सोलापूर : विवाहावेळी मुलाचे वय 21 आणि मुलीचे वय 18 वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे. मात्र, कायद्याचे उल्लंघन करुन मुलगा 19 वर्षाचा आणि मुलगी 15 वर्षाची असतानाच पालकांनी विवाह ठरविला. गुरुवारी (ता. 31) विवाहाचा मुहूर्त काढला, मात्र त्याची माहिती जिल्हा बालकल्याण समितीपर्यंत पोहचली. त्यानंतर समितीच्या सदस्यांनी त्या मुलीला हळदीदिवशीच (गुरुवारी) ताब्यात घेतल्याने तो बालविवाह रोखण्यात बालकल्याण समितीला यश आले आहे. मुलगी माळशिरस तालुक्यातील तर मुलगा पंढरपूर तालुक्यातील आहे.
आदल्यादिवशीच (बुधवारी) वधूला घेतले ताब्यात
माळशिरस तालुक्यातील अकलूजमधील 15 वर्षीय मुलीची नववी पूर्ण झाली आहे. तिचे आई- वडिल शेतकरी असून परिस्थिती जेमतेम आहे. लॉकडाउनमुळे शाळा बंद असल्याने शिक्षणही बंदच आहे. त्यामुळे पंढरपूर तालुक्यातील त्यांच्या नात्यातील मुलासोबत त्यांनी आपल्या मुलीचा विवाह ठरविला. विशेष म्हणजे मुलाचे वय 19 असून तो पदवीचे शिक्षण घेत आहे. त्यांच्या विवाहाचा मुहूर्त 31 डिसेंबर असल्याचे जिल्हा बालकल्याण समितीला समजले. त्यानंतर समितीच्या अध्यक्षा अनुजा कुलकर्णी, सुवर्णा बुंदाले, प्रकाश ढेपे, विलास शिंदे यांनी त्याठिकाणी धाव घेतली. मुला- मुलीच्या आई- वडिलांची समजूत काढून त्यांनी मुलीला ताब्यात घेतल्याने उद्याचा (गुरुवारी) बालविवाह रोखण्यात आला आहे.
'रिकामे डोके अन् नको ते उद्योग' या उक्तीचा काही पालकांना लॉकडाउनमध्ये अनुभव आल्याने त्यांनी बालवयातच आपल्या मुलीला वर शोधून विवाह लावून देण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. दुसरीकडे काही मुलींना आई अथवा वडिल नाही किंवा काहींना दोघेही नाहीत. त्यांचा सांभाळ मामा, काका, आजी करीत आहे. अशा तब्बल 60 मुलींचा बालविवाह रोखण्यात जिल्हा बालकल्याण समितीला मार्च ते 30 डिसेंबर या काळात यश मिळाले आहे. दरम्यान, पालकांनी मुलीला पूर्णपणे शिक्षण द्यावे, तिची शारिरीक व मानसिक वाढ होऊ द्यावी. बालवयात विवाह केल्याने तिच्या संसारात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. या पार्श्वभूमीवर तेथील लोकप्रतिनिधी, गावचे सरपंच, ग्रामसेवक, शिक्षक, अंगणवाडी सेविकांनी पालकांना जागृत करायला हवे, अशी अपेक्षा जिल्हा बालकल्याण समितीच्या अध्यक्षा अनुजा कुलकर्णी यांनी व्यक्त केली. बालविवाह रोखल्यानंतर संबंधित मुलीची काळजी व संरक्षणाची जबाबदारी बालकल्याण समितीतर्फे पार पाडली जाते. पालकांकडून मुलीला कोणताही त्रास करणार नाही, 18 वर्षे पूर्ण झाल्याशिवाय विवाह लावून देणार नाही, असे बॉण्ड पेपरवर लिहून घेतले जात आहे. तर काही प्रसंगात मुलीला आठ ते 30 दिवसांपर्यंत बालकल्याण समितीकडे ठेवून घेतले जाते, असेही कुलकर्णी यांनी 'सकाळ'शी बोलताना सांगितले.
जिल्हा बालकल्याण समितीच्या अध्यक्षा म्हणाल्या...
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.