे. त्यामुळे या युवा शेतकऱ्याचे कांद्याने चांगलेच वांदे केले आहे.

अतिवृष्टी आणि अवकाळीच्या अस्मानी संकटातुन बाहेर पडत नाही तोपर्यंत बळीराजा महावितरणाच्या लोडशेडिंग आणि खतांच्या दरवाढीच्या सुलतानी संकटात सापडला. अन् या संकटाशी सामना करत रात्रंदिवस मेहनत करूनही हाती आलेल्या पिकाला कवडीमोल भाव भेटत असल्याने, शेतकऱ्यांना लावलेला खर्चही निघणं अवघड झाले आहे. याकडे सरकारने लक्ष देऊन सध्याच्या स्थितीला शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळावा यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे.

भाव चांगला म्हणून लावला, पण फसलो! गतवर्षी कांदा उत्पादनातून अनेक शेतकऱ्यांना चांगला फायदा झाल्याने, यंदा कांद्याची लागवड केली होती. याच भरवश्यावर वर्षभरातील आर्थिक व्यवहाराचे नियोजन केले होते. परंतु कांद्यानेच आमचा वांदे केले असुन, निम्मा नेलेल्या कांद्याची हि अवस्था झाली असुन, आणखी 80 पोती कांदा शेतात पडुन आहे. त्यामुळे कांदा विकुन आणखी तोट्यात जाण्यापेक्षा शेतात सडलेला बरा. अचानक भाव उतरल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. त्यामुळे सहानुभूतीपूर्वक शेतकऱ्यांचा विचार करावा.

- ओंकार पंकज पाटेकर, युवा शेतकरी, अंजनगाव खेलोबा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com