
गोपालनातून उत्पन्नासोबत शेतीमध्ये परिवर्तन...
सोलापूर : सलग अनेक वर्षे गोपालनाच्या माध्यमातून संपूर्ण शेतीला पुरेल इतकी सेंद्रीय खताची निर्मिती करत परिते (ता. माढा) येथील प्रगतीशील शेतकरी दादासाहेब देशमुख यांनी रासायनिक खताचा वापर जवळपास शुन्यावर आणला आहे. याशिवाय गाईचे तूप, गोऱ्हे व कालवडीची विक्री यातून सातत्याने शेती उत्पादनाच्या गुणवत्तेचा समतोल साधण्यात यश मिळवले आहे.
दादासाहेब देशमुख यांच्याकडे पूर्वीपासून गाई व म्हशी कमी प्रमाणात होत्या. काही वर्षापूर्वी त्यांनी गाईच्या शेण, गोमुत्रापासून खते बनवून शेती सुपिक करण्याच्या बदलत्या काळाचे वेध घेतले. तसेच त्यांच्याकडे गाईचीसंख्या वाढू लागली. गाईचे दूध उत्पादन कमी होते हे लक्षात येऊन त्यांनी शेण व गोमूत्र खत वापरण्यावर भर दिला.
शेतामध्ये पीकांना गाईचे शेण व गोमुत्राची स्लरी पोहोचवण्यासाठी योग्य पाईपलाईन व साठवण टाक्या बसवल्या. त्यानुसार सर्व शेतात हे खत जाईल अशी सोय केली. तसेच स्लरीसोबत गाईच्या दूधाचे ताक स्लरीमध्ये मिसळून हे खत अधिक संवर्धक केले. त्याचे परिणाम शेतीच्या सुपिकतेवर दिसू लागले.
त्यासोबत काही वर्षातच त्यांचा रासायनिक खताचा खर्च अक्षरशः २५ टक्क्यावर आला. शेतीमध्ये लाखो रुपयांची बचत रासायनिक खताच्या न वापरण्यामुळे झाली. ६० ते ७० एकरावरील फळबागावर त्यांना रसायनांचा वापर फारसा करावा लागत नाही. सध्या त्यांच्याकडे ८० गाई आहेत. सुरवातीला गाईचे दूध ते वापरत नसत. पण ते आरोग्यदायी असल्याने त्यांनी दूध उत्पादन वाढवले. त्यांच्या घरी केलेल्या गाईच्या तुपाला मागणी भरपूर येऊ लागली. महिन्याला १० ते १५ किलो तूप होऊ लागले. तूप करताना राहिलेले ताक
स्लरीमध्ये मिसळून खतासारखे उपयोगात येऊ लागले. सध्या हे तूप तीन हजार रुपये किलो दराने विकले जाते. याशिवाय दरवर्षी गोऱ्हे व कालवडी मोठ्या प्रमाणात होत असल्याने त्याची विक्री होती. दरवर्षी पाच ते सात लाखाच्या जनावरांची विक्री ते जाणकार शेतकरी व गोपालकांना करतात.
ठळक बाबी...
गाईपासून मिळणाऱ्या खताने रासायनिक खताचा उपयोग झाला कमी
गोपालनातून संपूर्ण शेती सेंद्रीय करण्याकडे वाटचाल
८० गाईचे पालन अर्धा एकरात मुक्त गोठा
महिन्याला १५ किलो तुपाचे उत्पादन
दरवर्षी २० ते २५ गोऱ्हे व कालवडीची विक्री
गाईपासून मिळणाऱ्या खतांवर फळबागांची लागवड
काजळी खिलार, गीर व खिलार गाईचा सांभाळ
शेतीच्या पध्दतीत संपूर्ण परिवर्तन फक्त गाईचे शेण, गोमुत्रापासून तयार केलेल्या विविध खतांच्या मदतीने केले आहे. येत्या काही दिवसात संपूर्ण शेती सेंद्रीय होईल. याशिवाय दूध, तूप व जनावर विक्रीतून देखील चांगले उत्पन्न मिळू लागले आहे.
- दादासाहेब देशमुख, परिते, ता. माढा
Web Title: Transformation Into Agriculture From Gopalan Organic Fertilizer Solapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..