
सांगली ः विदेशातून जिल्ह्यात दाखल झालेल्या 56 लोकांवर आरोग्य यंत्रणेचे विशेष लक्ष आहे. त्यांच्यात आजाराची अद्याप कोणतीही लक्षणे दिसलेली नाहीत. त्यामुळे आपण कुणीच घाबरून जाण्याचे कारण नाही. त्यांनी दक्षता घ्यावी, 14 दिवस घरातून बाहेर पडू नये, काही वाटले तर आरोग्य विभाग त्यांच्या घरी जाईल, अशी व्यवस्था केली आहे, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना दिली.
कोरोना व्हायरसबाबत सगळीकडे भीतीचे वातावरण आहे. मास्कचा वापर वाढला आहे. कसे वागावे, काय करावे, काय करू नये, याबाबत जो तो आपापल्या परीने माहिती देत आहे. त्याबाबत गोंधळ वाढवू नये, असे आवाहन डॉ. साळुंखे यांनी केले. ते म्हणाले,""आपण काळजी करू नये, तर काळजी घ्यावी. हात धुण्याची सवय ठेवावी. हात साबणाने धुवावेत. लहान मुले, ज्येष्ठ, सतत आजारी असणाऱ्यांनी विशेष काळजी घ्यावी. काहीही खाण्यापूर्वी, पिण्यापूर्वी, डोळ्याला हात लावण्यापूर्वी हात स्वच्छ धुवावेत. हीच मुख्य सवय महत्त्वाची आहे. कोरोना झालेल्या व्यक्तीकडून इतरांना तो होण्याची शक्यता अधिक आहे. त्यामुळे शक्यतो गर्दी करू नये. कारण नसताना हॉटेलिंग टाळावे.
हस्तांदोलन न करता नमस्कार करावा.''
ते म्हणाले,""जिल्हा आरोग्य यंत्रणा शंभर टक्के दक्ष आहे. विदेशातील आलेल्या लोकांची संख्या 56 आहे. त्यांची नावे आणि पत्ते आम्हाला माहिती आहेत. त्यांच्याशी यंत्रणा संपर्कात आहे. त्यांनी काहीही करण्याची गरज नाही. केवळ घरात थांबावे. कोरोनाबाबतची कोणतीही लक्षणे आढळल्यास आरोग्य विभागाला कळवावे. आमचे कर्मचारी तुमच्या घरापर्यंत येतील. ते काळजी घेतील. सर्वसामान्य लोकांनी मास्क वारपण्याची गरज नाही. त्याचा काही उपयोग होणार नाही.''
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.